आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Sunday, February 22, 2009

स्फुट प्रकरणे - भाग ५

परशुराम कथा
महाभारतांतील परशुरामकथा ही देखील आपल्या समजुतीपेक्षा थोडी निराळी आहे.
परशुरामाचा पिता जमदग्नि. हा भृगुचा नातू व ऋचीकाचा पुत्र. तो वेदवेत्ता व सर्व शास्त्रांचा व शस्त्रांचाहि जाणकार होता. मात्र जमदग्नि म्हणजे शीघ्रकोपि अशी आपली समजूत असते तसा तो नव्हता! परशुरामाची माता रेणुका ही राजा प्रसेनजित याची कन्या म्हणजे क्षत्रियकन्या. रेणुका व जमदग्नि यांचे चार पुत्र, त्यांत परशुराम सर्वात लहान. स्नानासाठी नदीवर गेलेली असताना जलक्रीडा करीत असलेल्या राजा चित्ररथावर, ( कार्तवीर्यावर नव्हे!) क्षणभरासाठी कां होईना, रेणुकेचे मन गेले. त्या मानसिक व्यभिचाराने रेणुका निश्चेष्ट होऊन पाण्यात पडली. आश्रमात परत आली तेव्हां तिची अवस्था जमदग्नीने ओळखली व तिचा धि:कार केला. चारही पुत्र क्रमाने आश्रमांत आले तसतसे जमदग्नीने प्रत्येकाला आईला मारून टाकावयास सांगितले. मोठ्या तिघांनीहि नकार दिला. त्यांना पित्याने रागाने शाप दिले. चौथ्या परशुरामाने मात्र आज्ञेप्रमाणे परशूने आईचे मस्तक तोडले. जमदग्नीचा क्रोध एकदम शमला व त्याने परशुरामाला ’वर माग’ असे म्हटले. परशुरामाने मागितलेले वर लक्षणीय आहेत. ’आई जिवंत व्हावी, मी मारल्याची तिला स्मृति राहूं नये, मानसिक पापाचा स्पर्श तिला न व्हावा, भावांचे शाप परत घ्यावे, आणि स्वत: युद्धात अजिंक्य व दीर्घायुषी व्हावे’ असे ते वर होते. व ते सर्व पित्याने त्याला दिले.
जमदग्नीचे सर्व पुत्र आश्रमाबाहेर गेले असताना एकदां राजा कार्तवीर्य सहस्रार्जुन आश्रमांत आला. रेणुकेने त्याचे योग्य ते स्वागत केले तरीहि त्याने आश्रमाचा विध्वंस केला. (जमदग्नीला मारले नाही!) परशुरामाने परत आल्यावर ते पाहून रागावून कार्तवीर्यावर चाल करून त्याचा वध केला. पुढे एकदा परशुराम आश्रमात नसताना पुन्हा कार्तवीर्याच्या पुत्रांनी आश्रमांत येऊन, जमदग्नीवर हल्ला करून त्याला मारून टाकले. परशुराम परत आल्यावर पितृहत्या पाहून त्याने फार विलाप केला व युद्ध करून त्याने सर्व कार्तवीर्य पुत्राना व त्यांच्या मदतनीस सर्व क्षत्रिय राजाना मारले. वारंवार झालेल्या युद्धांमुळे एकवीस वेळां पृथ्वी नि:क्षत्रिय झाली. नंतर यज्ञ करून परशुरामाने सर्व पृथ्वी कश्यपाला दान केली. कश्यपाने त्याला आपल्याला दान केलेल्या भूमीवर वसती करण्यास मनाई केली. त्यामुळे परशुराम महेद्रपर्वतावर वसती करूं लागला. परशुरामाने नवीन वसवलेल्या कोकण भूप्रदेशात हा महेंद्रपर्वत असल्याचे मानले जाते. नंतर कधीहि परशुराम रात्री इतर कोठे राहत नसे. याचा इतरत्रहि उल्लेख आहे. रामाने शिवधनुष्य तोडले तेव्हां व भीष्माने अंबेचा स्वीकार करण्याचे नाकारले तेव्हां त्याने त्या दोघांना शिक्षा करण्याचा त्याने प्रयत्न केला पण दोन्ही प्रसंगी तो हरला. त्याचे बळ संपले होते व क्षत्रिय राजे पुन्हा प्रबळ झाले होते. या कथेप्रमाणे जमदग्नीच्या वधाचा दोष कार्तवीर्याला नव्हे तर त्याच्या पुत्रांना दिलेला आहे. तेव्हां ’सहस्रार्जुन मातला जमदग्नीचा वध केला । कष्टी ते रेणुका म्हणुनी सहस्रार्जुन वधिला’ हे दशावतार आरतीतील वर्णन बरोबर नाही!

Saturday, February 7, 2009

स्फुट प्रकरणे भाग ४

अणिमांडव्यांची कथा
मांडव्य नांवाचे एक विद्वान व पुण्यशील ऋषि तपश्चर्येसाठी ध्यानस्थ बसलेले असताना एक चोर त्यांचे आश्रमांत आला. व दडून बसला. पाठलाग करणार्‍या शिपायांनी मांडव्यांकडे चौकशी केली तेव्हा मौनव्रत असल्यामुळे ते काही बोलले नाहीत. चोर आश्रमांतच सांपडल्यावर रागाने शिपायांनी त्याचेबरोबर मांडव्यांनाहि पकडून राजापुढे उभे केले. अविचारी राजाने चोराबरोबर मांडव्यांनाही सुळावर चढवले. सुळावर चढवलेले मांडव्य बराच काळ पर्यंत यातना भोगत जिवंत राहिले. रखवालदारांनी राजाला हे कळवल्यावर त्याने अमात्यांशी चर्चा करून ऋषीना खाली उतरवले व क्षमायाचना केली. सुळावरून उतरवताना त्याचे टोक (अणि), तुटून ते मांडव्यांच्या शरीरात तसेच राहिले. त्यामुळे त्यांचे नाव अणिमांडव्य पडले. ऋषीनी राजाला क्षमा केली पण जेव्हा यमाच्या दरबारात गेले तेव्हा त्यानी यमालाच जाब विचारला कीं माझ्या कोणत्या घोर अपराधामुळे मला सुळावर यातना भोगाव्या लागल्या? यमाने उत्तर दिले कीं तूं लहान असताना एका पाखराला काडीने टोचले होतेस त्याचे फळ तुला भोगावे लागले.!
या विलक्षण कथेचा पुढील भाग महत्वाचा आहे. मांडव्य ऋषीनी हे ऐकून यमधर्माला दोष दिला व शापहि दिला. मूल बारा वर्षांचे होईपर्यंत जें करील त्याला धर्म/अधर्म ठरवता येत नाही. कारण तोंवर त्याच्या बुद्धीला ती ताकद आलेली नसते. तेव्हा मूल १४ वर्षाचे होईपर्यंत त्याच्या कृत्याची पापात गणना करू नये व त्याला शिक्षाही होऊ नये असा दंडक त्यानी यमधर्माला घालून दिला! गुन्हा व शिक्षा यांचेमध्येहि प्रमाण राखले पाहिजे असाहि विचार त्याचेपुढे मांडला व ’माझ्या क्षुद्र पापाला एवढी कठोर शिक्षा तूं कशी दिलीस?’ असा त्याला जाब विचारला!’या गुन्ह्याबद्दल तुला मनुष्यजन्म घ्यावा लागेल’ अशी शिक्षाही फर्मावली! यमधर्माचा मनुष्यावतार म्हणजे पांडु-धृतराष्ट्रांचा भाऊ विदुर होय.
या कथेमध्ये मांडव्यांनी इतक्या पुरातन काळात मांडलेला, गुन्हा व शिक्षा यांमध्ये प्रमाण हवे हा विचार व १४ वर्षांपर्यंत अजाण मानून गुन्ह्याला शिक्षा नसावी हाही विचार आजच्या काळातहि सर्व पुढारलेल्या मानवसमाजांमध्ये न्यायाचे तत्त्व मान्यता पावलेला आहे हें विषेश!

Tuesday, February 3, 2009

स्फुट प्रकरणे - भाग ३

शिष्यांची परीक्षा.
आदिपर्वामध्ये धौम्य ऋषि व त्यांचे तीन शिष्य यांची एक छोटीशी कथा आहे. विद्या देण्यापूर्वी धॊम्यांनी आपल्या आरुणी, उपमन्यु व वेद या तीन शिष्यांची कठोर परीक्षा घेतली. शेतात शिरणारे पाणी अडवण्यासाठी बांध घालण्याचे काम आरुणीला सांगितले. त्याला ते जमेना तेव्हा बांधातील भगदाड अडवून तो स्वत:च झोपून राहिला. (आपल्या शरीराचाच बांध केला.) तो बराच वेळ दिसेना तेव्हा त्याला शोधत गुरु स्वत: शेतात आले व त्यानी आरुणीला जोरात हांक मारली तेव्हा तो बांधातून उठून आला.त्याने धोका पत्करून केलेलें आज्ञापालन पाहून गुरु प्रसन्न झाले व मग त्याला विद्या दिली.
दुसरा शिष्य उपमन्यु. त्याला गुरे राखायला पाठवीत पण काही खावयास मिळत नसे. तो गायींचे दूध प्यायचा. वासरांच्या वाटचे दूध तूं पिऊं नको असे त्याला गुरु म्हणाले. मग तो फक्त फेस प्यायचा. त्यालाहि गुरूनी बंदी केली. मग उपासमार झाल्यामुळे त्याने एकदां रुईचीं पाने खाल्ली> त्यामुळे तो आंधळा झाला व विहिरीत पडला. गुरूना कळल्यावर ’अश्विनीकुमारांची स्तुति कर’ असे त्याला सांगितले. त्याना प्रसन्न करून त्यांच्याही परीक्षेला उतरल्यावर त्याला पुन्हा दृष्टि मिळाली. मग प्रसन्न होऊन गुरूनेहि सर्व विद्या दिली.
तिसरा शिष्य वेद नांवाचा होता तो बुद्धीला कमी होता. त्याला गुरुशुश्रूषेचे काम मिळाले. इतर कामाबरोबर गुरु त्याला नित्य बैलाप्रमाणे जोखडालाहि जुंफत. बराच काळ असे कष्ट केल्यावर त्याचेवरहि गुरुकृपा झाली!
या कथेतील शेवटचा भाग लक्षणीय आहे. वेद हा शिष्य ज्ञानसंपन्न होऊन गृहस्थाश्रमी झाल्यावर त्यालही तीन शिष्य मिळाले. वेदाने मात्र त्यांना काहीहि काम सांगितले नाही! गुरुगृहीं वास म्हणजे केवढे विलक्षण कष्ट याचा त्याला प्रत्यक्ष अनुभव होता. गुरुशिष्यपरंपरेने विद्या मिळवण्यासाठी गुरुगृहीं राहताना आजच्या युगात भीमसेन जोशी यांनी काढलेल्या अपार कष्टांची आठवण अपरिहार्यपणे येते.