आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Friday, December 31, 2010

’स्टार माझा’ स्पर्धा

आज महाभारत थोडे बाजूला ठेवावे म्हणतो. (एवीतेवी आता ते संपतच आले आहे!)
ठरल्याप्रमाणे रविवार दि. २५ डिसेंबरला ’स्टार माझा’च्या वरळी येथील स्टुडिओत स्पर्धेचा बक्षीससमारंभ पार पडला. सर्वच स्पर्धक उपस्थित राहिले नव्हते तरी उपस्थिति चांगली होती. माझ्या या ब्लॉगला बक्षीस असल्यामुळे मी उत्सुकतेने गेलो होतो. ’हे TV Channel चे शूटिंग म्हनजे काय असते रे भाऊ?’ अशी मुख्य उत्सुकता होती! कार्यक्रम मजेत पार पडला. बर्‍याच ब्लॉगलेखकांचा कमीजास्त परिचय झाला. अनेकांचे चेहेरे ब्लॉगांवर पाहिलेले होते. श्री. प्रमोद देवहि उपस्थित होते. त्यांचेशी अनेकवार बोललो होतो, ई-मेलची देवघेव झाली होती. त्याना प्रत्यक्ष भेटता आले. परीक्षकांशी गप्पा मारून त्यांचा दृष्टिकोन समजावून घेतां आला. श्री. प्रसन्न जोशी यानी नावाप्रमाणे प्रसन्नपणे कार्यक्रम नेटका घडवून आणला.
काही ब्लॉगलेखकानी आपाअपली प्रशस्तिपत्रे हौसेने ब्लॉगवर टाकलेली पाहिली तर म्हटले आपलेहि टाकूया! मला भेटवस्त म्हणून एक Speaker cum Mike मिळाला. तो म्हणे bluetooth वर चालतो! आता हे काय नवीन लचांड? माझ्याकडे त्यातला फोन किंवा इतर काही Gadget नाही. मग मला याचा काय उपयोग होणार असे वाटले. मग Manual वाचून पाहिले तेव्हा कळले कीं त्याचा साधा speaker म्हणूनहि उपयोग करतां येईल. मग सरळ Computerलाच जोडला आणि गाणे ऐकतां आले. म्हटले चला speaker तर speaker.
तेव्हा खालचे फोटो पहा.
प्र. के. फडणीस







Friday, December 24, 2010

महाभारतातील भीष्मचित्रण - भाग ८

पांडव वनवासाला गेले. त्यांची खबरबात हस्तिनापुराला कळत होतीच. पांडवांना हिणवण्यासाठीं दुर्योधन व कर्ण यांनी गायींचीं खिल्लारे तपासण्याच्या निमित्ताने वनांत त्यांच्या सन्निध जाऊन त्यांना आपल्या वैभवाचे प्रदर्शन घडवावे व त्यांची दैन्यावस्था पहावी म्हणून द्वैतवनात दौरा काढला. हा बेत धृतराष्ट्राला पसंत नव्हता आणि भीष्महि त्याला मान्यता देणार नाही असे त्याने दुर्योधनाला म्हटले. दुर्योधनाने बापाची समजूत काढली अन भीष्माला विचारलेच नाहीं! एव्हांना दुर्योधनाने व कर्णाने भीष्माला काडीइतकीहि किंमत द्यायची नाही असेच ठरवले होते! भीष्म तरीहि हस्तिनापुराला चिकटून राहिला ! कां कोण जाणे.
कौरव वनात गेले तेथे त्यांचा गंधर्वांशी झगडा होऊन सडकून मार मिळाला. कर्ण दुर्योधनाला सोडून जीव वाचवण्यासाठी पळून गेला. दुर्योधन गंधर्वांचा बंदी झाला. अखेर पांडवांनी दुर्योधनाला मुक्त केले. भयंकर अपमान सोसून सगळे हस्तिनापुराला परत आले. यावेळी मात्र भीष्माने ’कर्ण पांडवांच्या चौथ्या हिश्शानेहि नाही’ असें दुर्योधनाला ऐकवलें. दुर्योधन व कर्ण यांनी नेहमी प्रमाणे भीष्माकडे पूर्ण दुर्लक्ष केले. भीष्म तरीहि अपमान सोसत हस्तिनापुरातच राहिला!
पांडव अज्ञातवासात असताना त्याना शोधण्याच्या दुर्योधनाच्या प्रयत्नांमध्ये भीष्माने उत्साहाने भाग घेतला. जणूं पांडवांना शोधून काढून पुन्हा वनवासाला धाडण्यात त्याला स्वत:ला काहीच वावगे वाटत नव्हते आणि त्याला तेच हवे होते! एवढा तो पांडवांच्या विरोधात कां गेला असावा? विराटाचा सेनापति असलेल्या कीचकाच्या वधानंतर त्रिगर्त राजाच्या सूचनेप्रमाणे विराटावर हल्ला करून त्याचीं गायींचीं खिल्लारे लुटण्याच्या दुर्योधनाच्या बेतातहि तो सहभागी झाला. खरे तर कौरवांचे व विराटाचे काही पुराणे वैर नव्हते मग त्याने दुर्योधनाला विरोध कां केला नाहीं?
महाभारतात स्पष्टपणे म्हटलेले नाही पण सूचित केले आहे कीं कीचकाच्या वधाची बातमी ऐकून दुर्योधनाला वाटले कीं हा वध भीमाशिवाय दुसर्‍या कोणी केला असणे असंभव आहे. त्रिगर्तराजाची सूचना त्याने स्वीकारली यामागे विराटाच्या आसर्‍याला पांडव असतील तर विराटाच्या मदतीला ते युद्धात उतरतीलच व ओळखता येतील असा त्याचा विचार होता असे दिसते. भीष्म वा विदुराला अशी शंका आली असती तर विराटावर हल्ला करण्याचा बेत त्याना कदाचित मोडून काढतां आला असता. भीष्माने तसा प्रयत्न केला असता काय हा प्रष्नच आहे! कौरवांचा हल्ला पहिल्या दिवशी सप्तमीला झाला असता तर अर्जुन नव्हे तर भीम कौरवांशी युद्धाला आला असता व तोहि लगेच ओळखला गेला असताच. प्रत्यक्षात त्रिगर्तांचा हल्ला सप्तमीला दुपारी झाला. त्रिगर्तांच्या विरुद्ध भीम लढला व त्याने मोठा पराक्रम गाजवला पण सुदैवाने, त्रिगर्ताला त्याला ओळखता आले नाही. युधिष्ठिराने त्याला ’इतरांप्रमाणेच लढ, झाड उपटून घेण्यासारखे तुझे खास प्रकार करूं नको, नाहीतर ओळखला जाशील’ असे बजावले होते.
प्रत्यक्षात कौरवांचा हल्ला दुसर्‍या दिवशी अष्टमीला सकाळीच झाला. विराटाचे वतीने त्याचा पुत्र उत्तर व अर्जुन युद्धाला उभे राहिल्यावर कौरवांनी अर्जुनाला लगेच ओळखलें व ’तेरावे वर्ष पुरे होण्यापूर्वीच अर्जुन ओळखला गेला आहे’ असे दुर्योधनाने लगेच म्हटले. द्रोणाचार्यांनी, ’पांडवांनी असे कसे केले’ अशी शंका व्यक्त केल्यावर भीष्माने सौरवर्ष व चांद्रवर्ष यांचे गणित उलगडून ’आज सकाळीच, सौरमानाने पांडवांनी तेरा वर्षे पुरीं केलीं आहेत’ असें म्हटलें. (कौरवांचा हल्ला एक दिवस आधी झाला असता तर तेहि झाले नसते!) चांद्रमानाने आवश्यक तेवढे अधिक महिने मोजून तेरा वर्षे उघडच पुरीं झालेलीं नव्हती. मग पांडवांनी अनुद्यूताचा पण पुरा केला असे ठरते कीं नाहीं याबद्दल भीष्माने स्वत:चे नि:संदिग्ध मत, अनुकूल वा प्रतिकूल, तेव्हां (वा नंतर पुढे केव्हांहि, कृष्णशिष्टाईचे वेळीं देखील) दिलेच नाहीं! अर्जुनापासून कर्णाला व कौरवांना यावेळीं वांचवून हस्तिनापुराला परत नेण्याचें काम मात्र त्याने केलें.

Wednesday, December 15, 2010

महाभारतातील भीष्मचित्रण - भाग ७

पांडवानी इंद्रप्रस्थ राजधानी वसवली. राजसूय यज्ञाचा बेत केला. त्यासाठी जरासंधाला मारले. दिग्विजय केला. यज्ञाच्या वेळी सर्व कौरव उपस्थित होते. यज्ञानंतर अग्रपूजेचा मान कृष्णाला देण्याचा सल्ला भीष्माचा. तो पांडवांना मानवला. शिशुपालाने कडाडून विरोध केला. भीष्मालाहि दुरुत्तरे केलीं. भीष्माने त्याला अतिशय तुच्छतेने झिडकारले. अखेर कृष्णाने त्याला मारले. भीष्माला हा अतिरेक टाळतां आला असता काय? या अतिप्रसंगाच्या छायेखाली यज्ञ पुरा झाला.
पांडवांच्या दरार्‍याचा व वैभवाचा हेवा वाटून शकुनीच्या सल्ल्यावरून दुर्योधनाने द्यूताचा बेत ठरवला व धृतराष्ट्राच्या गळीं उतरवला. भीष्माला विचारले नाही पण कळले असणारच. द्यूत होऊं नये यासाठी त्याने कांहींहि केलेले नाहीं. त्याने स्पष्टपणे धृतराष्ट्राला निक्षून सांगितले असते तर बहुधा द्यूत टळले असते पण भीष्म स्वस्थ बसला. पांडव हस्तिनापुरात आल्यावर सर्वांना भेटले व द्यूत दुसर्‍या दिवशीं झालें. तोंवर वेळ मिळाला होता मात्र भीष्माने युधिष्ठिरालाहि ’द्यूत खेळूं नको’ असा निकराचा सल्ला दिला नाही. ’खेळताना संयम पाळ’ येवढेहि निक्षून सांगितले नाहीं! कुटुंबप्रमुख असलेल्या भीष्माला हा नाकर्तेपणा कां ग्रासून राहिला हे उलगडत नाही.
द्यूत झालेच. युधिष्ठिर कायम हरतच राहिला. पांडव सर्व संपत्ति हरेपर्यंत द्यूत चालले. मग त्याने सहदेवास पणास लावले. हीच वेळ होती, खरे तर द्यूत संपवण्याची! येथून पुढील युधिष्ठिराचा सर्व अतिरेक दरबारातील सर्वांनी चालूं दिला. भीष्माने, पहिल्या पांडवाला पणाला लावण्याच्या वेळेसच, निर्धाराने हा गैरप्रकार कां थांबवला नाहीं? ’राज्य वैभव तुम्हा नालायकांना राखतां आले नाहीं, आतां निघा आणि भीक मागा किंवा पुन्हा पराक्रम गाजवून नवीन राज्य व वैभव कमवा. तुमच्या दुर्दशेला युधिष्ठिरच कारण आहे, तेव्हां कौरवांना दोष देऊं नका’ असें म्हणून त्याने पांडवांना हांकलून कां दिलें नाहीं? द्यूत तेव्हांच थांबवले असते तर पुढील घोर अपमान, द्रौपदीचा छळ व अनावर वैर टळलें असतें. महाभारतात याचे उत्तर मिळत नाहीं.
युधिष्ठिर चारी भावांनंतर स्वत:ला पणाला लावून हरला. सर्व पांडव दास झाले. शकुनीने द्रौपदीला पणाला लावण्याची सर्वथैव अनुचित सूचना केली. तिलाहि भीष्माने काडीचाहि विरोध केला नाहीं! हा पणहि हरल्यावर द्रुपदकुळाची राजकन्या असलेल्या द्रौपदीची सर्व प्रकारे होणारी अप्रतिष्ठा भीष्मानेहि निमूट पाहिली. यांतून उद्भवणारे पांचाल-कौरव घोर वैर त्याला दिसत नव्हतें काय? कुरुकुळाचा प्रमुख या नात्याने त्याने तें टाळावयास हवें होतें. द्रौपदीने विचारलेल्या,’मी दासी झाले कीं नाहीं?’ या प्रष्नाचे उत्तरहि भीष्माने दिलेच नाहीं. ’मला उत्तर समजत नाहीं ’ असा जबाब त्याने दिला. अखेर धृतराष्ट्रानेच तिला वर देऊन पांडवांना दास्यांतून मुक्त केले व जिंकलेले सर्व धनहि परत दिले व ’सर्व प्रकार विसरून परत जा’ असा युधिष्ठिराला निरोप दिला. पांडव परत गेले. या सर्व प्रसंगानंतरहि भीष्म, विदुर, धृतराष्ट्र, द्रोण, कृप वा इतर कुरुवृद्धांनी युधिष्ठिराची अतिरेकी द्यूताबद्दल खरडपट्टी काढली नाही.
पांडवांच्या झालेल्या अपमानांमुळे लगेचच युद्ध उभे राहील या धास्तीने, माझ्या मते, ते भय दूर सारण्यासाठी अनुद्यूत झाले. कोणताही पक्ष जिंकला तरी युद्ध तेरा वर्षे टळणार होते. मात्र युधिष्ठिर जिंकला असता तर कौरवांतर्फे कोणकोण वनात जाणार होते हे स्पष्ट सांगितलेले नाही. अनुद्यूताचा बेत मुळात कोणाचा हे महाभारतात स्पष्ट नाही. या बेतालाहि भीष्माने विरोध केला नाहीं. पांडव पुन्हा हरून १२ वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवासासाठी वनात गेले. या सर्व अनर्थपरंपरेचा भीष्म निव्वळ साक्षीदार राहिला. तो इतका निष्क्रिय कां झाला याचे उत्तर महाभारतात नाहीं.

Thursday, December 2, 2010

महाभारतातील भीष्मचित्रण - भाग ६

पांडवांना वारणावतास पाठवण्याच्या दुर्योधनाच्या बेतामागील कारस्थान भीष्माला उमगले नाहीं. विदुराला उमगले व आपल्यापरीने त्याने पांडवांना वांचवण्यासाठी साह्य केलें (वाड्यातून पळून जाण्यासाठी भुयार खणण्यासाठी आपला विश्वासू माणूस युधिष्ठिराकडे पाठवला), मात्र नवल म्हणजे त्याने आपला संशय भीष्माच्या कानावर मुळीच घातला नाहीं वा वारणावतास पांडवांना पाठवूं नये असें त्याने भीष्माला मुळीच विनवले नाहीं! असें कां झालें? भीष्म कांहीहि करणार नाहीं असें विदुराला वाटलें काय? महाभारत याबद्दल गप्प आहे! शेवटी वारणावतास जे व्हायचे ते झाले. वाड्याला लागलेल्या आगीतून पांडव व कुंती कसेबसे वांचले व परागंदा झाले. तीं वांचल्याची कुणकूण विदुराला लागलीच असणार पण त्याने तेहि भीष्माला कळूं दिले नाही. कौरवांनी पांडव व कुंती यांचे और्ध्वदैहिकहि केले असे महाभारत म्हणते. सत्य परिस्थितीबाबत भीष्म पूर्ण अंधारात राहिला.
द्रौपदीच्या स्वयंवराच्या मंडपांत वारणावतांतून वांचून परागंदा झालेले पांच पांडव ब्राह्मणवेषांत प्रगट झाले होते. अनेक वर्षांचा सहवास असूनहि, कौरवांपैकीं कोणीहि, भीष्मानेदेखील, त्यांना अजिबात ओळखले नाहीं. अर्जुनाने दुष्कर पण जिंकला तरीहि ’हा अर्जुन तर नव्हे’ अशी शंका कोणालाहि आली नाहीं. नंतर ’पण अखेर एका ब्राह्मणाने जिंकला’ म्हणून रागावलेल्या क्षत्रिय राजांबरोबर अर्जुन व भीम यांचे जोरदार युद्ध झाले त्यांत भीमाचे अफाट बळहि प्रगट झाले तरीहि युद्ध संपल्यावर इतरांप्रमाणे कौरव तसेंच भीष्महि पांडवांना अखेरपर्यंत न ओळखतां हस्तिनापुरास निघून गेले. पांडवद्रौपदी विवाहालाहि कौरवांकडून कोणी आलें नाहीं. काही काळ गेल्यावर पांडव-द्रौपदी–कुंती हस्तिनापुराला परत आल्यावर मग अखेर भीष्माने राज्याचा वांटा पांडवांना द्यावा असा सल्ला दिला. यावेळीं त्याने म्हटलें कीं ’वारणावत प्रकरणीं लोक मलाच दोष देतात’ ! खरे तर युधिष्ठिराला पूर्वीच यौवराज्याभिषेक केलेला होता तर मग आतां तो जिवंत परत आल्यावर धृतराष्ट्राचे जागीं त्यालाच हस्तिनापुरचे राज्य मिळावयास हवे होते. भीष्माने तसे केले नाहीच. राज्याचा वाटाहि खरे तर दिला नाही. ’खांडवप्रस्थास जाऊन तुम्ही राज्य करा’ असे पांडवांना म्हटले. तेथे खांडववन जाळून, नवीन प्रदेश वस्तीखाली आणून, नवीन इंद्रप्रस्थ राजधानी बनवून, नवेच राज्य पांडवांना मिळवावे लागले. या सर्व घटनांमध्ये भीष्माची न्यायबुद्धि दिसत नाही. आपला निर्णय धृतराष्ट्रावर वा दुर्योधनावर लादण्याची त्याची इच्छा वा तयारी नव्हती असे म्हणावे लागते. येथून पुढे त्याने दुर्योधनाच्या कुटिल बेताना कधीच प्रखर प्रतिकार केलेला नाही. दुर्योधनाचा सर्वाधिकार त्याने जणू मान्यच केलेला दिसतो.