आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Wednesday, June 16, 2010

नलदमयंती कथा - भाग 3

नल हा निषध देशाचा राजा. त्याच्या अनेक गुणांचे ऋषि बृहदश्व यांनी वर्णन केले त्यांत तो सुंदर, अश्ववेत्ता, द्यूतप्रेमी, शूर, प्रजाहितदक्ष असल्याचे म्हटले आहे. दमयंती ही विदर्भ देशाची राजकन्या रूपवान व गुणवान होती. एकमेकांचे गुण कर्णोपकर्णी एकमेकांना कळून, प्रत्यक्ष न पाहतांच ती एकमेकांच्या प्रेमांत पडलीं होतीं. प्रेमविव्हल होऊन उपवनांत बसला असतां नलाने एका सोनेरी पंखांच्या हंसाला पकडले. त्याने विनवले कीं मला जिवंत सोडलेस तर मी दमयंतीला भेटून तिच्यापाशी तुझे गुणवर्णन करीन. नलाने त्याला सोडले व हंसाने देशांतराला जाऊन दमयंतीला भेटून नलाच्या रूपगुणांचे वर्णन तिला ऐकविले. ते ऐकून दमयंतीने ’तूं नलापाशी माझे वर्णन कर’ असे हंसाला म्हटले. त्याप्रमाणे हंसाने नलाकडे परत येऊन झालेली हकीगत त्याला सांगितली. हंस हा प्रेमदूत ही कल्पना कालिदासाच्या मेघदूतासारखीच आहे. महाभारत आधीचे, तेव्हां कालिदासाने नलदमयंतीच्या कथेवरून यक्षाने मेघाला दूत करण्याची कल्पना उचलली काय़? कसेहि असले तरी दोन्ही कल्पना रम्यच हे खरे.
नलाचें हंसकृत वर्णन ऐकून दमयंतीचा प्रेमरोग बळावला! एकंदर लक्षणे पाहून तिच्या पित्याने तिचें स्वयंवर ठरवलें व सर्व राजेलोकांना आमंत्रणे धाडलीं त्यांत नलहि होताच. स्वयंवर आहे म्हटल्यावर मोठ्या आशेने नल स्वयंवराला निघाला. वाटेत काय झाले ती कथा फारच मजेशीर आहे. ती पुढल्या भागांत.

Friday, June 4, 2010

नलदमयंती कथा - भाग २

बृहदश्वाने ही कथा युधिष्ठिराला कां ऐकविली याचे कारण असे कीं बृहदश्वापाशी युधिष्ठिराने गार्‍हाणे गाइले की ’फासे खेळण्यात पटाईत असलेल्या धूर्त जुगार्‍यांनी मला बोलावून माझे सर्व धन व राज्य हरण केले, मी अत्यंत दु:खी होऊन कष्टाने वनवास भोगीत आहे. माझ्या दु:खाने पीडित झालेल्या मित्रांचीं संतापजनक भाषणे माझ्या हृदयात आहेत. अस्त्रविद्या मिळवण्यासाठी मी अर्जुनाला दूर पाठवले आहे पण त्याच्या विरहाने आम्ही हवालदिल आहोत. माझ्यासारखा दुसरा कोणी भाग्यहीन राजा या पृथ्वीवर असेल काय? आपण अशा कोणाला पाहिले आहे काय? माझ्यापेक्षा दु:खी दुसरा कोणी नसेल.’
त्यावर बृहदश्वाने म्हटले कीं ’तुला वाटते तसे नाहीं. तुझ्याहूनहि भाग्यहीन आणि दु:खी राजाची कथा तुला सांगतो. निषध देशाच्या वीरसेन राजाचा पुत्र नला, जो धर्मार्थवेत्ता होता, तो बंधु पुष्कराकडून द्यूतांत जिंकला गेला आणि त्याने पत्नीसह वनवासाचे दु:ख भोगले. त्याच्या बरोबर सेवक, रथ, बंधुबांधव नव्हते. त्याच्याजवळ यापैकीं कांहींच राहिले नव्हते. तूं तर वीरबंधूंनी युक्त असून श्रेष्ठ व विद्वान ब्राह्मणांनीहि वेढलेला आहेस तेव्हां तूं शोक करणे योग्य नाहीं’
आपली विपत्ति ज्यालात्याला असह्य वाटते पण आपल्याहूनहि अधिक विपत्ति भोगलेले व भोगत असलेले अनेक असतातच त्यांचेकडे पाहून विवेकाचा आश्रय करणे हेच उचित हे चिरंतन सत्य येथे या संवादानिमित्ताने समॊर मांडलेले आहे. महाभारतात असा वैचारिक अनुभव जागोजागीं येतो. त्यासाठी श्रद्धेवांचून अडत नाहीं.

Tuesday, June 1, 2010

नलदमयंती कथा - भाग १

पुन्हा सुरवात करताना काय लिहावे असा विचार करताना नल-दमयंतीची कथा नजरेसमोर आली. या कथेत अद्भुत भाग पुष्कळ आहे मात्र तरीहि काही नवीन दृषिकोनातून लिहिता येईल असे वाटल्यामुळे सुरवात करीत आहे. आपल्या प्रतिसादांची प्रतीक्षा आहेच.
महाभारतातील हे एक अप्रतिम उपाख्यान आहे. यातील अद्भुत भाग सोडून जर कोणी पटकथा लिहिली तर एक सुंदर सिनेमा बनेल. अद्याप माझ्या माहितीप्रमाणे कोणी केलेला नाही.
पांडव द्यूतात हरून बारा वर्षांच्या वनवासात गेल्यावर कौरवांवर सूड उगवण्यासाठी द्रौपदी व भीम उतावळे झाले होते. तेरा वर्षे फुकट न घालवतां लगेच कौरवांवर चाल करावी असा त्यांचा आग्रह होता. द्यूताचा कैफ उतरल्यावर युधिष्ठिराला मात्र परिस्थितीचे उत्तम भान होते. भीम, द्रौपदी, कृष्ण, यादव, पांचाल यांनी कितीहि भरीस घातले तरी १२ वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास हा पण मोडून ताबडतोब युद्धाला उभे राहण्यास तो मुळीच तयार नव्हता. मात्र वचन मोडावयाचे नाही या विचाराबरोबरच दुसरे मुख्य कारण म्हणजे लगेच युद्ध उभे केले तर भीष्म-द्रोण पूर्ण ताकदीने कौरवांची बाजू घेतील, इतर अनेक महावीर (त्यांत प्रमुख कर्ण, अश्वत्थामा, भूरिश्रवा) दुर्योधनाच्या मदतीला आहेत व विजय सहजीं मिळणार नाही हे तो जाणून होता. आरण्यकपर्वातील अध्याय ३६ मध्ये श्लोक १ ते २० मध्ये त्याने हे भीमाच्या गळीं उतरवले आहे ते मुळातून वाचण्यासारखे आहे. आपली बाजू बळकट करण्यासाठी, व्यासांच्या सांगण्याप्रमाणे, अर्जुनाला अस्त्रविद्येतील पुढील शिक्षणासाठी व तपाचरण करून देवांना संतुष्ट करण्यासाठी त्याने दूर पाठवले व ’तुझ्यावर आमचा सर्व भार आहे आणि भीष्म-द्रोणांच्यापेक्षा जास्त अस्त्रज्ञान तुझ्यापाशी आल्याशिवाय आपला विजय होणार नाही’ याची त्याला स्पष्ट कल्पना दिली. अर्जुनाने प्रत्यक्ष महादेव व इंद्र यांचकडून नवीन अस्त्रविद्या संपादन केली. (माझ्या मतें त्याने ती वनातील अनार्य - किरात - योद्ध्यांकडून मिळवली! मात्र युद्धाचे प्रारंभीं ’माझ्यापाशीं जी अस्त्रे आहेत त्यांचे ज्ञान भीष्माला वा द्रोणालाहि नाहीं’ असें तो अभिमानाने त्यामुळेच म्हणूं शकला.) नंतर तो स्वर्गात इंद्रापाशी आहे असे व्यासांकडून पांडवांना कळले व ते त्याच्या परत येण्याची वाट पाहात होते. अशा काळात एकदां बृहदश्व नावाचे एक ऋषि पाडवांकडे आले. त्यांनी नल-दमयंतीची कथा पांडवांना ऐकवली. ती पुढील भागांत पाहूं.