आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Thursday, November 20, 2008

महाभारतातील कर्णकथा - भाग १३

कर्णाबद्दलचे हे लेखन फार विस्तारले. या लेखनात कर्ण व अर्जुन यांची तुलना वेळोवेळी करणे आवश्यकच होते. अर्जुन हा महाभारताचा एक नायक तर कर्ण हा प्रतिनायक, भीम नायक तर दुर्योधन प्रतिनायक असे म्हणता येईल. मी खलनायक असा शब्दप्रयोग मुद्दामच केलेला नाही. कर्ण व दुर्योधन या दोघांमध्येहि अनेक उत्तम गुणहि महाभारतकारांनी मुक्तपणे वर्णिले आहेत. कर्णाचे शौर्य व दातृत्वगुण निर्विवाद आहेत. दुर्योधनाबद्दलहि तसेच म्हणावे लागते. मात्र अखेर, महाभारतकारांना कर्ण हे गुणांपेक्षां दोष जास्त असलेले व्यक्तिमत्त्व रंगवावयाचे आहे याबद्दल शंका नाहीं. कर्णातील उणेपणा हा त्याच्या (माझ्या तर्काप्रमाणे ) सूताचा पुत्र म्हणून झालेल्या जन्मामुळे वा सूतपुत्र म्हणून आयुष्य व्यतीत करावे लागल्यामुळे आला असें खरे तर म्हणतां येणार नाहीं. सूत सर्व प्रकारच्या मानसन्मानापासून वंचित होते असे दिसत नाही. सूतांचे स्वत:चे स्वतंत्र राज्य होते. त्या राज्यात गेलेले असताना अधिरथ व राधा यांना कर्ण मिळाला असे म्हटले आहे. विराटाची पत्नी सुदेष्णा ही सूतकुळातील होती व तिचा भाऊ कीचक हा विराटाच्या राज्यात सर्वेसर्वा होता. तेव्हा सूतांचे स्थान क्षत्रियाच्या किंचित खालचे मानले जात असावे. कर्णाचे सुरवातीचे (धनुर्विद्येचे ) शिक्षण कोठे झाले याचा काही उल्लेख नाही पण परशुरामाकडे जाण्यापूर्वी बरीच प्रगति झालीच असणार.
कर्णाला आपण कुंतीपुत्र आहोत हे कळण्याचा काही मार्ग नव्हता. (कृष्ण वा कुंती यांनी सांगेपर्यंत). त्याने कौरवदरबारात आपली धनुर्विद्या प्रगट केली तेव्हा लगेचच दुर्योधनाने त्याला आयुष्यभरासाठी जवळ केले. सर्व मानसन्मान व वैभव त्याला प्राप्त झाले होते. त्यापुढील त्याचे आयुष्य सुखाने जाण्यास काही हरकत नव्हती. पण दुर्योधनाची मैत्री त्याला तशी महागच पडली म्हणावे लागते कारण नंतर आयुष्यभर दुर्योधनाच्या सर्व कुटिल बेतांमध्ये त्याला सामील व्हावे लागले. त्याने ते स्वखुषीनेच केले असे दिसते. घमेंडखोर व उद्धट स्वभावामुळे त्याला बढाया मारण्याची खोड जडली. परशुरामाकडून मिळवलेल्या विद्येवर तो संतुष्ट राहिला. उलट अर्जुनाने द्रोणापासून मिळवलेल्या विद्येवर संतुष्ट न राहातां अधिक कौशल्य मिळवण्यासाठी धडपड केली. अखेरच्या युद्धापूर्वी तो असे साधार म्हणू शकला की आज माझ्याकडे जी अस्त्रे आहेत त्यांचे ज्ञान द्रोणाला वा भीष्मालाहि नाही! सर्व दृष्टीने विचार करतां असे म्हणावे लागते कीं कर्णाच्या दोषांनी अखेर त्याच्यातल्या गुणांवर मात केली. हा विषय मी येथेच संपवीत आहे. या लेखनाला उदंड वाचक लाभले व प्रतिसाद मिळाला. मतभेद हे असणारच. तुमच्या सर्वांच्या मतांचा मी आदर करतो. धन्यवाद.

Thursday, November 13, 2008

महाभारतातील कर्णकथा - भाग १२

जयद्रथवधाच्या दिवशी झालेल्या युद्धप्रसंगांचे खुलासेवार वर्णन माझ्या त्या विषयावरील लेखांत पूर्वीच आलेले आहे. त्या दिवशी सहा महारथींना अर्जुनाने वारंवार हरवले, प्रचंड सैन्यसंहार केला व अखेर जयद्रथालाहि मारले. याउलट, अकराव्या दिवसापासूनच्या युद्धांत कर्णाला अभिमन्यु, सात्यकी, भीम, धृष्टद्युम्न, घटोत्कच या सर्वांनी वारंवार हरवले. भीम हा महाधनुर्धर असे त्याचे वर्णन नाही. तो गदायुद्ध व शरीरबळाच्या सर्व प्रकारच्या युद्धात प्रवीण! मात्र जयद्रथवधाच्या दिवशीं रथयुद्धात त्याने सतरा वेळा कर्णाचे धनुष्य तोडून कर्णाला सळो कीं पळो करून सोडले. भीमाने मला फार मार दिला आहे व केवळ आज युद्धाला उभे राहिलेच पाहिजे म्हणून मी उभा आहे असे त्याने स्वत:च दुर्योधनापाशी म्हटले! भीमार्जुनांनी क्वचितच जीव वांचवण्यासाठी युद्धातून पळ काढला असेल. कर्णाने तसे वारंवार केले. अनावर झालेल्या घटोत्कचाला मारण्यासाठी कर्णाला अखेर अर्जुनावर वापरण्यासाठी खास राखून ठेवलेली शक्ति वापरावी लागली. इतर बळाने वा अस्त्रविद्येने भागले नाही. द्रोणाला धृष्टद्युम्नापासून कर्ण वांचवूं शकला नाही. दुर्योधनाचे भाऊ रोज भीमाकडून मारले जात होते. कर्ण त्यांना, दु:शासनालाहि, वांचवू शकला नाही.
कर्ण सेनापति होईपर्यंत खरे तर युद्ध दुर्योधनाच्या हाताबाहेर गेलेले होते. दोन दिवसपर्यंत कर्णाने कडवा प्रतिकार केला. अर्जुनाचे व त्याचे अनेक वेळा संग्राम झाले. अर्जुनासमोर हे मोठे आव्हान होते. पण तो त्या कसोटीला पुरेपूर उतरला. अर्जुन उपस्थित नसताना झालेल्या अभिमन्युवधामध्ये कर्णाचा सहभाग होता म्हणून अर्जुनाने चिडून कर्णाला आव्हान दिले होते कीं अभिमन्यूला वांचवायला मी नव्हतो. पण तुझ्या पुत्राला मी तुझ्यासमक्षच मारीन. कर्णपुत्र वृषसेन हाही अभिमन्यूप्रमाणेच महारथी होता. कर्णाला डांबून ठेवून, तो हजर असतानाच, अर्जुनाने वृषसेनाचा वध केला व आपला शब्द खरा केला. कर्ण आपल्या पुत्रालाहि वांचवूं शकला नाही. सतरा दिवसांच्या अखंड परिश्रमांनंतर कर्णाचे रथचक्र रुतून बसले असताना, त्याला पुन्हापुन्हा निसटून जाण्याची संधि न देतां, अर्जुनाने अखेर कर्णाचा वध केला व वैराची अखेर केली. यांत अर्जुनाच्या पराक्रमाला कोठेतरी उणेपणा आला असे काहीना निव्वळ कर्णप्रेमामुळे वाटते पण माझ्या मते त्यांत काडीचाहि अर्थ नाही. युद्धामध्ये आलेल्या संधीचा फायदा घेतला नाही तर संधि पुन्हापुन्हा येत नाही. या दोन दिवसांत कर्णालाहि अर्जुनवधाची संधि आली होती पण ती त्याला साधतां आली नाही. शल्याने त्याचे सारथ्य कौशल्याने केले पण युद्धाला उभे राहाण्यापूर्वी बढाईखोर व उद्धट स्वभावाच्या कर्णाने त्याचेबरोबर वितंडवाद घालून त्याचे संपूर्ण सहकार्य मिळण्याची संधि घालवली. शल्याने रुतलेले चाक काढण्याचे माझे काम नाही असे म्हणून सहकार्य नाकारले पण त्याला प्रसंग न ओळखणारा कर्णच स्वत: जबाबदार नाही काय? कर्णाने पराक्रमाची शर्थ करूनहि अखेर तो उणाच पडला व अपयशी झाला.
अद्यापपर्यंतचे १२ भागांमध्ये मी केलेले सर्व कर्णचित्रण महाभारतावरच आधारित आहे. कर्णाचा जन्म सूर्यापासून नव्हे तर मग कोणापासून याबद्दलचा माझा सप्रमाण तर्क मी वाचकांसमोर ठेवला आहे. सर्व चित्रणाचे समालोचन अखेरच्या भागात वाचा.

Saturday, November 8, 2008

महाभारतातील कर्णकथा - भाग ११

भारतीय युद्ध अठरा दिवस चालले. युद्धाचे अतिशय विस्तृत व खुलासेवार वर्णन महाभारतात आहे. युद्धाचे पहिले दहा दिवस कर्ण युद्धाबाहेरच होता. भीष्म सेनापति असेपर्यंत त्याच्या आधिपत्याखाली त्याला लढावयाचे नव्हते. आपल्या पराक्रमाचे श्रेय भीष्माला मिळेल असे क्षुद्रपणाचे कारण त्याने दिले होते. वास्तविक, हा दुर्योधनाच्या जीवन-मरणाचा लढा होता, त्यापासून कोणत्याही कारणामुळे वा निमित्तामुळे कर्णाने दूर रहाणे हे उचित म्हणतां येत नाही. त्यापेक्षा स्वाभिमानाला थोडी मुरड घालणे जास्त उचित झाले असते! भीष्माने युद्धापूर्वी दोन्ही पक्षांतील प्रमुख वीरांचे मूल्यमापन दुर्योधनाच्या विचारण्यावरून केले त्यावेळी त्याने कर्णाला अर्धरथी ठरवले याचा कर्णाला राग आला होता. भीष्माने कर्णाच्या मूल्यमापनांत एका गोष्टीवर अचूक बोट ठेवले होते. त्याने ’कर्ण हा युद्धात बेसावध रहाणारा आहे’ अशी टीका केली होती. तसेच गुरूला फसवून मिळवलेली विद्या त्याच्या कामी येणार नाही असे म्हटले होते. कर्णाच्या अनेकांकडून झालेल्या पराभवांचे हेच कारण असावे. मात्र तो सामान्य योद्धा खासच नव्हता. कर्ण युद्धापासून अलिप्त राहिला यात भीष्माचाच हेतु साध्य झाला. आत्मसन्मान राखण्यापुरते थोडेसे युद्ध होऊन दोन्ही पक्षांमध्ये सन्माननीय तडजोड होऊ शकली तर बहुधा ती भीष्माला हवी होती. आततायी स्वभावाचा व दीर्घद्वेषी कर्ण बाजूला राहिला तरच कदाचित हे शक्य झाले असते. यासाठीच युद्धाची सूत्रे भीष्माने स्वत:च्या हातात ठेवली. त्याच्या अपेक्षेप्रमाणे कर्ण वागला!
भीष्मपतनानंतर पांच दिवस द्रोण सेनापति असताना व पुढील दोन दिवस स्वत: सेनापति होऊन कर्ण युद्धात सहभागी झाला. या सात दिवसांच्या युद्धवर्णनात कर्णाचा सहभाग असलेले अनेकानेक युद्धप्रसंग आहेत. अनेकांवर त्याने विजय मिळवला पण अनेकांनी त्याला हरवले व पळवून लाविले असेहि प्रसंग आहेत. अर्जुन व कर्णाची तुलना अटळ आहे. अर्जुन सर्व अठरा दिवस लढला व युद्धाचा प्रमुख भार भीमाच्या बरोबरीने, वा जास्तच, त्याने वाहिला. कर्णाची परिस्थिति तशी नव्हती. अर्जुनाचा, भीष्म सोडला तर इतर कोणीहि, द्रोणानेहि निर्णायक पराभव केला नाही. भीष्म व द्रोण या दोघांशीहि तो केवळ नाइलाजाने युद्धाला तयार झाला होता. अखेर भीष्म व द्रोण दोघांशीहि त्याची सरशी झालीच. त्रिगर्तांचा त्याने दररोज पराभव केला व सर्वांना मारले. पुढील भागात ही तुलना पुढे चालू ठेवू.

Sunday, November 2, 2008

महाभारतातील कर्णकथा - भाग १०

अज्ञातवास संपून पांडवांनी राज्याची मागणी केली. दुर्योधनाने ती नाकारली. अनेक वाटाघाटींनंतर अखेर कृष्णशिष्टाई झाली. भीष्म, द्रोण, विदुर, कृप व इतर अनेकांनी धृतराष्ट्र व दुर्योधन याना अनेकवार समजावले. त्या प्रत्येक प्रसंगी कर्णाने त्यांची कुचेष्टा केली व दुर्योधनाला युद्धाच्या भरीस घातले. त्यानेहि आधींच्या प्रसंगांवरून धडा न घेतां, माझा भरवसा मी स्वत:, दु:शासन व कर्ण यांच्यावरच आहे असे म्हटले. कृष्णशिष्टाईच्या वेळी कर्ण दरबारात उपस्थित होता पण चर्चेत त्याने भाग घेतलेला नाही. दुर्योधनाने कृष्णाचे बोलणे धुडकावून लावले व खुद्द कृष्णालाच पकडण्याचा विचार केला. या बेतांत दु:शासन, शकुनि व कर्ण सामील होते. कृष्ण पूर्ण तयारीने आला असल्यामुळे तो बेत सोडून द्यावा लागला. प्रयत्न झाला असता तर कर्ण तोकडाच पडला असता. शिष्टाई असफल झाली. कृष्णाने कुंतीची भेट घेतली व परतण्यापूर्वी तो कर्णाला एकांतात भेटला. कृष्णाने कर्णाला सांगितले कीं तूं कुंतीपुत्र आहेस व पांडवांचा मोठा भाऊ आहेस तेव्हा तूं पांडवांचा पक्ष घे. त्यापासून तूं, पांडव, यादव या सर्वांचाच फायदा होईल. तूं पांडवांचा राजा होशील, युधिष्ठिर युवराज होईल, इतर पांडव व यादवही तुझे अनुचर होतील, सर्व पांडवांची पत्नी या नात्याने द्रौपदी तुझीहि पत्नी होईल वगैरे अनेक गोष्टी सांगितल्या. कर्ण हा कुंतीपुत्र आहे हें कृष्णाला कसें माहीत? कुंतीनेच आदल्या दिवशी हे गुपित सांगून, आवश्यक तर ते कर्णालाहि सांगून त्याला वळवण्याचा प्रयत्न कर असे कृष्णाला विनवले असावे. महाभारत अर्थातच तसे स्पष्टपणे म्हणत नाही. पण शक्यता तीच आहे. कुंतीच्या संमतीशिवाय, कृष्णाने स्वत;हून कर्णाला तूं कुंतीपुत्र आहेस असे सांगणे अनुचितच व म्हणून असंभव वाटते. मात्र कर्ण कोणत्याही प्रलोभनाला बळी पडला नाही. सर्व आयुष्य सूत म्हणून वावरून व दुर्योधनाचा मित्र म्हणून त्याच्या आश्रयाने राहून सर्व मानसन्मान मिळवून अखेर त्याचा त्याग करण्याचे त्याने स्पष्टपणे नाकारले. कुंतीला अर्थातच त्याने दोष दिला. कर्ण वळत नाही असे पाहून मग कृष्णाने तुला हवा तसा मृत्यु तुला लवकरच रणांत मिळेल असे म्हणून, सात दिवसानी कार्तिक अमावास्येला युद्ध सुरू करूं असा त्याचेबरोबर दुर्योधनाला निरोप दिला व पांडवांकडे कृष्ण परत गेला.
युद्ध अटळ आहे हे कळल्यावर विदुर कुंतीला भेटला. कुंतीने त्यानंतर स्वत:च कर्णाची भेट घेऊन त्याचे मन वळवण्याचा अखेरचा प्रयत्न केला. हें तिला विदुराने सुचवले असावे असा माझा तर्क आहे. कारण कुंतीचे गुपित विदुराला माहीत होते! कुंतीचीहि विनवणी कर्णाने मानली नाही. सर्व जन्म राधेय म्हणून घालवल्यानंतर व अर्जुनाशी उभा दावा केल्यावर दुर्योधनाचा विश्वासघात करून अखेर मी पांडवांकडे गेलो तर अर्जुनाला मी घाबरलो असेच जग म्हणेल. मी तसे करणे धर्माला धरूनहि नाही असे त्याने कुंतीला समजावले. एकच गोष्ट कबूल केली कीं अर्जुनाकेरीज इतर पांडवांना मी मारणार नाही. मी किंवा अर्जुन कोणीहि मेला तरी तुझे पांच पुत्र जिवंत राहतील. कुंतीला एवढ्यावरच समाधान मानावे लागले.
कृष्ण किंवा कुंती यांनी यावेळीहि कर्णाचा खरा पिता कोण हे सांगितले नाहीच. सूर्यापासून जन्म हीच कथा चालू ठेवली! आपला पिता ब्राह्मण वा क्षत्रिय नाही हेंच कर्ण यावरून समजून चुकला असणार. युधिष्ठिर व इतर पांडव यांनी आपला वडील भाऊ म्हणून स्वीकार केला तरी वर्षानुवर्षे मनात बाळगलेली शल्ये कोणाच्याच मनातून जाणार नाहीत. जग मात्र आपल्याला स्वार्थी, भेकड व विश्वासघातकी म्हणेल व तरीहि क्षत्रिय म्हणणार नाहीच, हे जाणूनच त्याने कृष्ण व कुंतीच्या विनंतीचा अव्हेर केला.
या दोन्ही प्रसंगी कर्णाचे वर्तन धीरोदात्त झाले हे निश्चित. त्याच्या आयुष्यातील हे दोन्ही कसोटीचे क्षण होते व त्यातून तो तावून-सुलाखून उजळून निघाला हे नि:संकोचपणे मान्य केले पाहिजे.
यानंतर भारतीय युद्धातील कर्णाच्या कामगिरीचे निरीक्षण पुढील भागात करूं.