आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Tuesday, March 10, 2015

कृष्ण आणि पांडवांचे आयुर्मान


भारतीय युद्धानंतर पांडव व कृष्ण ३६ वर्षे जगले असे महाभारत म्हणते. त्यावेळी त्यांचे किती वय झाले होते? ते स्पष्ट्पणे लिहिलेले मला आढळले नाही. पण अंदाज बांधता येतो. युद्धसमयी अभिमन्यूचे वय २५ वर्षे असावे असे मी पूर्वीच्या एका लेखात म्हटले आहे. अर्जुनाचे सुभद्रेशी लग्न झाले तोवर तो किमान ३५ वर्षांचा झाला होता. कारण, लाक्षागृहातून सुटल्यावर काही वर्षे वनात व एक वर्ष एकचक्रा नगरीत गेलीं. द्रौपदीशी विवाह झाल्यावर २-३ वर्षातच त्याला घराबाहेर पडावे लागले. उलुपी, चित्रांगदे बरोबर २-३ वर्षे घालवून मग तो द्वारकेला गेला. तोवर तो सहजच ३५ वर्षांचा झाला होता. युद्धसमयीं त्यामुळे त्याचे वय ६० असले पाहिजे. त्यावर ३६ अधिक मोजले कीं त्याचे आयुष्य ९६ ते १०० ठरते. कृष्ण अर्जुनापेक्षा थोडासाच मोठा कारण तो भीमाच्या वयाचा. कृष्ण पांडवांचे आधीच थोडा काळ मृत्यु पावला तेव्हा त्याचेहि आयुष्य १०० चे जवळपासच म्हटले पाहिजे. श्री निलेश ओक यानी ते ११६ वर्षे होते असे म्हटले आहे ते पटत नाही कारण ते मानले तर युद्धसमयी अर्जुन, भीम, कृष्ण, दुर्योधन सर्व जवळपास ८० वर्षांचे तर कर्ण ८७-८८ वर्षांचा होता असे ठरते. अभिमन्यूच्या जन्माचे वेळी अर्जुन ५५ वर्षांचा मानावा लागतो. हे सर्व अवास्तव वाटते. पटते का पहा!

Saturday, March 7, 2015

कर्णाचा रथ चिखलात कां रुतला?


भारतीय युद्धामध्ये दोन्ही पक्षांकडून अनेक रथी-महारथी लढले. सतराव्या दिवसापर्यंत कोणाच्याही रथाचे चाक चिखलात रुतले नाही. सतराव्या दिवशी संध्याकाळी कर्णाच्या रथाचे चाक चिखलात रुतले. त्यानंतर अर्जुनाने त्याचा वध केला. कृष्णाने शिष्टाईच्या दिवशी परत जाताना कर्णाला म्हटले होते कीं आता पावसाळा संपला आहे, चिखलाचे नावहि नाही तेव्हा युद्धाला अनुकूल काळ आहे. प्रत्यक्षातहि कर्णाच्या एका अपवादाव्यतिरिक्त कृष्णाचे म्हणणे खरेच ठरले. कर्णाचा रथ कां रुतला या बद्दल माझा तर्क असा – अर्जुनाचे सारथ्य कृष्ण करत होता तर कर्णाचे, शल्य. कृष्ण अर्जुनाचा रथ नेहमीच अतिशय कौशल्याने चालवत होता. उदा. जयद्रथवधाचे दिवशी, अर्जुन द्रोणाचार्याशी लढत न बसतां पुढे निघून गेला. दुर्योधनाने द्रोणाला विचारले कीं असे कसे झाले? द्रोणाने म्हटले कीं कृष्ण रथ एवढ्या जोराने चालवतो कीं तो जाऊं लागल्यावर माझे बाणच त्याचेपर्यंत पोचेनात! असे इतरहि उल्लेख आहेत. शल्याचे कौशल्य कदाचित तुलनेने कमी पडत होते. दोन दिवस कर्ण-अर्जुन दोघांचे रथयुद्ध चालू होते. शत्रूला आपल्या रथाच्या अनुकूल बाजूला घेण्यासाठी दोन्ही सारथ्यांच्या आपल्या रथाच्या विशिष्ट हालचाली, डाव, प्रतिडाव चालले असणार. कृष्णाने हळूहळू शल्याला कुरुक्षेत्रातील उताराच्या, पाणथळ भागाकडे खेचले व त्याची हालचालींची जागा (maneuvering space) कमी करत आणली, अखेर चिखलभागापासून शल्य दूर राहू शकला नाही. व कर्णाच्या रथाचे चाक रुतले! कृष्णाच्या सारथ्यकौशल्याचा हा परिणाम होता. कृष्णाला दैवी गुण चिकटवणे मला मुळीच मान्य नाही. पण त्याच्या सारथ्यकौशल्याला दाद देणे योग्यच आहे.

Monday, February 23, 2015


बर्‍याच काळानंतर आज पुन्हा या ब्लॉगवर काही लिहायला बसलो आहे. खरे तर बराच काथ्याकूट करून झाला आहे त्यामुळे पुनरुक्ति अनेकवार झाली आहे. नवल म्हणजे अजूनहि या ब्लॉगला वाचक भेटताहेत व पसंतीच्या ई-मेलहि येतात. हल्ली भारतात असल्यामुळे पुन्हा महाभारत हाताशी आहे.काही कारणामुळे पुन्हा थोडे वाचलेहि जात आहे. त्यात नजरेला आलेली एक शंका वाचकांसमोर ठेवत आहे. कृष्ण हा पांडवांचा कैवारी, सल्लागार, आणि मित्र. द्रौपदी आणि कृष्ण यांचे भावा-बहिणीचे नाते आदर्श मानले जाते. असे असताना युद्धाच्या अखेरच्या दिवशी जो भीषण संहार अश्वत्थाम्याने पांचाल शिबिरात रात्री घडवून आणला त्याबद्दल एक शंका मनात येते. अठराव्या दिवशी दुर्योधन भीमाच्या गदाप्रहाराने जखमी होऊन पडला व तो आता मरेलच याची खात्री वाटल्यामुळे त्याला तसेच टाकून पांडव, कृष्ण, सात्यकी व पांचालवीर शिबिराकडे परतले. युधिष्ठिराने कृष्णाला म्हटले कीं सर्व कौरवांचा निःपात झाला, दुर्योधनहि मरणासन्न आहे हे वर्तमान धृतराष्ट्राला कळवण्याचे काम तूच कर कारण त्याच्या रागाला तोंड द्यायची आमची तयारी नाही. कृष्णाने ते काम केले. परतल्यावर त्याने पांडव व सात्यकी याना सल्ला दिला की आजची रात्र तुम्ही शिबिरात राहू नका. असा सल्ला कां दिला याचा खुलासा महाभारतात नाही. अश्वत्थामा, कृप व कृतवर्मा वाचले आहेत व पळून गेले आहेत हे पांडव व कृष्ण याना ठाउक होते. असे मानले जाते कीं अश्वत्थामा पित्याच्या वधामुळे धृष्टद्युम्नावर फार रागावलेला आहे त्यामुळे तो काहीतरी आतताई कृत्य करील या भीतीने कृष्णाने पांडवाना तो सल्ला दिला आणि त्या सल्ल्यामुळे पांडव वांचले! सर्वच गोष्टींचे श्रेय कृष्णाला देणारे याचेहि श्रेय कृष्णाला देतात. मात्र यामुले अनेक प्रष्न उभे राहतात! १. कितीहि थकले-भागले असले तरी, पाडव, सात्यकी, कृष्ण शिबिरात असते तर अश्वत्थाम्याची काहीहि करण्याची हिम्मतच झाली नसती. तो त्याना घाबरत होता असा उल्लेखच आहे! मग शिबिरात सावध राहाण्याचा सल्ला देण्याऐवजी बाहेर रहाण्याचा सल्ला कसा दिला गेला? २. शिबिरात पांडव, कृष्ण, सात्यकी नाहीत हे अश्वत्थाम्याला कसे कळले? ३. पांडवाना बाहेर काढले पण द्रौपदीच्या पांच पुत्राना मात्र पांचालशिबिरातच राहूं दिले! त्यांच्या सुरक्षिततेची काळजी वाटली नाही? ४. स्वतःच्या बहिणीचा पुत्र अभिमन्यु मारला गेला होता पण त्याची पत्नी गर्भवती होती. द्रौपदीपुत्र जिवंत राहिले असते तर पांडवांच्या पश्चात प्रतिविंध्याकडे राज्य गेले असते अभिमन्युपुत्राकडे नव्हे! हे कृष्णाला नको होते कीं काय? एक दुष्ट शंका! ५. सर्व वनवास-अज्ञातवासाचा काळ अभिमन्यु द्वारकेला होता पण द्रौपदीपुत्र द्रुपदापाशी होते. त्यांच्यावर पांचालांचे,धृष्टद्युम्नाचे संस्कार प्रबळ झाले होते. आता पांडव कुरुराज्याचे सत्ताधीश झाले असते पण त्यांच्यावरहि पांचालांचे वजन जास्त राहिले असते. कृष्णाला हे नको होते कीं काय? ६. कृष्ण हा पक्का राजकारणी आहे. पांचालांचा प्रभाव वाढू नये असा प्रयत्न त्याने करणे असंभव नाही. प्रत्यक्षात, हस्तिनापुराचे राज्य पांडवांनंतर अभिमन्युपुत्र परिक्षिताकडे गेले व इंद्रप्रस्थाचे राज्य कृष्णाच्या नातवाकडे गेले असे महाभारत म्हणते! वाचकाना काय वाटते ते त्यानी अवश्य कळवावे.

Saturday, May 4, 2013

कृष्ण-कर्ण संवाद - भाग ४

या सर्व घटनांचा सुसंगत व तर्कशुद्ध कालानुक्रम माझ्या मते असा आहे. १ शिष्टाई संपल्यावर कृष्ण कुंतीला भेटून लगेच परत गेला. २ पांडवांकडे सर्व युद्धबेत ठरून सैन्यासह ते पुष्य नक्षत्रावर वा आधी कुरुक्षेत्रावर गेले. ३ कौरव सैन्यहि दुर्योधनाच्या आदेशाप्रमाणे पुष्य नक्षत्रावर कुरुक्षेत्री गेले त्यापूर्वीच कुंतीने कर्णाची गुप्तपणे गाठ घेऊन त्याचे मन वळवण्याचा असफल प्रयत्न केला. कदाचित तिने कृष्णाला गुपित सांगून कर्णाचे मन वळवण्याची त्याला सूचना केलीहि असेल पण कृष्णाने मात्र लगेचच तसे केले नव्हते. ‘तूंच त्याला भेट, तेच जास्त उचित’ असेच त्याने कुंतीला म्हटले असावे. मात्र कर्ण कौरव शिबिरात उपस्थित झालेला असल्यामुळे कुंतीचा प्रयत्न असफल झाल्याचे उघड झाले. ४ त्यामुळे कृष्णाने अखेरच्या क्षणी (मघा वा पूर्वा नक्षत्रदिनी, शिष्टाईच्या दिवशीं नव्हे,) युद्ध टाळण्याचा निर्वाणीचा प्रयत्न म्हणून कर्णाची गुप्त भेट घेतली. मी कुंतीपुत्र आहे हे मला माहीत आहे’ असे या भेटीत कर्ण कृष्णाला म्हणाला असा स्पष्ट उल्लेख आहे. कुंती भेटली तेव्हां मात्र तो असे काही म्हणाला नव्हता!. कुंती त्याला कृष्णाचे आधीच भेटली असेल तर कर्णाने कृष्णापाशी केलेले ते विधान सुसंगत आहे. मात्र दुर्योधनाची बाजू सोडण्याचे कर्णाने मानले नाहीच. उलट,‘तुझी-माझी भेट व माझे जन्मरहस्य गुप्तच राहूदे’ असे त्याने कृष्णाला विनविले. ५ तेव्हा, हाही प्रयत्न विफल झाल्यावर मात्र, कृष्णाने त्याला ‘तर मग आठ दिवसानी अमावास्येला युद्ध सुरू करूं’असे म्हटले व त्याप्रमाणे ते झाले ६ त्यानंतर मात्र कुंती, कर्ण व कृष्ण यानी कुंतीचे गुपित अखेरपर्यंत सांभाळले. कौरवांना ते कधीच कळले नाही. कृष्णाने ‘हे मला माहीत होते’ असे कोणाही पांडवापाशी वा इतर कोणाशीं कधीहि म्हटले नाही व अखेर कुंतीलाच ते युधिष्ठिरापाशी उघड करावे लागले. त्यावेळीहि कृष्णाने ‘हे मला माहीत होते’ असे युधिष्ठिराला म्हटले नाही! नाहीतर युधिष्ठिराने कुंतीप्रमाणेच त्यालाही दोष दिला असता. या घटनाक्रमामध्ये कोणतीहि अनैसर्गिक वा अतार्किक गोष्ट नाही. या संदर्भातील उल्लेख केलेल्या विसंगति महाभारतात कालांतराने भर पडताना अनवधानाने आल्या असाव्या असे वाटते.

Wednesday, May 1, 2013

कृष्ण-कर्ण संवाद - भाग ३

मुळात या तथाकथित कृष्ण-कर्ण संवादाचा उल्लेखहि महाभारतात सरळ निवेदन-रूपाने आलेला नाहीं. महाभारत म्हणते, कृष्णाने कर्णाला परत जाताना आपल्या रथावर घेतले होते वत्यांची दीर्घ चर्चा झाली हे कळल्यामुळे, (कदाचित काळजी वाटून), धृतराष्ट्राने 'त्यांचे काय बोलणे झाले?' असे संजयाला विचारले व मग संजयाने ते सर्व धृतराष्ट्राला सांगितले! हे अशक्यच वाटते! कुंतीने आयुष्यभर जपलेले गुपित तिने, नाइलाजाने, कृष्णाला आणि कृष्णाने ते कर्णाला सांगितले असे घटकाभर मानले तरी ते संजयाला कसे कळणार? आणि संजयाला कळून त्याने धृतराष्ट्राला सांगितले तर मग ते फुटलेच कीं व मग अर्थातच दुर्योधन-भीष्म-द्रोणापासून युयुत्सुपर्यंत सर्वच कौरवांना कळले म्हटले पाहिजे! एकट्या युधिष्ठिरापासूनच ते गुह्य राहिले? हे अतर्क्यच आहे. तेव्हां हा संजय-धृतराष्ट्र संवाद प्रक्षिप्त मानला पाहिजे. कृष्ण-कर्ण भेट होणे व कृष्णाने युद्ध टाळण्याचा अखेरचा प्रयत्न करणे त्याच्या शिष्टाईच्या भूमिकेशी सुसंगत आहे. मात्र हा प्रसंग (मागाहून केव्हा तरी, कदाचित कृष्ण माहात्म्य वाढवण्यासाठी) महाभारतात शिरला तेव्हा तो सरळ निवेदन रूपाने न येता, गफलतीने, संजय-धृतराष्ट्र संवाद रूपाने शिरला! (शिष्टाई संपवून परत जाण्यापूर्वी कृष्ण कुंतीला भेटला तेव्हां तिने त्याचेबरोबर आपल्या मुलांना ‘आतां सर्व शक्तीनिशी युद्ध करा, तेच क्षत्रिय या नात्याने तुमचे कर्तव्य आहे’ असा स्पष्ट आदेश दिला. हा विदुराघरी झालेला संवादहि धृतराष्ट्राला कळला व त्याने पुन्हा एकदा दुर्योधनाला उपदेश केला असा उल्लेख आहे! हे धृतराष्ट्राला कसे कळले याचा मात्र काही खुलासा केलेला नाही.) मग खरोखर काय घडले?

Saturday, April 27, 2013

कृष्ण-कर्ण संवाद - भाग २

कृष्ण उपप्लव्याहून शिष्टाईसाठी निघाला त्यादिवशी ‘रेवती’ नक्षत्र होते असा उल्लेख आहे. मार्गात एकच रात्र कृष्णाने मुक्काम केला व दुसर्‍या दिवशी तो हस्तिनापुराला पोचला असे म्हटलेले आहे. त्या दिवशी दुर्योधनाचे आतिथ्य नाकारून तो विदुराकडे मुक्कामाला राहिला. तिसरे दिवशी कौरवदरबारात शिष्टाई झाली. संध्याकाळपर्यंत ती अयशस्वी ठरून कृष्ण विदुराकडे परत येऊन कुंतीला भेटला व मग पांडवांकडे परत निघाला. या दिवशी ‘भरणी’ नक्षत्र असणार कारण रोज एक नक्षत्रातून चंद्र पुढे जातो. हा कार्तिक मास होता हे गृहीत धरल्यास अमावास्येला चंद्र ‘ज्येष्ठा’नक्षत्रापर्यंत पोचणार होता. (पौर्णिमेला-शिष्टाईच्यादुसर्‍या दिवशी-तो कृत्तिका नक्षत्रात पोचणार होता कारण हा कार्तिकमास). ‘भरणी’ पासून ‘ज्येष्ठा’पंधरा नक्षत्रे पुढे आहे! तेव्हां शिष्टाईच्या या दिवसापासून आठच दिवसानी अमावास्या येणे शक्यच नाही! तेव्हां जर कृष्णाने ‘आठ दिवसांनी अमावास्या आहे त्या दिवशी युद्ध सुरू करूं’ असे कर्णाला म्हटले असेल तर हा संवाद झाला त्या दिवशी ‘मघा’ किंवा ‘पूर्वा’ नक्षत्र असले पाहिजे होते जे शिष्टाईच्या दिवशीच्या भरणी नक्षत्रानंतर ७-८ दिवसांनी येणार होतें! तोंवर कृष्ण हस्तिनापुरात होता कोठे? तो केव्हाच परत गेला होता! कृष्ण शिष्टाईच्याच दिवशी परत गेला असला पाहिजे असे दुसर्‍या संदर्भावरूनहि निश्चित ठरते. पांडवांकडे तो परतल्यावर मग शिष्टाईबद्दल सर्व चर्चा झाली, युद्ध अटळ आहे हे स्पष्ट झाले, मग पांडवपक्षाच्या सर्व वीरांची बैठक झाली, चर्चेअंती धृष्टद्युम्नाला सेनापति नेमले गेले, पांडव वीर व सैन्य कुरुक्षेत्रावर पोचले, रुक्मीने येऊन सहाय्य देऊ केले ते पांडवानी उडवून लावले व तो निघून गेला वगैरे घटना घडल्या. मग बलराम शिबिरात आला व युद्ध होणारच हे कळल्यावर,‘मला हे युद्ध पहावयाचे नाही म्हणून मी तीर्थयात्रेला जातो’असे कृष्णाला व पांडवाना म्हणून लगेच शिबिर सोडून गेला. येथे नक्षत्राचा उल्लेख नाही. तो नंतर भीम-दुर्योधन गदायुद्ध १८व्या दिवशी झाले तेव्हां उपस्थित झाला. त्याने तेव्हां मात्र म्हटले कीं ‘मी पुष्य नक्षत्रावर निघालो होतो तो आज श्रवण नक्षत्रावर (४२ दिवसानी) परत येतो आहे.’अर्थ इतकाच कीं पुष्य नक्षत्राच्या बलराम-पांडव भेटीच्या व आधीच्या पांडवशिबिरातील वर वर्णन केलेल्या सर्व घटनांच्या दिवशीहि कृष्ण पांडवांच्या शिबिरात होता. ‘भरणी’ नक्षत्राच्या शिष्टाईच्या दिवसापासून या सर्व घटनांमध्ये ४-५ दिवस गेले होते. मग कृष्ण कर्णाला भेटला असेलच तर यानंतर दुसर्‍या वा तिसर्‍या दिवशी, मघा वा पूर्वा नक्षत्राच्या दिवशीं, गुप्तपणे भेटला काय?

Tuesday, April 23, 2013

कृष्ण – कर्ण संवाद.

बर्‍याच काळानंतर आज पुन्हा एकदा या ब्लॉगवर काही लिहिण्याचा विचार आहे. कृष्णशिष्टाई या विषयावर पूर्वी या ब्लॉगवर दीर्घ लेखन केले आहे. त्यातील अखेरचा भाग म्हणजे कृष्ण-कर्ण संवाद. संक्षिप्तपणे हकिगत अशी - कौरव-पांडव युद्ध टाळण्याचा अखेरचा प्रयत्न म्हणून कृष्णाने कौरवदरबारात जाऊन पांडवांची बाजू मांडून आटोकाट प्रयत्न केले. दुर्योधनाने अज्ञातवास पुरा केल्याचा पांडवांचा दावा सपशेल फेटाळून लावला व राज्य पाहिजे तर आणखी बारा वर्षे वनवास करा असा जबाब दिला. शिष्टाई असफल झाल्यानंतर परत जाताना कृष्णाने कर्णाला आपल्याबरोबर आपल्या रथावर घेऊन वाटेत त्याला ‘तूं कुंतीपुत्र आहेस म्हणून दुर्योधनाची बाजू सोडून दे व पांडवपक्षात ये’ असे आवाहन केले. मात्र ते कर्णाने नाकारले. अखेर त्याचा निरोप घेताना कृष्णाने ‘ आठ दिवसानी अमावास्या आहे, त्या दिवशी कुरुक्षेत्रावर भेटूं व युद्ध सुरू करूं’असा कौरवांसाठी निरोप दिला व मग कृष्ण पांडवांकडे परतला असा कथाभाग महाभारतात आहे. तो सर्वसाधारणपणे खरा मानला जातो व मलाहि तसे पूर्वी वाटत होते. मला एकच प्रश्न पडला होता कीं कर्णाचे जन्मरहस्य कृष्णाला कसे माहीत असणार? त्यावर मलाच सुचलेले उत्तर असे होते कीं शिष्टाई विफल झाल्यावर संध्याकाळी, परत जाण्यापूर्वी कृष्ण कुंतीला भेटला होता तेव्हां खुद्द कुंतीनेच हे रहस्य कृष्णाला सांगून ‘अवश्य तर हे तूं कर्णाला सांग पण कर्ण व पांडव या भावांचा युद्धप्रसंग टाळ’असे त्याला म्हटले असेल! (कर्णाने कृष्णाला दाद दिली नाही असे कळल्यावर मग तिने अखेरचा प्रयत्न म्हणून स्वतःच कर्णाची भेट घेतली व ‘तूं माझा पुत्र आहेस तेव्हां कौरवांची बाजू सोड’असे विनवले, तेहि कर्णाने मानले नाहीच.) या कृष्ण-कर्ण भेटीनंतर आठ दिवसानी कार्तिक अमावास्या होती व त्या दिवशी युद्ध सुरू झाले असे मानले जाते पण हा कालानुक्रम व घटनाक्रम खरा आहे काय? कित्येक उल्लेख याचेशी विसंगत आहेत.