आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Tuesday, August 9, 2011

महाभारताबाबत काही गैरसमजुती भाग ६

’सौभद्र’ हे मराठीतील एक गाजलेले व सदा लोकप्रिय नाटक आहे. अजूनहि कधीतरी त्याचे प्रयोग होतात. नाटकाची अन त्यातील पदांची मोहिनी अजून कायम आहे. मात्र या नाटकामुळे एक मोठा गैरसमज निर्माण झाला आहे ज्याला महाभारतात काही आधार नाही!
नाटकातील कथानकाप्रमाणे अर्जुन-सुभद्रा यांचे बालवयापासून परस्पर प्रेम होते, अर्जुन तीर्थयात्रेला गेलेला असताना बलराम सुभद्रा दुर्योधनाला द्यायचे ठरवतो, सुभद्रा हवालदिल होते, अर्जुनाचा ठावठिकाणा नसल्यामुळे कृष्णालाहि काय करावे सुचत नाही. पण मग अर्जुन तीर्थयात्रेनिमित्तने भटकत द्वारकेच्या जवळ आल्याचे कृष्णाला कळते व मग अनेक गमतीचे बेत रचून अखेर कृष्ण सुभद्र-अर्जुनाचा विवाह घडवून आणतो! नाटकाची रचना सुरेखच आहे यात शंकाच नाही! मात्र महाभारतात असे काही नाही!
महाभारताप्रमाणे अर्जुन सुभद्रा यांचे बालवयापासून काही ’रहस्य’ नव्हते. कधी गाठभेट झाल्याचेहि उल्लेख नाहीत. पांडव कृष्ण-बलराम यांची प्रथम प्रत्यक्ष भेट द्रौपदीच्य़ा स्वयंवर-मंडपात झालेली वर्णिली आहे. पांच पांडवांचे द्रौपदीशी विवाह झाले, मग त्यानी खांडवप्रस्थ वसवून तेथे राज्य करण्यास सुरवात केली. अर्जुनाने युधिष्ठिर-द्रौपदी याचा एकांतभंग केला म्हणून पांडवांनी स्वत:च केलेल्या नियमाप्रमाणे त्याला तीर्थयात्रेला जावे लागले. (माझ्या मते, ‘स्वयंवराचा पण मी जिंकला, मात्र द्रौपदी पाचांची पत्नी झाली आतां युधिष्ठिर, भीम यांच्या नंतर ज्येष्ठता क्रमाने ती माझ्या वाट्याला येणार कधी?’ असा वैताग येऊन त्याने रस्ता सुधारला व आपली सोय पाहिली!) त्याने ब्रह्मचर्य पाळावे अशीहि अट खरे तर होती पण त्याने ते मुळीच पाळले नाही! उलुपी, चित्रांगदा अशी एकेक ‘प्रकरणे’ करीत तो काही काळाने द्वारकेला आला. यादव समुदायात सुखाने काही काळ काढत असताना कृष्णासमवेत असताना एकदा सुभद्रा त्याचे नजरेस पडली. त्याने कृष्णाला विचारले ‘कोण रे ही?’ कृष्णाने म्हटले ‘अरे ही माझी सावत्र बहिण सुभद्रा’
अर्जुनाचे मन सुभद्रेवर गेलेले ओळखून कृष्णाने विचारले की ‘ही तुला आवडली आहे काय?’ अर्जुनाने कबूल केल्यावर कृष्णाने सल्ला दिला की ‘हिचा आतां विवाह करावयाचा आहे पण स्वयंवर योजले तर तेव्हा ही कोणाला वरील याचा काय भरवसा? तू हिला संधी पाहून पळवून ने. क्षत्रियाना मुलगी पळवून नेऊन केलेला ‘राक्षस विवाह’ शास्त्रसंमत आहे.’
मग योग्य संधी पाहून अर्जुनाने सुभद्रेला रथात घालून पळवून नेले! सर्व यादव वीर रागाने खवळून जाऊन युद्धाला तयार होऊ लागले पण कृष्ण ‘थंड’ बसलेला पाहून बलरामाने म्हटले कीं ‘अरे त्या कृष्णाचे काय मत ते तरी विचारा.’ तेव्हा कृष्णाने सल्ला दिला ‘युद्धाला उभे राहण्यापूर्वी जरा विचार करा. गाठ अर्जुनाशी आहे, कोणा सोम्यागोम्याशी नव्हे. निभाव लागला नाहीं म्हणजे अब्रू जाईल. अर्जुनापेक्षा चांगला पती सुभद्रेला मिळेल काय? तेव्हा झाले आहे ते चांगलेच आहे. दोघाना बोलावून आणून सन्मानाने त्यांचा विवाह करून द्यावा आणि यादव-पांडवांचे सख्य साधावे.’ हे सर्वांना पटले व तसेच झाले. या सर्व कथेत दुर्योधनाचे नाव कुठेच आलेले नाहीं.
तेव्हा सौभद्र नाटक छानच आहे. पण महाभारताबद्दल तो एक मोठाच गैरसमज!

Monday, July 18, 2011

महाभारताबद्दल काही गैरसमजुती - भाग ५

नरो वा कुंजरो वा।
हे आपण बाळपणापासून ऐकत आलो. असे खोटे वाक्य बोलल्यामुळे चार बोटे अधांतरी चालणारा युधिष्ठिराचा रथ पंक्चर होऊन जमिनीवर टेकला अशीहि हरदासी कथा आपण ऐकत आलो. पण महाभारतात असे वाक्यच नाही!
हा उलगडा मलाहि हल्लीच वाचलेल्या श्री. जातेगांवकर यांच्या एका पुस्तकावरून झाला.
भीष्मपतनानंतर द्रोण सेनापति झाला व चौथ्या दिवशी जयद्रथवध झाल्यावर पांचव्या दिवशी द्रोण फार त्वेषाने युद्ध करू लागला व त्या दिवशी पांडव व पांचाल यांचा विध्वंस त्याने आरंभला. तो कोणालाच, अर्जुनाला देखील आवरेना. कृष्णाने अखेर पांडवांना सावध केले कीं असेच युद्ध चालले तर दिवस अखेर तुम्ही पूर्ण नष्ट व्हाल. तेव्हां काहीहि करून याला युद्धत्याग करण्यास उद्युक्त केले पाहिजे. कृष्ण व भीमाने एक कुटिल बेत ठरवला. भीमाने प्रथम एक अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला आणि द्रोणापाशी जाऊन ’अश्वत्थामा हत:’ असे पुन्हापुन्हा त्याला म्हणाला! आपला पुत्र मारला गेला यावर द्रोणाचा विश्वासच बसेना पण पुन्हापुन्हा ऐकल्यावर खात्री करून घेण्यासाठी तो युधिष्ठिरापाशी आला. असे होईल याची कल्पना असल्यामुळे कृष्ण व भीम यानी युधिष्ठिराला विनवले होते कीं ‘तूं होय म्हण!’ भीमाने त्याला सांगितले कीं मी अश्वत्थामा हत्ती खरोखरीच मारला आहे. असत्य बोलण्यास युधिष्ठिर सहजीं तयार होणेच शक्य नाही याची कृष्ण व भीमाला भीति होती. पण हत्ती कां होईना, अश्वत्थामा मारला गेला आहे या आधारावर युधिष्ठिराने मनाशी तडजोड केली आणि द्रोणाने जेव्हां विचारले कीं ’किं अश्वत्थामा हत:? ’, तेव्हा जबाब दिला ’हत:, कुंजर:’ ! जबाब देताना कुंजर: हा शब्द हळू व तोंड चुकवून उच्चारला जेणेकरून तो द्रोणाला ऐकू जाऊ नये!
द्रोणाला युधिष्ठिराचा ’हत:’ एवढाच शब्द ऐकू गेला व त्याचे मनोधैर्य खचले. काही काळाने त्याने धनुष्य खाली ठेवले आणि मग त्याचा वध झाला. कृष्ण-भीमाचा हेतू साध्य झाला पण खोटे बोलल्याचा डाग युधिष्ठिराला लागला नाहीं! कारण ‘हत:, कुंजर:’ हे सत्यच होते! त्याने ‘नरो वा कुंजरो वा’ म्हटले असते तर ते मात्र असत्य भाषण ठरले असते कारण युधिष्ठिराला नर अश्वत्थामा मारला गेलेला नाहीं हे पक्के ठाऊक होते! कृष्ण आणि भीम खरे हुशार म्हटले पाहिजेत. आपल्याला पाहिजे ते त्यांनी युधिष्ठिराकडून बरोबर वदवून घेतले! आपण मात्र अजूनही ‘नरो वा कुंजरो वा’ म्हणत असतो! पण तो गैरसमजच!

Wednesday, July 13, 2011

महाभारताबद्दल काही गैरसमजुती - भाग ४

धृतराष्ट्राला युद्धदर्शन
कौरव-पांडव युद्ध सुरू होण्यापूर्वी धृतराष्ट्राला, आपल्याला युद्धवार्ता कशा कळतील असे वाटत होते. संजयाला दिव्य दृष्टि देऊन कृष्णाने त्याला धृतराष्ट्राशेजारीच बसून सर्व युद्ध पाहता येईल असे केले व मग संजयाने ’आंखों देखा हाल’ धृतराष्ट्राला रोजच्या रोज सांगितला अशी समजूत असते. कृष्णाने कौरवदरबारात विश्वरूपदर्शन घडवले तेव्हां धृतराष्ट्राला व गांधारीला ते दिसावे म्हणून दिव्य दृष्टि दिली होती (खरेखोटे देव जाणे) त्यामुळे अशी समजूत होते.
प्रत्यक्षात दिव्यदृष्टि व्यासानी दिली होती आणि धृतराष्ट्राला नव्हे तर संजयाला दिली होती असे महाभारतात म्हटले आहे. मात्र १८ दिवसांच्या युद्धवर्णनांत काही वेळा संजय स्वत: युद्धभूमीवर होता असा स्पष्ट उल्लेख आहे. युद्धवर्णनहि १८ दिवसांचे अलगअलग नसून चार सरळ भागात आहे. पहिला भाग भीष्मपतनापर्यंतच्या दहा दिवसांचा, मग दुसरा भाग द्रोणवधापर्यंतच्या पांच दिवसांचा, तिसरा भाग कर्णवधापर्यंतच्या दोन दिवसांचा व अखेरचा भाग शेवटच्या दिवशी शल्यवध व दुर्योधन-भीम गदायुद्ध झाले तोपर्यंतचा असे चार भागात युद्धवर्णन संजयाने धृत्रराष्ट्राला ऐकवलेले आहे.
संजयाचे वर्णन तो स्वत: सर्व घटना पाहत असल्याप्रमाणे आहे. दिव्यदृष्टि वगैरे अद्भुत कल्पना सोडून दिल्या तर असे मानावे लागते कीं हल्ली युद्धात जसे वार्ताहराना वा टी. व्ही. ला वा रेड-क्रॉसला संरक्षण असते तसे संजयाला असावे व त्यामुळे त्याला युद्धभूमीवर सर्वत्र फिरतां येत होते व घटना पाहतां येत होत्या. त्यामुळे त्याचे वर्णन प्रत्यक्षदर्शी झाले आहे. चार महत्वाच्या टप्प्यांवर युद्धभूमि सोडून धृतराष्ट्रापाशी परतून त्याने झालेल्या घटना वर्णिल्या आहेत. तेव्हा दिव्यदृष्टि ही एक गैरसमजूतच!

Wednesday, July 6, 2011

महाभारताबद्दल काही गैरसमजुती - भाग 3

भारतीय युद्धाचे वेळीं अभिमन्यु काय वयाचा होता?
हा प्रश्न विचारला असतां महाभारताशी कमीजास्त परिचय असलेल्या बहुतेकांचे उत्तर १७-१८ वर्षांचा नवतरुण होता असें येईल. पण हें बरोबर आहे का?
थोडासा विचार केला तर लक्षात येईल कीं हें शक्य नाहीं. पहा बरें! अभिमन्यूच्या जन्मानंतरच द्रौपदीच्या पांच पुत्रांचा जन्म झाला असें महाभारतच म्हणते. अर्थातच द्रौपदीचा सर्वात लहान पुत्र (सहदेवाचा) अभिमन्यूपेक्षा ७-८ वर्षांनी तरी नक्कीच लहान होता. राजसूय यज्ञाचे वेळी द्रौपदी अगदीच लेकुरवाळी होती असें महाभारत म्हणत नाही, म्हणजे हा पुत्र २-३ वर्षांचा तरी झाला होता असे मानणे भाग आहे म्हणजे अभिमन्यु निदान १० वर्षांचा झालेला होता! राजसूय यज्ञानंतर काही महिन्यांचा काळ दुर्योधनाचे व शकुनीचे कुटिल बेत ठरून व धृतराष्ट्राची त्याला मान्यता मिळण्यात गेला. मग द्यूत झाले आणि त्यानंतर १२ वर्षे वनवास व १ वर्ष अज्ञातवासात गेले. अर्जुन प्रगट झाला तेव्हा ग्रीष्म ऋतु चालू होता असे भीष्माने स्पष्ट म्हटलेले आहे. त्यानंतर कार्तिक अमावास्येपर्यंतचा काळ - सहा महिने - कृष्णशिष्टाईपर्यंत व युद्धाला सुरवात होईपर्यंत गेला. तेव्हा युद्धाचे वेळी अभिमन्यु कमीतकमी २४ वर्षांचा नक्कीच झाला होता. द्रौपदीचे सर्व पुत्र युद्धात लढले होते व शेवटच्या दिवशी अश्वत्थाम्याकडून मारले गेले. त्या सर्वाना भीष्माने रथी ठरवले होते. द्रौपदीचा सर्वात लहान पुत्र युद्धात सक्रीय भाग घेत होता तेव्हां तो १७-१८ वर्षांचा तरी असला पाहिजे हेहि अभिमन्यूच्या वयाशी व दोघांच्या वयातील फरकाशी जुळते. अज्ञातवासात विराटाची कन्या अर्जुनापाशी नृत्य शिकत होती व ती लहान होती असा उल्लेख असल्यामुळे (तिने आपला भाऊ उत्तर याला कौरवांची उची वस्त्रे मला बाहुल्या करण्यासाठी घेऊन ये असे म्हटले होते व अर्जुनाने कौरववीरांचा पराभव केल्यावर उत्तराकडून तसे करून घेतले)आणि तिचा अभिमन्युशी अज्ञातवास संपल्यावर लगेचच विवाह झाला तेव्हा तोही नवतरुण - १८ वर्षांचा - होता असा गैरसमज आपण करून घेतो! पण तो गैरसमजच! प्रत्यक्षात द्रौपदीचा सर्वात लहान पुत्र १७-१८ वर्षांचा व अभिमन्यु २४-२५ वर्षांचा होता हे खरे!

Sunday, July 3, 2011

महाभारताबद्दल काही गैरसमजुती - भाग २

‘दैवायत्तं कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम्’
कर्णाच्या तोंडचे हे वाक्य फार प्रसिद्ध आहे. उत्तम कुलात जन्म न लाभलेल्या पण असाधारण कर्तबगारी अंगी असलेल्या अनेक व्यक्तीना या वाक्याने स्फूर्ती दिली असेल. ही उक्ती महाभारतात असणार अशी आपली ठाम समजूत असते. मात्र महाभारतात शोधू गेले असता हे वाक्य सापडत नाहीं!
हे महाभारतातील वचन नाहीच मग सापडणार कसे? ‘वेणीसंहार’ नावाच्या संस्कृत नाटकात कर्ण आणि अश्वत्थामा यांच्या कलहाचा एक जोरदार प्रवेश आहे. त्यात अश्व्त्थाम्याने कर्णाला सूतपुत्र म्हणून हिणवल्यावर कर्णाने त्याला हे प्रत्युत्तर दिले आहे. पूर्ण श्लोक असा आहे –
सूतोSवा सूतपुत्रोSवा यो वा को वा भवाम्यहम् |
दैवायत्तम् कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम् ||

Thursday, June 30, 2011

महाभारताबद्दल काही गैरसमजुती - भाग १

काही शब्दप्रयोग आपल्या कानावर बालपणापासून पडत आलेले आहेत आणि त्यामुळे ते खरेच आहेत असे आपण गृहीत धरतो. पण ते गैरसमजुतीवर आधारलेले असतात.
१. ‘हा सूर्य व हा जयद्रथ’ –
जयद्रथ वधाचे दिवशी कृष्णाने काहीतरी उपायाने काही काल सूर्य दिसणार नाहीं असें केले. मग जयद्रथ ‘आपण आतां वाचलो’ असें समजून गैरसावध झाला. कौरव वीरही गैरसावध झाले. जयद्रथ अर्जुनासमोर आल्यावर कृष्णाने सूर्यासमोरचे आच्छादन अचानक काढून घेतले व अर्जुनाला म्हटले ‘हा सूर्य व हा जयद्रथ’ मग लगेच अर्जुनाने जयद्रथाला बाण सोडून मारले. अशी कथा बालपणापासून हरदास पुराणिक आपल्याला सांगत आले. आणि ती आपण खरी मानत आलो!
महाभारतात असें काही नाहीं. प्रत्यक्षात काय घडले याचे विस्तृत विवेचन मी पूर्वी केलेच आहे. अर्जुनाने अखेरचा बाण मारून जयद्रथाचा वध केला तोपर्यंत तो स्वत:च्या रथावर बसून जमेल तसा अर्जुनाचा प्रतिकार करत होता कृष्णाने अर्जुनाला सावध केले कीं ‘सूर्य अस्ताला जाण्याची वेळ जवळ आली आहे तेव्हा वेळ फुकट घालवू नकोस.’ मग अर्जुनाने तो अखेरचा बाण सोडला व जयद्रथाचा वध केला. त्यानंतरही काही काळ युद्ध चालू राहिले व मग सूर्यास्त झाला. ‘हा सूर्य व हा जयद्रथ’ असें शब्द महाभारतात कृष्णाच्या तोंडी मुळीच आलेले नाहीत. आपले गैरसमज मात्र पक्के असतात त्यामुळे यां शब्दांना साहित्यात व व्यवहारातही अनेकदां स्थान मिळते.

Thursday, May 19, 2011

अभिमन्युवध - भाग ८

दिवस मावळला. सैन्ये शिबिरात परतलीं. त्यानंतर संशप्तकांकडून कॄष्ण व अर्जुन परत आले असे महाभारत म्हणते. पांडव शिबिरात सामसूम व शोक पाहून काय झाले ते अर्जुनाने विचारले व मग नाइलाजाने युधिष्ठिराने अभिमन्यु मारला गेल्याचे अर्जुनाला सांगितले. त्याने अर्जुनाला सांगितलेली हकिगत व आधीच्या लेखात दिलेली हकीगत यात किरकोळ विसंगति दिसते. युद्धाच्या सुरवातीला पांडववीरानी संयुक्तपणे द्रोणावर हल्ला केल्याचे व तो द्रोणाने परतवून लावल्याचे युधिष्ठिर सांगत नाही. तो म्हणाला, ’मला पकडण्याचा द्रोणाने शर्थीचा प्रयत्न केला आणि त्याचाच प्रतिकार आम्हाला जड पडत होता मग सैन्याचा मुख्य चक्रव्यूह कोण तोडणार हा प्रष्न होता. नाइलाजाने ते काम अभिमन्यूवर सोपवावे लागले कारण त्यालाच ते माहीत होते. त्याने व्यूह तोडल्यावर त्याच वाटेने त्याच्या पाठोपाठ जाऊन त्याचे रक्षण करण्याचे आमचे सर्व प्रयत्न जयद्रथामुळे विफल झाले आणि अभिमन्यु एकटाच व्यूहात सापडला. मग द्रोण, कृप, अश्व्त्थामा, कर्ण, बृहत्बल व कृतवर्मा यांनी त्याला घेरले आणि अखेर दु:शासनपुत्राकडून तो मारला गेला.’
अर्जुन संशप्तकांकडे अडकलेला असो वा माझ्या शंकेप्रमाणे शिबिरातच असो, पण एक दिवस तो नसताना त्याचा पुत्र मारला गेला. अर्जुनाने, जणू, जयद्रथाला या अनर्थाला जबाबदार धरून, ’उद्या सूर्यास्तापूर्वी मी जयद्रथाचा वध करीन, नाहीतर अग्निकाष्टे भक्षण करीन’ अशी घोर प्रतिज्ञा अचानक केली. प्रत्यक्षात अभिमन्यूला घेरणार्‍या सहाही वीरांना सोडून (त्यातील बृहत्बलाला अभिमन्यूनेच मारले होते.) जयद्रथाला मारण्याची प्रतिज्ञा अर्जुनाने कां केली हे एक जरासे कूट आहे. आपले हरदास-पुराणिक म्हणत कीं अर्जुन आणि कृष्ण रणात अभिमन्युचा शोध घेत फिरत होते व मरणासन्न अभिमन्यूने त्याना सर्व हकीगत स्वत:च सांगितली. रणात पडलेल्या अभिमन्यूला जयद्रथाने लाथ मारली हे अभिमन्यूकडून ऐकून चिडून अर्जुनाने त्याच्या वधाची प्रतिज्ञा केली. महाभारतात असें काही मुळीच नाही. थोडा विचार केल्यावर अर्जुनाच्या प्रतिज्ञेचा मला असा खुलासा सुचतो कीं कौरववीरांनी अनेकांनी मिळून एकट्या पडलेल्या अभिमन्युचा वध केला तर आतां त्या सर्वांना अर्जुनाचे हे एक निर्वाणीचे आव्हान होते कीं ‘मी जयद्रथाच्या वधाची प्रतिज्ञा केली आहे, ती माझ्या एकट्याच्या बळावरच विसंबून. अभिमन्यु एकटाच होता त्याला तुम्ही सर्वानी मिळून मारलेत, आता तुमच्यात बळ असेल तर सर्वांनी मिळून जयद्रथाला एकट्या माझ्यापासून वांचवा!’ पुत्राच्या मृत्यूमुळे त्याला अनिवार शोक झाला असणारच तेव्हा आता एक तर कौरववीरांचा नक्षा उतरवणे किंवा स्वत: मरून जाणेच श्रेयस्कर असे त्याला वाटणे स्वाभाविक म्हटले पाहिजे. दुसर्‍या दिवशी काय घडले याचा विस्तृत परामर्ष मी पूर्वीच जयद्रथवध प्रकरणात घेतला आहे. तो वाचकानी अवश्य पुन्हा नजरेखालून घालावा. अनेकांनी मिळून केलेला अभिमन्यूचा वध कौरवपक्षाला फार महाग पडला व दिवस अखेर पांडवपक्षाची अंतिम विजयाकडे वाटचाल सुरू झाली एवढेच म्हणून हा विषय पुरा करतों.

Monday, May 16, 2011

अभिमन्युवध - भाग ७

जयद्रथाला मिळालेल्या वराची हकीगत पांडव पक्षाच्या वीराना व्यूहात शिरण्यात आलेल्या अपयशावर पांघरूण घालण्यासाठी रचली असावी असा संशय येतो! जयद्रथाला स्वप्नात शंकराने वर दिला असें म्हटले आहे त्यामुळे असें वाटते. काही असो, अभिमन्यु चक्रव्यूहात एकटा अडकला. त्याने दिवसभर कोरवांच्या पक्षाच्या एकाही महावीराला दाद दिली नाही. अनेकजण मिळून चालून आले तरीहि त्याने त्याना पळवले. त्याने कोणाकोणाला मारले याची मोठी यादी होईल. अखेर द्रोणाचा सल्ला मानून कर्णाने पुन्हा अभिमन्यूवर चाल केली आणि अखेर त्याचे धनुष्य तोडले. महाभारतातील युद्धवर्णनात अनेक वीरांचीं धनुष्ये अनेकवार तोडली गेल्याचे उल्लेख येतात. त्याला अपवाद फक्त अर्जुनाचा! त्याचे गांडीव धनुष्य मात्र कधीहि तोडले गेल्याचा उल्लेख मिळत नाही. कर्णाजवळ गांडीवधनुष्याच्या तोडीचे धनुष्य होते असे म्हटलेले आहे मात्र त्याचे धनुष्य जयद्रथवधाचे दिवशी भीमाने मोजून सतरा वेळां तोडले असे वर्णन आहे. सात्यकी, अभिमन्यु आणि इतर अनेकांनीहि ते तोडले. धनुष्य तोडणे याचा अर्थ प्रत्यंचा तोडणे असाहि कदाचित असेल!
अभिमन्यूचे धनुष्य तुटले, सारथी मेला, घोडे मेले. मग हाताशी मिळेल त्या आयुधाने त्याने युद्ध चालूच ठेवले. अखेर सर्व संपल्यावर दु:शासनाचा पुत्र व अभिमन्यु यांचे गदायुद्ध झाले, दोघे मूर्छित पडले मात्र दु:शासनपुत्र आधी शुद्धीवर आला व त्याने गदेच्या प्रहाराने अभिमन्यूची अखेर केली. दिवस संपत आलेला होता. त्यामुळे युद्ध संपवून दोन्ही सैन्ये माघारीं फिरलीं.

Wednesday, May 11, 2011

अभिमन्युवध - भाग ६

कौरवपक्षाचे अनेक महावीर अभिमन्यूवर चालून आले. कर्णासह सर्वांना अभिमन्यूने अनेकवार चकमकींत हरवून पळवून लावले. शल्याला हरवल्यावर त्याचे सैन्य पळून जाऊ लागले तेव्हां त्याच्या भावाने ते सावरून धरले. मात्र अभिमन्यूने त्याच्यावर हल्ला चढवून त्यालाच मारले. अभिमन्यूचा पराक्रम पाहून द्रोण त्याचे कौतुक करू लागला तेव्हा दुर्योधनाला राग येऊन तो द्रोणाला म्हणाला कीं ’त्याचे कौतुक कसले करता? तो कोणालाच आवरत नाहीं. त्याच्या वधाचा उपाय सांगा.’ तेव्हा द्रोणाने म्हटले कीं ’त्याच्या हातातले धनुष्य चालू आहे तोंवर आपल्या कोणाही वीराला तो दाद देणार नाही. एकजुटीने हल्ला करूनहि तुमचा निभाव लागत नाही. तेव्हा प्रयत्नपूर्वक त्याचे धनुष्य तोडा!’ अभिमन्युपुढे कोणीच उभा राहूं शकत नव्हता. कर्णालाहि त्याने पुन्हापुन्हा पळवून लावले. त्याच्या भावाला अभिमन्यूने मारले. एक उल्लेख आहे कीं ’एक जयद्रथ सोडला तर इतर कोणाचेच काही चालत नव्हते’ मात्र प्रत्यक्षात जयद्रथ व अभिमन्यूचे युद्ध झालेले अजिबात वर्णिलेले नाही!
अभिमन्यु चक्रव्यूहात एकटाच शिरला अशी समजूत आहे. एके ठिकाणी मात्र असाही उल्लेख संजयाच्या वर्णनात आहे कीं ’युधिष्ठिर, भीम, शिखंडी, सात्यकी, धृष्टद्युम्न व इतर अनेक अभिमन्यूच्या मार्गाने गेले व त्याच्या भोवती संरक्षक कडे करून त्यानी कौरवांचा पाठलाग केला, मात्र मग त्या सर्वांना जयद्रथाने अडवले'एके ठिकाणी असाहि उल्लेख आहे कीं ’अभिमन्यूच्या सारथ्याने व्यूहात पडलेल्या भगदाडातून कौशल्याने त्याचा रथ बाहेर काढला व पांडवानी त्याचा जयजयकार केला.’ मात्र हे क्षणिक उल्लेख सोडले तर अभिमन्यु एकटाच चक्रव्यूहात शिरला आणि त्याने उघडून दिलेल्या वाटेने इतर पांडववीर व्यूहात शिरण्याचा प्रयत्न करीत असताना एकट्या जयद्रथाने त्यान यशस्वीपणाने अडवून धरले असेच महाभारत म्हणते. त्याला वर मिळाला होता कीं ’युद्धात कोणत्यातरी एका दिवशी अर्जुन सोडून इतर सर्व पांडवाना तूं अजिंक्य ठरशील.’ हा वर त्याने जेव्हा पांडव वनात असताना द्रौपदीला एकटी असताना पळवण्याचा प्रयत्न केला होता व मग पांडव परत आल्यावर भीमार्जुनानी तिला सोडवून मग त्याची भयानक अप्रतिष्टा केली होती तेव्हा चिडून जाऊन तप:चर्या करून मिळवला होता असे महाभारत म्हणते. यात गोम अशी आहे कीं या वरामध्ये सात्यकी किंवा धृष्टद्युम्न किंवा पांडवाकडील इतर रथी-महारथी यांचा समावेश कुठे होता? मग त्यांचेहि जयद्रथापुढे कां चालले नाही? महाभारत याचा खुलासा करत नाही! अर्थ इतकाच घ्यावयाचा कीं Every dog has his day या उक्तीप्रमाणे हा जयद्रथाचा दिवस होता! त्यामुळे अभिमन्यूच्या मदतीला कोणीहि व्यूहात शिरू शकले नाही.

Sunday, May 1, 2011

अभिमन्युवध भाग ५

संजयाने सर्व १८ दिवसांच्या युद्धाचे वर्णन धृतराष्ट्राला ऐकविले हे सर्व ज्ञात आहे. त्याचेसाठी कृष्णाने त्याला दिव्यदृष्टि दिली होती, तो सर्ववेळ धृतराष्ट्रापाशी बसून युद्धाचा ’आंखों देखा हाल’ त्याला ऐकवत होता, अशी एक भोळसट हरदासी समजूत आहे. प्रत्यक्षात तसे काही नाही. संजय प्रत्यक्ष युद्धभूमीवरच उपस्थित होता असे अनेक उल्लेख युद्धवर्णनात आहेत. शेवटच्या दिवशी तर त्याने स्वत: युद्धातहि भाग घेतला! मात्र त्याचे आधी, त्याला युद्धभूमीवर कोठेहि फिरण्यास आडकाठी करू नये असे दोन्ही पक्षानी मान्य केले असावे. आजहि वृत्तपत्रे वा रेडिओ-टीव्ही याना असे स्वातंत्र्य असते. त्याने, भीष्म पडल्यावर, द्रोण मारला गेल्यावर, कर्णाचा मृत्यु झाल्यावर व अखेरच्या दिवशी, अशा चार टप्प्यात युद्धाचे वर्णन धृतराष्ट्राला प्रथम संक्षिप्त व पुन्हा खुलासेवार असे ऐकवले असे महाभारतच म्हणते! पण कृष्णाला देवाचा अवतार बनवणाराना कोण आवरणार?
या दिवसाचे युद्धवर्णनहि व्यासानी संजयाच्या तोंडून धृतराष्ट्राला ऐकवले आहे. युद्धाला तोंड लागले तेव्हां चक्रव्यूहाच्या पुढे द्रोण स्वत:, जयद्रथ, अश्वत्थामा, शकुनि, शल्य व भूरिश्रवा हे पांडवांना सन्मुख सज्ज होते. द्रोणाने युधिष्ठिरावर आक्रमण करण्यापूर्वीच पांडवांच्या प्रमुख वीरांनी द्रोणावरच हल्ला केला. मदतनिसांच्या सहाय्याने द्रोणाने त्याना यशस्वीपणे तोंड दिले. आता आपल्या वीरांची परवा न करतां द्रोण आपल्यावरच कोसळेल असे दिसल्यामुळे (अर्जुन अर्थातच जवळ नव्हताच), नाइलाजाने युधिष्ठिराने अभिमन्यूला द्रोणावर आक्रमण करण्यास सोडले. हा वेळ पर्यंत चक्रव्यूह मागे तसाच होता. तो तोडण्यासाठी कोण पुढे येतो हे द्रोण पहात होता. तोंच द्रोणावर आक्रमण करून अभिमन्यूने अचानक, द्रोणाचीहि पर्वा न करतां, मुख्य चक्रव्यूहावरच आक्रमण केले. चक्रव्यूह तोडून आत घुसून त्याने अनन्वित संहार आरंभला. त्याचा प्रतिकार करण्यासाठी दुर्योधन स्वत; पुढे झाला. अभिमन्यु हा महारथी असल्यामुळे दुर्योधनाचा पाड लागणार नाही हे जाणून द्रोणाने त्याच्या मदतीला दु:सह, दु:शासन, कृप, विविंशति, यांचे बरोबरच, स्वत:जवळ असलेल्या अश्वत्थामा, भूरिश्रवा, शल्य, शकुनि यानाहि पाठवले व मग काही वेळाने तो स्वत:हि तिकडेच धावला. यामुळे युधिष्ठिरावर हल्ला करण्याचा बेत बाजूलाच पडला. युधिष्ठिराचा हेतु त्या वेळेपुरता सफळ झाला पण त्याची फार भयानक किंमत पांडवांना मोजावी लागली.

Wednesday, April 27, 2011

अभिमन्युवध - भाग ४

तिसर्‍या दिवशी पुन्हा त्रिगर्तानीच अर्जुनाला आव्हान दिले व अर्जुन पुन्हा एकदा त्यांच्याशी लढायला गेला असे महाभारत म्हणते. दुसर्‍या दिवशीच्या त्रिगर्त-अर्जुन युद्धाचे दीर्घ आणि रसभरित वर्णन करणार्‍या व्यासानी या दिवशीचे अर्जुन-त्रिगर्त युद्ध कसे झाले, कोणी काय पराक्रम केला, अर्जुनाने कोणाकोणाला मारले याबद्दल अवाक्षरहि लिहिलेले नाही. सर्व दिवसाच्या युद्धाचे वर्णन फक्त दोन श्लोकांत ’उरकले’ आहे. हे अतिशय संशयास्पद आहे! शिवाय यादिवशी युधिष्ठिराच्या रक्षणाची कोणतीहि व्यवस्था अर्जुनाने केली नव्हती! आदल्या दिवशी ती जबाबदारी सत्यजितावर सोपवली त्याचे काय झाले हे कृष्णार्जुनाना ठाऊक नव्हते काय? या सर्वांमुळे मला असा दाट संशय आहे कीं त्या तिसर्‍या दिवशी अर्जुन थकव्यामुळे वा जखमांमुळे युद्धाला बाहेर पडलाच नसावा! मात्र या तर्काला महाभारत ग्रंथात कोणताही आधार मला देता येत नाही. या दिवशी अर्जुन युद्धात असणार नाही हे बहुधा कौरवपक्षाला खात्रीपूर्वक माहीत नसावे कारण तसे असते तर द्रोणाने युधिष्ठिराला पकडण्याच्या दृष्टीने ’आक्रमक’ व्यूहरचना केली असती. प्रत्यक्षात त्याने दुर्योधनाला आश्वासन दिले कीं ‘आज मी पांडवपक्षाच्या एकातरी प्रमुख वीराचा वध घडवून आणीन!’ आणि त्याने कौरव सैन्याचा चक्रव्यूह रचला. या व्यूहाचे ’भेदण्यास अत्यंत अवघड’ असे व्यासानी वर्णन केले आहे. हे वर्णन बचावात्मक व्यूहाला जास्त योग्य वाटते आक्रमक व्यूहाला नव्हे! त्यामुळे असे वाटते कीं अर्जुन आज कदाचित युद्धामध्ये नसेल याची कौरवाना काही कल्पना असती तर द्रोणाने सर्व बळ एकवटून युधिष्ठिराला पकडण्याचा प्रयत्न केला असता. बचावात्मक व्यूह रचला नसता. प्रत्यक्ष युद्धाला तोंड लागल्यावर काय झाले ते पुढील लेखात पाहूं

Friday, April 22, 2011

अभिमन्युवध - भाग ३

पहिल्या दिवशी अर्जुन त्रिगर्त सैन्याशी लढण्यात बराच काल व्यग्र राहिला. हे संशप्तक सैन्य हे एक जरासे धुसर प्रकरण आहे. युद्धाच्या पहिल्या दिवसापासून यांनी आव्हान दिले कीं अर्जुन त्यांच्याशी लढत बसे. अठरा अध्याय गीता ऐकून देखील अर्जुन पितामह भीष्म वा गुरु द्रोण यांच्याशी अटीतटीने लढण्यास कधीच उत्सुक नसे. तो आपला संशप्तकांशी लढत राही! अगदी पांडवांच्या इतर वीराना भीष्म वा द्रोण झेपेनासे झाले म्हणजे त्याला पुढे व्हावेच लागे. कृष्णही त्याला तसे करू देत होता असें दिसते. या द्रोणपर्वातीलप्रथम दिवशीही दिवस अखेर द्रोणाचा हल्ला परतवण्यासाठी अर्जुनाला संशप्तकांचा नाद सोडून देऊन द्रोणाशी सामना करावा लागला. मात्र द्रोणालाही युधिष्ठिराला पकडण्यात यश आले नाही. दुर्योधनाने नाराजी व्यक्त केल्यावर द्रोणाने पुन्हा निक्षून सांगितले कीं अर्जुन प्रतिकार करत असताना युधिष्ठिराला पकडणे मला जमणार नाही तेव्हां त्याला दिवसभर अडकवून ठेवा. मग पुन्हा त्रिगर्तराज सुशर्मा, त्याचे भाऊ व इतर त्रिगर्त वीरांनी हे आव्हान स्वीकारले व आम्ही पडेल ती किंमत देऊन उद्यां दिवसभर अर्जुनाला व्यग्र ठेवूं असे दुर्योधनाला आश्वासन दिले. त्याप्रमाणे युद्धाच्या बाराव्या दिवशी अर्जुन युधिष्ठिराच्या रक्षणाचे काम सत्यजित नावाच्या द्रुपदपुत्रावर सोपवून त्रिगर्तांशी लढायला गेला. वास्तविक, सत्यजित हा कोणी सात्यकी वा धृष्टद्युम्न यांच्यासारखा महावीर नव्हता. तेव्हां ही व्यवस्था पुरेशी नव्हती. पण याबद्दल युधिष्ठिर, इतर पांडव वा कृष्ण यांनी नाराजी व्यक्त केली नाही. बहुधा वेळ आलीच तर नेहेमीप्रमाणे आपण त्रिगर्ताना सोडून परत येऊं असे अर्जुनाला वाटले असावे. मात्र हा सर्व दिवस त्रिगर्तानी अर्जुनाला सोडले नाही. अर्जुनाने त्यांची अपरिमित हानि केली. अनेकाना मारले. या युद्धाचे रसभरित वर्णन व्यासानी केले आहे. मात्र इकडे बिचारा सत्यजित द्रोणापुढे काही न चालून अखेर मारला गेलाच. दिवसभर प्रयत्न करून द्रोणालाहि युधिष्ठिराला पकडता आले नाहीच कारण इतर पांडवपक्षाच्या वीरानी प्रखर प्रतिकार केला. दिवसाच्या उत्तरभागात कौरवपक्षाचा एक योद्धा भगद्त्त हा पांडवांना फार भारी पडूं लागला व कोणालाही आवरेना त्यामुले अखेरीस, द्रोण बाजूलाच राहून, अर्जुनाला भगदत्ताचाच प्रतिकार करण्यासाठी धाव घ्यावी लागली. अर्जुनाने भगदत्ताला मारेपर्यंत दिवस मावळला व दुर्योधन व द्रोण यांचा युधिष्ठिराला पकडण्याचा मुख्य बेत असफलच राहिला. दुर्योधनाने नाराजी व्यक्त केल्यावर द्रोणाने पुन्हा तेच कारण सांगितले कीं अर्जुन असताना जमणार नाही.

Tuesday, April 19, 2011

अभिमन्युवध - भाग २

अभिमन्यूचा वध ही भारतीय युद्धातील एक फार महत्त्वाची घटना आहे. कारण आपल्या मुलाच्या मृत्यूमुळे चिडून जाऊन अर्जुनाने जयद्रथाचा दुसऱ्या दिवशींच वध करण्याची प्रतिज्ञा केली आणि दिवसभर जयद्रथाचे अर्जुनापासून संरक्षण करण्याचा कौरवांनी आटोकाट प्रयत्न करूनही ते जयद्रथाला वाचवू शकले नाहीत. अर्जुनापुढे आपले कोणाचेच काही चालत नाही हे त्याना कळून चुकले. जयद्रथाच्या वधाबद्दल मी विस्ताराने लिहिले आहे. त्यामुळे आतां त्याची पार्श्वभूमी असलेल्या अभिमन्यू वधाबद्दल लिहिणार आहे.
युद्धाचे पहिले दहा दिवस भीष्म कौरवांचा सेनापती होता. त्याने प्रथमच दुर्योधनाला सांगितले होते कीं मी एकाही पांडवाला मारणार नाही. दहा दिवसात पांडव पक्षाचा एकही प्रमुख वीर मेला नव्हता. भीष्माने पांडव सैन्याचा मात्र फार संहार केला होता. भीष्म शरपंजरी पडल्यावर त्याने दोन्ही पक्षांना युद्ध संपवा असें विनवले होते. मात्र ते शक्य नव्हते. भीष्म पडल्यावर दुर्योधनाने द्रोणाला सेनापती होण्यास विनवले. त्याने ते स्वीकारले. येथून पुढे डावपेचाचे युद्ध झाले. सुरवातीलाच द्रोणाने दुर्योधनाला विचारले कीं तुला काय हवे आहे. त्यावर दुर्योधनाने म्हटले कीं ‘युधिष्ठिराला पकडावे. द्रोणाने आनंद व्यक्त केला कीं ‘तू युधिष्ठिराला मारुं इच्छित नाहीस.’ दुर्योधनाने म्हटले कीं ‘युधिष्ठिराला मारून युद्ध संपणार नाही, इतर पांडव आमचा सर्वनाश केल्याशिवाय राहणार नाहीत. युधिष्ठिराला पकडले तर मी त्याला पुन्हा द्युत खेळायला बसवीन व पुन्हा वनवासाला धाडीन.’ द्रोणाला हा विचार पसंत पडला कारण पांडवाना मारण्याचे अप्रिय काम यामुळे टळणार होते. द्यूत खेळणे योग्य कीं अयोग्य याचा विचारही त्याला पडला नाही. तेव्हा त्याने मान्य केले कीं ‘मी युधिष्ठिराला पकडण्याचा आटोकाट प्रयत्न करीन मात्र अर्जुन त्याचे संरक्षण करण्यास उपस्थित असेल तर हे शक्य होणार नाही. तेव्हां त्याला काही करून दूर ठेवा.’ दुर्योधनाने हे मान्य केले. पुढील तीन-चार दिवस कौरवांचा हा मुख्य युद्धहेतू राहिला व सर्व युद्धबेत त्याप्रमाणे ठरले. ही गोष्ट अर्थातच पांडवाना समजलीच व त्यांनीही युधिष्ठिराचे संरक्षण करण्याला प्राधान्य दिले.

Monday, April 18, 2011

अभिमन्युवध भाग १

महाभारतांतील विविध विषयांवर विस्ताराने लिहून झाले. माझ्या अपेक्षेपेक्षाहि अनेक वाचक, विषेशेकरुन तरुण वाचक मला लाभले. नवीन लिहिण्यासारखे मला काहि सुचले नसल्यामुळे लिखाण बरेच दिवस बंदच आहे. मात्र अजूनहि नित्यनेमाने हा ब्लॉग नवनवीन व जुनेहि वाचक वाचतच आहेत. आजपासून एका नवीन विषयाला सुरवात करीत आहे. खरे तर जयद्रथवधावरच्या माझ्या लेखांमध्ये त्याची पार्श्वभूमि या नात्याने अभिमन्युवधाबद्दल थोडेफार लिहिले आहेच तेव्हां काही प्रमाणात पुनरुक्ति होणार आहे. ती आपण चालवून घ्यावी.

Friday, April 1, 2011

ब्लॉग स्पर्धा

या ब्लॉगला स्टार माझाच्या स्पर्धेत बक्षीस मिळाले हे वाचकांस माहीत आहेच. बक्षीससमारंभाचे चित्रीकरण दि. २७ मार्चला दाखवले गेले. श्री. गंगाधर मुटे यांनी त्याची व्हिडिओ क्लिप पाठवली त्यातला पांचवा भाग (ज्यात मी आहे!) खालील URL वर YOUTUBE वर पाहतां येईल.

http://www.youtube.com/watch?v=301ZV7LNEqU

तुम्ही पहाल अशी आशा आहे.

धन्यवाद.
प्र. के. फडणीस

Monday, January 10, 2011

महाभारतातील भीष्मचित्रण - भाग ९

अज्ञातवास संपल्यावर पांडवांतर्फे द्रुपदाचा पुरोहित कौरवांकडे आला व त्याने राज्याची मागणी केली. ती दुर्योधनाने नाकारली. भीष्माने पुरोहिताला सांगितले कीं आम्ही विचार करून काय तो जबाब कळवू. पांडवांची मागणी मान्य केलीच पाहिजे असा आग्रह भीष्माने धरला नाहीं. मागणी नाकारली गेली. कटु सवाल जबाबांनंतर अखेरचा प्रयत्न म्हणून पांडवांतर्फे कृष्ण कौरवदरबारांत शिष्टाईला आला. पांडवांचा, अज्ञातवास पुरा केल्याचा दावा वादग्रस्त आहे हें ओळखून, कृष्णाने त्यावर मुळीच भर न देतां शम हा दोन्ही पक्षांना कसा हितावह आहे यावरच जोर दिला. दुर्योधनाने पांडवांचा दावा सपशेल फेटाळून लावला व ’युद्धाला भिऊन मी राज्य देणार नाहीं’ असे म्हटलें. यावर भीष्मद्रोणांनी ’तूं असा आडमुठेपणा केलास तर आम्ही तुझी बाजू घेणार नाहीं, युद्धापासून अलिप्त राहूं’ असे त्याला बजावले नाहीं. पांडवांचे मुख्य समर्थक द्रुपद व पांचालराजपुत्र असल्यामुळे द्रोणाला त्यांच्याशीं युद्धाची खुमखुमी असणे समजूं शकतें पण भीष्माने अशी धमकी दिली असती तर जन्मभर भीष्माच्या हो ला हो करणार्‍या द्रोणालाहि स्वस्थ बसावें लागले असते. भीष्माने असे कांही केले नाहीं. पांडवांचा अज्ञातवास पुरा केल्याचा दावा त्यालाहि मान्य नव्हता काय? त्याने तसेंहि म्हटलेले नाहीं! दुर्योधन अजिबात बधत नाही असे दिसल्यावर कृष्णाने अखेर धृतराष्ट्र, भीष्म व इतरांना बजावलें कीं कुलक्षय टाळण्यासाठी तुम्ही दुर्योधनाला आवरा. तसे केलेत तर पांडवांना मी आवरीन.’ कोणीहि काही केले नाही. एव्हांना दुर्योधनाला ठामपणे विरोध करण्याचे बळ वा इच्छाशक्ति भीष्म वा इतर कोणातहि उरली नव्हती. शिष्टाई असफल होऊन कृष्ण परत गेला व कार्तिक प्रतिपदेपासून युद्ध सुरू करूं असा कर्णातर्फे त्याने कौरवांना निरोप दिला. युद्ध आतां अटळ होतें.
भीष्माने या अटीतटीच्या वेळीदेखील कौरवपक्ष सोडून पांडवांची बाजू घेण्याचा विचारहि केलेला दिसत नाही. त्याने अजूनहि तसा धाक दुर्योधनाला घातला असता तर द्रोण, कृप, अश्वत्थामा यांनी काय केले असते, दुर्योधनाने काय केले असते, हे तर्क निष्फळ आहेत. कौरवांचे दुर्योधनाने देऊं केलेले सेनापतिपद भीष्माने खळखळ न करतां स्वीकारलें. फक्त एकच अट घातली कीं ’एकतर कर्ण किंवा मी, एकच कोणीतरी लढेल’. यात मात्र एक गोष्ट दिसून येते कीं युद्धावर नियंत्रण ठेवण्याचा त्याचा हेतु असावा. आततायी व पांडवाचा दीर्घद्वेष करणार्‍या कर्णाला ’अर्धरथी’ ठरवण्यामागे आणि अशी अट घालण्यामागे कर्णाने युद्धापासून दूर रहावें हाच भीष्माचा हेतु होता तो अचूक सफळ झाला. ’भीष्म जिवंत असेपर्यंत मी युद्धात भाग घेणार नाही कारण मी कितीहि पराक्रम केला तरी विजयाचे श्रेय सेनापति या नात्याने भीष्मालाच मिळेल. भीष्माच्या मृत्यूनंतरच मी युद्धाला उभा राहीन.’ असे त्याने दुर्योधनाला म्हटले. ज्याच्यावर दुर्योधनाचा भरवसा होता त्या कर्णानेच एक प्रकारे त्याला दगा दिला! कर्णासाठी भीष्माला बाजूला सारण्याचे धैर्य दुर्योधनाला झाले नाही. ’मी रोज १०,००० सैन्य मारीन पण एकाहि पांडवाला मारणार नाही’ हेहि भीष्माने दुर्योधनाला प्रथमच सांगून टाकलें. यावरून माझा तर्क असा कीं सर्व राजे व प्रचंड सैन्य जमलें आहे तेव्हां थोडेंफार युद्ध अटळच आहे तर तें जमेल तितके नियंत्रणाखालीं ठेवलें तर निदान कुलक्षय टळेल असा भीष्माचा प्रयत्न दिसतो. त्याच्या सेनापतित्वाखाली पहिले दहा दिवस युद्ध झाले तोंवर धर्मयुद्धाचे त्यानेच घालून दिलेले नियम सर्रास मोडले जात नव्हते. जरी सैन्याचा व कित्येक वीरांचा मृत्यु झाला होता तरी कौरव व पांडवांपैकी कोणीहि मेले नव्हते. त्यामुळे भीष्माचा हेतु साध्य झाला होता असे म्हटले पाहिजे. युद्धामध्ये भीष्माला कोणीहि रोखूं शकत नव्हतें. तो फार अनावर झाला म्हणजे नाइलाजाने अर्जुनालाच त्याचेशीं लढावे लागत होते. अंबेने ज्या शिखंडी रूपाने पुनर्जन्म घेतला होता त्याचेशी युद्ध करण्याचे भीष्म नाकारत राहिला कारण शिखंडी प्रथम स्त्री म्हणून जन्माला आला होता. मात्र शिखंडीचे हातून भीष्म मेला असे महाभारत मुळीच म्हणत नाही. त्याचे आड राहून अर्जुनाने भीष्माशी युद्ध केले असेहि महाभारत म्हणत नाही. युद्धाच्या दहाव्या दिवशीं अर्जुनाचेच प्रखर बाण लागून अखेर भीष्म शरपंजरीं पडल्यावर ’आतांतरी युद्ध पुरे करा’ असें त्याने दोन्ही पक्षांना सांगितले पण आतां फार उशीर झाला होता. कुलक्षय व्हायचा टळला नाहीं. उत्तरायण लागेपर्यंत भीष्म शरपंजरी जीव धरून होता. त्यामुळे युद्धाचा भीषण शेवट त्याला मृत्यूपूर्वी ऐकावा लागला.
भीष्मचरित्राचा आढावा घेतल्यावर त्याच्या वागण्याचा कित्येक वेळां उलगडा होत नाहीं असेंच म्हणावे लागते. ज्या कुरुकुळाच्या वाढीसाठी तो कौरव-पांडवांच्या जन्मापर्यंत आपल्यापरीने झटला त्या कुळातील दुर्योधनाचे अनाचार तो थांबवू शकला नाही. तसा निकराचा प्रयत्नहि त्याने केलेला दिसत नाही. परिणामी कुरुकुळाचा क्षयच त्याला अखेर पहावा लागला. भीष्मप्रतिज्ञा एकप्रकारे विफल झाली असें म्हणावे लागते. मात्र प्रतिज्ञापालनाचा एक उज्वल आदर्श त्याने उभा केला हे खरे.