आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Thursday, January 22, 2009

स्फुट प्रकरणे - भाग २

उपरिचर वसूची कथा :
उपरिचर नावाचा एक धर्मशील राजा होऊन गेला. आपल्या उग्र तपश्चर्येने हा एक दिवस इंद्रपदाला योग्य होईल या भीतीने देवांनी त्याला तपश्चर्येपासून परावृत्त केले. इंद्राने त्याला, ’तूं पृथ्वीवर नित्य तत्पर राहून धर्मपालन व धर्माचा प्रतिपाळ कर, चेदि देश जिंकून तूं त्याचा राजा हो’ असे सांगितले. आपलें स्फटिकाचे गगनविहारी विमान त्याला दिले व वैजयंती माळ दिली. आपली नित्य आठवण रहावी म्हणून सज्जनाम्चा प्रतिपाळ करणारी एक कळकाची काठी त्याला दिली. इंद्राचा मान राखण्यासाठी संवत्सराच्या शेवटच्या दिवशी उपरिचर राजाने ती काठी जमिनीत रोवली व तिची पूजा केली. दुसरे दिवशी या काठीवर शेल्यासारखे एक वस्त्र बांधीत व तिची पूजा करीत. ही काठीची पूजा म्हणजे इंद्राचीच पूजा होय.
या कथेतील रूपके मला उलगडली नाहीत पण यांत गुढीपाडव्याच्या प्रथेचे मूळ स्पष्ट दिसते. मात्र आजकाल गुढीपाडव्याच्या प्रथेच्या या मूळ कथेचे स्मरण फारसे कोणाला नाही! गुढीला आपण शालिवाहनाच्या विजयाचे प्रतीक मानतो. इंद्रपूजा मानत नाही.
व्यासांची माता सत्यवती ही या उपरिचर वसूची धीवर स्त्रीपासून झालेली कन्या होय. महाभारतात सत्यवती ही धीवरांना मत्स्यीच्या पोटांत मिळाली व त्यांनी तिला राजा उपरिचराकडे नेऊन दिले असे म्हटले आहे. मत्स्यीच्या पोटात एक बालकही मिळाला होता. मात्र राजाने मुलाला ठेवून घेतले व कन्येला धीवरालाच देऊन ’तूंच हिचा सांभाळ कर’ असे सांगितले! पुत्र पुढे मत्स्य देशाचा राजा झाला. ती मत्स्यी एक शापित अप्सरा होती असे महाभारत म्हणते व ती उपरिचराच्या वीर्यापासून गर्भवती झाली असेंहि म्हणतें! याचा सरळ अर्थ धीवर स्त्रीला राजापासून हीं दोन अपत्ये झाली असाच घेतला पाहिजे. राजाने कन्येला कां स्वीकारले नाही याबद्दल महाभारत गप्प आहे. राजा जनकाने व द्रुपदाने शेतात व यज्ञात मिळालेल्या (कोणापासून झालेल्या?) कन्या सीता व द्रौपदी यांचा स्वीकार केला व त्याना राजकन्या म्हणूनच वाढवले हे विषेश! ते भाग्य सत्यवतीला मिळाले नाही.

Thursday, January 15, 2009

महाभारतातील स्फुट प्रकरणे - भाग १

या लेखात आता काही स्फुट प्रकरणांचा परामर्ष घ्यावयाचा आहे. यांत काही नवीन वा आजच्या काळाला सुसंगत अशा गोष्टी नजरेला आल्या त्याबद्दल लिहावयाचे आहे.
अक्षौहिणी :
भारतीय युद्धात अठरा अक्षौहिणी सैन्य दोन्ही पक्ष मिळून लढले. बहुतेक सर्व राजांनी एकेक अक्षौहिणी सैन्य आणले होते. कृष्णाने आपले तीन कोटि गोपालांचे सैन्य दुर्योधनाला दिले होते. मात्र कौरवांच्या अकरा अक्षोहिणी सैन्याच्या मोजदादीत हे कृष्णाचे सैन्य अजिबात मोजलेले दिसत नाही.

एक अक्षौहिणी म्हणजे काय याचा पूर्ण खुलासा दिलेला आहे. १ रथ, १ हत्ती, ३ घोडे व ५ पायदळ सैनिक मिळून १ पत्ति होते. ३ पत्ति म्हणजे एक सेनामुख व त्यानंतर ३-३ च्या पटीत गुल्म, गण, वाहिनी, पृतना, चमू, अनीकिनि व अक्षौहिणि असे कोष्टक दिलेले आहे. एकूण एका अक्षौहिणीत २१८७० रथ, तितकेच हत्ती, ६५६१० घोडे व १,०९,३५० पायदळ समाविष्ट होत. नवल म्हणजे, आजहि ३ सैनिक म्हणजे एक ग्रूप, ३/४ ग्रूपचा एक सेक्शन, मग त्याच पटीत प्लॅटून, कंपनी, बटालियन, ब्रिगेड, डिविजन, कोअर अशीच व्यवस्था असते! मधल्या काळात, युरोपियन, मुघल, मराठे वा इतरांच्या सैन्याचीहि अशीच व्यवस्था असे काय?
अक्षौहिणीतील रथ व हत्ती यांची तुलना टॅंक, आर्टिलरी (तोफखाना) यांच्याशी होईल. घोडदळाची जागा आता चिलखती वाहनानी घेतली आहे. काही पायदळाच्या डिव्हिजन्स, आर्टिलरी डिविजन्स, आर्मर्ड डिव्हिजन्स एकत्र करून बनणार्‍या आर्मीची अक्षौहिणीशी तुलना करता येईल. अशा कित्येक आर्मी ग्रूप दुसर्‍या महायुद्धात दोन्ही पक्षांतर्फे लढले. एकेका राजाचे एक अक्षौहिणी सैन्य चतुरंग व स्वयंपूर्ण होते.
अठरा अक्षौहिणी सैन्य म्हणजे एकूण २५ लाख माणसे एवढ्याशा कुरुक्षेत्रावर कशीं लढलीं असतील? दुसर्‍या महायुद्धात काही शहरांसाठी झालेल्या युद्धात, उदाहरणार्थ स्टालिनग्राड, मॉस्को वगैरे, दोन्ही पक्षांकडून सात आठ लाख सैन्य लढले पण तीं युद्धक्षेत्रे खूप विस्तृत होतीं. भारतीय इतिहासातील मोठ्या लढायांत, उदा. तालिकोट, पानिपत वगैरेत ४-५ लाखांवर मजल गेली नव्हती. तेव्हां महाभारतांतील आकडेवारी खूप अतिशयोक्त म्हटली पाहिजे.

Saturday, January 3, 2009

विराम

प्रिय वाचक,
या ब्लॉगवर महाभारतातील काही विषयांवर मी लेखन केले ते आपणास साधारणपणे पसंत पडले असे दिसले. माझ्या मनात असलेले सर्व विषय पुरे झालेले असल्यामुळे या ब्लॉगवरील लेखन मी (सध्यातरी) थांबवत आहे. पुढे कधी काही नवीन सुचले तर पुन्हा लिहीन. आपल्या प्रतिसादांबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.
अशाच प्रकारचे काही लेखन रामायणावर करण्याचा विचार आहे व त्यासाठी नवीन ब्लॉग लवकरच सुरू करणार आहे. आपण वाचाल अशी आशा आहे. ब्लॉग सुरू झाला की ’मराठी ब्लॉग विश्व’ वर दिसेलच
प्र. के. फडणीस.