आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Wednesday, April 2, 2008

पांडवांचा अद्न्यातवास पुरा झालाच नाही - भाग १

महाभारतात अनेक कोडी आहेत त्यात मला जाणवणारे एक कोडे म्हणजे पाडवांचा अद्न्यातवास पुरा झाला कीं नाही? महाभारतकारांनी स्वत:चे स्पष्ट मत दिलेले नाही. दुर्योधनाने पांडवांचा दावा मुळीच मान्य केला नाही हे स्पष्टपणे नमूद केले आहे. महाभारतातील इतर अनेक प्रष्न या गोष्टीशी निगडित आहेत. त्यातील काही असे :-
१. कौरव आपल्या पक्षाला अनेक विख्यात राजे व अकरा अक्षौहिणी सैन्य जमवू शकले. त्यांचा पक्ष अन्यायाचा असेल तर हे कसे झाले?
२. भीष्म,द्रोण व कृप यांनी युद्धात कौरवांची बाजू घेण्याचे खरेंतर काही कारण नाही. अर्थस्य पुरुषो दास: हे दिलेले कारण पोरकट वाटते. कौरवांचा पराभव होऊन पांडव हस्तिनापुरचे राजे झाले असते तर त्यांनी या तिघानाहि सन्मानानेच वागवले असते. प्रत्यक्षात कृप पांडवांपाशी राहिलाच होता. मग या तिघानी युद्ध एवढे हिरिरिने कां लढवले?
३. युधिष्ठिराने प्रथम अर्धे राज्य मागितले होते, पण मागाहून संजयाबरोबर निरोप पाठवून फक्त पांच गावांवर समाधान मानण्याची तयारी दाखवली. हा त्याचा मोठेपणा खरा पण आपण अ द्न्यातवास पुरा केलेला नसल्यामुळे आपला दावा कच्चा आहे याची त्याला जाणीव होती हेहि कारण असू शकते!
४. युद्ध सुरू होण्यापूर्वी अनेकानी दुर्योधनाला युद्ध टाळण्याचा उपदेश केला. मात्र पांडवानी द्यूताचा पण पूर्ण केलेला असल्यामुळे तुला त्यांचे राज्य परत दिलेच पाहिजे असे कोणीहि म्हटले नाही! फक्त सर्वनाशाची भीति घातली. खुद्द कृष्णानेहि शिष्टाईच्या वेळी ’आम्ही द्यूताची अट पूर्ण केली आहे असा पांडवांचा दावा आहे” एवढेच म्हटले.
५. अर्जुन कौरवसैन्यासमोर प्रगट झाला दुर्योधनाने ’अद्न्यातवास पुरा झालेला नाही’ असे म्हटले. तेव्हा भीष्माने ’पांडवांनी सौरमानाने तेरा वर्षे पुरी केलेली दिसतात’ एवढेच म्हटले पण हे बरोबर की चूक यावर मत दिलेले नाही!
६ बलराम दुर्योधनाचा गुरु. पांडवानी जर अद्न्यातवास निर्विवादपणे पुरा केलेला असता तर त्याने दुर्योधनाला राज्य देण्यास सांगितले असते. त्याने तसे न करता उलट कृष्णालाच बजावले की पांडवाच्या दुर्दशेला युधिष्ठिरच जबाबदार आहे व आपणाला दोन्ही पक्ष सारखेच असल्यमुळे आपण युद्धापासून दूर रहाणेच योग्य!
७. नकुल-सहदेवांचा मामा, शल्य, पांडवांच्या सैन्यात सामील होण्यासाठी निघालेला असतां वाटेत दुर्योधनाची भेट झाल्यावर सरळ कौरवसैन्यात गेला! हे कसे झाले? आपला पक्ष अन्यायाचा नाही अशी त्याची खात्री पटवण्यात दुर्योधनाला यश आले. दुर्योधनाने काहीहि म्हटले तरी कौरवसैन्यात भीष्म असताना इतर कोणी सेनापति होण्याचा संभव नव्हताच.
७. राजा पांडु याचा मित्र असलेला राजा भगदत्त पांडवांऎवजी कौरवानाच मिळाला. कारण दिलेले नाही.
८. याउलट ज्या जरासंधाला भीमाने मारले वा शिशुपालाला कृष्णाने मारले त्यांचे पुत्र पांडवपक्षात होते!
यामुळे असे वाटते की पांडवांचा राज्यावर हक्क ज्या मूलाधारावर आधारलेला त्या पणाची अट पूर्ण केल्याच्या त्यांच्या दाव्यामध्येच काही कमतरता होती काय? कीं ज्यामुळे प्रत्येकाने आपल्याला योग्य वाटलेली बाजू घेतली?
या शंकेमुळे द्यूत, अनुद्यूत व त्यातून उद्भवलेला वनवास व अद्न्यातवास या घटनांची अभिनिवेश दूर ठेवून तपासणी करणे आवश्यक ठरते. पुढील भागात ती करूं.

1 comment:

Gamma Pailvan said...

प्रभाकरराव,

आपली अनुदिनी (ब्लॉग) वाचतोय. सुंदर आहे. पुढेमागे मलाही महाभारत मुळातून वाचायचंय. असो.

इथे दिलेले आपले प्रश्न समर्पक आहेत. मला वाटतं की अन्याय हा केवळ अज्ञातवासाच्या संबंधी नाही. तो द्रौपदीच्या अपमानाशीही तितकाच संबंधित आहे. अज्ञातवास पूर्तीच्या योगे पांडवांची बाजू जरा कच्ची पडत असली तरी संशयाचा फायदा त्यांना द्यायला बर्‍याच जणांची हरकत नसावी.

तसेच पांडवांचा दावा फक्त त्यांच्या हिश्श्यापुरताच मर्यादित होता. याउलट कौरवांचा दावा अख्ख्या राज्यावर होता. त्यामुळे कौरवांच्या पक्षाला एक अंगभूत हावरटपणा चिकटलेला वाटतो.

आपला नम्र,
-गामा पैलवान