आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Thursday, September 16, 2010

नलदमयंतीकथा भाग ७

पुष्कर व नल यांचे द्यूत अनेक दिवस चालले. कौरव-पांडवांच्या द्यूताप्रमाणे तें अर्ध्या दिवसांत संपले नाही. मात्र युधिष्ठिराप्रमाणेच नलही कायम हरतच होता पण द्यूत संपवीत नव्हता. राज्याच्या मंत्र्यांना भेटावयासहि त्याला सवड नव्हती. दमयंतीला काय करावे हे काहीच सुचत नव्हते. तिने नलाला निरोप पाठवले कीं ’इतकें धन गेलें व इतकेच शिल्लक आहे.’ परिणाम शून्य! शेवटीं तिने वार्ष्णेय नावाच्या विश्वासू सारथ्याला बोलावून घेऊन त्याच्या बरोबर आपल्या दोन्ही मुलांना माहेरीं पाठवून दिलें. वार्ष्णेयाला सांगितले ’मुलांना पोंचवून व रथ तेथेच सोडून तूं निघून जा कारण राजाला आतां तुझा उपयोग होईल असे दिवस राहिलेले नाहीत.’ वार्ष्णेयाने त्याप्रमाणे केलें. तो दुसर्‍या ऋतुपर्ण नावाच्या राजाचे पदरीं नोकरीला राहिला. इकडे दमयंतीने येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याची मनाची तयारी केली. सर्व धन संपत्ति हरून नल निष्कांचन झाला. पुष्कराने, नलाला (शकुनिप्रमाणेच)) ’दमयंतीला पणाला लाव’ असें सुचवलें. मात्र नलाने ती मर्यादा ओलांडली नाहीं. सर्वस्व हरल्यामुळे नल व दमयंती नेसत्या वस्त्रानिशी नगराबाहेर पडलीं. पाठोपाठ आलेल्या नगरजनाना परत पाठवून दोघें वनांत शिरलीं. नलाची दुर्दशा होऊनहि ’कली’चे समाधान झालेले नव्हते असे महाभारत म्हणते.
रात्रीं उपाशींपोटीं वनात भटकत असताना दमयंतीला ग्लानि येऊन झोपली असताना नलाला तीन सोनेरी पक्षी जमिनीवर दाणे टिपताना दिसले. त्यांना पकडावे म्हणून नलाने नेसते वस्त्र सोडून त्यांच्यावर टाकले पण ते वस्त्रच घेऊन ते पक्षी उडून गेले. दमयंतीच्याच वस्त्राचा थोडा भाग फाडून घेउन नलाने तो कमरेला गुंडाळला. त्याने आधी दमयंतीला ’तूं माहेरीं या अमुक रस्त्याने जा’ असें दाखवले होतें पण अशा आपत्काळीं त्याला सोडून जायचे तिने साफ नाकारले होते. आतां अर्ध्या वस्त्रावर पाळी आली तेव्हां नलाने विचार केला कीं आपण हिला झोपेत असताना सोडून गेलो तर ही नाइलाजाने माहेरीं जाईल, आता दुसरा इलाजच नाहीं. म्हणून अतिशय दु:खी अंत:करणाने दमयंतीला तशीच एकटी, अर्ध्या वस्त्रांत व निद्रित अवस्थेत सोडून नल वेगळ्या रस्त्याने निघून गेला. ’कली’ने नलाला म्हटलें ’तुम्ही दोघें वस्त्रांत होतांत तेंहि मला पाहवलें नाहीं म्हणून द्यूताचे तीन फासेच मी पक्षीरूपाने तुझ्याकडे पाठवले होते, आतां माझे कार्य झाले तुझी पुरती दुर्दशा झाली.’ याचा अर्थ असा विचार नलाच्या मनात आला एवढाच घ्यावयाचा असे मला वाटते.

2 comments:

Ashwin said...

महाभारतात अनेक उपाख्याने प्रक्षिप्त वाटतात. त्या त्या काळाची गरज म्हणून सौतिने ही उपाख्याने महाभारतात घेतली असावीत.नल दमयंती आख्यान हे इतके प्रदीर्घ आहे, की ते प्रक्षिप्तच असावे, असा तर्क करता येतो. बलरामाच्या तीर्थयात्रेचे आख्यान पण असेच एक. परन्तु या सर्व आख्यानांनी महाभारतास एक वेगळे सौन्दर्य दिलेले आहे.

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

महाभारतात अनेक उपकथानके आहेत. जय-भारत-महाभारत असा क्रमाने विस्तार होत गेला असे मानले जाते. ’प्रक्षिप्त’ कशाला म्हणावे याच्या विद्वानांच्या कसोट्या मला माहीत नाहीत त्यामुळे त्याबद्दल मी मत देऊ इच्छित नाहीं.