आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Monday, July 28, 2008

कृष्णशिष्टाई - भाग ६

दुसरे दिवशी कृष्ण कौरवदरबारात उपस्थित झाला. त्याचे यथोचित स्वागत झाले. शिष्टाई ऐकण्यासाठी थोर ऋषि आले होते. त्यांना उचित आसनावर बसविल्यावर मग सभा सुरू झाली. कृष्णाशेजारीं सात्यकी व कृतवर्मा बसले होते. कृष्णाने आपले मुद्देसूद भाषण दुर्योधनाकडे दुर्लक्ष करून, खुद्द धृतराष्ट्रालाच उद्देशून केले. त्याने मुख्य मुद्दे माडले ते असे,
१. क्षत्रिय वीरांचा व सैन्याचा संहार व सर्वनाश न होतां कौरवपांडवांचा शम व्हावा हेच चांगले.
२. तुमच्या थोर कुळात तूं निमित्त होऊन कुलक्षय होऊं नये.
३. शम करणे तुझ्या हातात आहे. तूं कौरवाना आवरलेस तर पांडवाना मी आवरीन.
४. शम केलास तर पांडव व त्यांचे सर्व समर्थक – आम्ही यादवही – तुझ्या आधीन होतील. ते सर्व व तुझे सध्याचे समर्थक मिळून तूं अजिक्य सम्राट होशील.
५. युद्ध झाले तर दोन्ही पक्षांचा प्रचंड संहार होईल. त्यांत तुला काय आनंद?
६. पांडवांची तुला विनंति आहे की आम्ही द्यूताच्या अटी पाळल्या व तूही त्या पाळशील असा विश्वास बाळगला. वडील या नात्याने तूंच आता आमचे रक्षण कर व ठेव म्हणून तुजपाशी ठेवलेले आमचे राज्य आता आम्हाला परत दे.
७. सभेलाही पांडवांची विनंति आहे की येथे धर्मज्ञ सभासद उपस्थित असताना अनुचित गोष्ट वा अन्याय होऊ नये.
८. तुझ्या पुत्रांचा लोभ अनावर झाला आहे. त्यांना तूच आवर.
९. पांडव तुझ्या सेवेला तत्पर आहेत तसेच युद्धालाहि तयार आहेत. उचित काय ते तूंच ठरव.
हे भाषण अत्यंत मुद्देसूद आहे. पांडवांचा दावा स्पष्ट्पणे मांडून युद्ध झालेच तर त्याची जबाबदारी तुमचीच आहे असे बजावले आहे. दुसर्‍या महायुद्धाचे वेळी युद्ध करणारी दोन्ही राष्ट्रे एकमेकांकडे वकील पाठवून आमच्या मागण्या मान्य न केल्यात तर होणार्‍या युद्धाला जबाबदार तुम्हीच असे बजावत असत त्याची आठवण येते! लक्षांत घेण्यासारखी गोष्ट म्हणजे पांडवांनी द्यूताच्या अटी पूर्ण केल्या आहेत असे कृष्ण स्वत: बजावून सांगत नाही! पांडवांचा तुला तसा निरोप आहे असे म्हणतो. पांडवांच्या दाव्यातील कच्चेपणा जाणवत असल्यामुळे त्यावर कमीतकमी भर दिलेला आहे!
यानंतर सभेमध्ये भाषण करून परशुरामाने सांगितले कीं अर्जुन व कॄष्ण हे नर-नारायणांचे अवतार आहेत, त्यांचेविरुद्ध तुम्ही जिंकू शकणार नाही. कण्वमुनीनेहि त्याला दुजोरा दिला. दुर्योधनाने त्यांच्या भाषणाची ’वटवट’ अशी वासलात लावली! व्यास, भीष्म, नारद यानीहि नानाप्रकारे समझावले. त्यांतल्या कोणीहि, पांडवांनी द्यूताच्या अटी पूर्ण केल्या आहेत त्यामुळे त्याना राज्य दिले पाहिजे असे म्हटले नाही! तूं जिंकू शकत नाहीस व सर्वनाश होईल म्हणून शम कर एवढेच म्हटले! मुख्य प्रष्नाला सर्वानीच बगल दिली. धृतराष्ट्राने अखेर दुर्योधनाला समजावण्याची आपली असमर्थता व्यक्त करून कृष्णाला म्हटले कीं तूंच त्याला समजाव. कृष्णाने नानाप्रकारे पांडवाची थोरवी सांगून व दु:शासन, कर्ण यांची निंदा करून समजावले. त्यानंतर पुन्हा भीष्म-द्रोणानी पुन्हापुन्हा सांगितले की युद्ध सुरू होण्यापूर्वीच शम करा. इतक्या सर्वांनी केलेले अप्रिय भाषण एवढावेळ मुकाट्याने ऐकून घेणार्‍या दुर्योधनाने अखेर कृष्णाला आपला मुद्देसूद जबाब ऐकवला. तो असा :-
१. तुम्ही सर्वांनी माझी निंदा करण्याचे मला काही कारण दिसत नाही.
२. पांडव स्वखुशीने द्यूत खेळले व सर्व राज्य व वैभव हरले, तरी अखेर वडिलांनी ते सर्व त्याना परत केले पण तरीहि मी त्याला विरोध केला नाही. त्यानंतर ते पुन्हा अनुद्यूतात हरले व त्याना वनवास – अज्ञातवास भोगावा लागला यात माझा काहीहि दोष नाही.
३. पांडवांनी अज्ञातवास पुरा केलेला नाही. त्यापूर्वीच ते ओळखले गेले.
४. पांडवांना वा त्यांच्या सहाय्यकाना भिऊन मी नतमस्तक होणार नाही. ताठ मानेने वागणे हेच माझ्या क्षात्रधर्माला उचित आहे. युद्धात वीरगतिहि मला प्रिय होईल.
५. वास्तविक पूर्वीच पांडवाना राज्य देणे उचित नव्हते. आम्ही लहान असताना, अज्ञानामुळे व भीतीने ते दिले गेले.
६. आता सुईच्या अग्रावर राहील एवढीहि भूमि पांडवाना मिळणार नाही.
अद्यापपर्यंत संयमाने व दरबारी रिवाजाना धरून होणार्‍या सभेतील कामाने या जबाबानंतर वेगळेच व अनिष्ट वळण घेतले. त्याचे वर्णन पुढील भागात.

Friday, July 25, 2008

कृष्णशिष्टाई - भाग ५

इकडे पांडवांकडे कृष्ण कौरवदरबारात जाणार यावर बरीच चर्चा झाली. युधिष्ठिराने भीति व्यक्त केली कीं तुझा अपमान होईल वा तुला धोका होईल. कृष्ण म्हणाला की तूं माझी काळजी करू नको. माझा मी समर्थ आहे. भीमार्जुनानी प्रथम म्हटले कीं युद्ध टळेल असेच तू बोल. यावर कृष्णाने त्यांची हेटाळणी केली. तेव्हा रागावून दोघानीहि म्हटले की ’तू आमचे मन ओळखत नाहीस काय? कुलक्षय टळत असेल तर ठीकच पण नसेल तर आमचा प्रताप दिसेलच.’ कृष्णानेहि म्हटले की ’यशाची मुळीच आशा नाही पण लोकांनी आपल्याला बोल लावू नये यासाठी मी शेवटचा प्रयत्न करणार आहें’. सहदेव व सात्यकी या दोघानी मात्र म्हटले कीं ’आम्हाला अपमानांचा बदला घेण्यासाठी युद्धच हवे आहे!’ द्रौपदीने आपल्या सर्व घोर अपमानांची कृष्णाला आठवण देऊन म्हटले कीं ’भीमार्जुनाना शम हवा असेच वाटत असेल तर माझा वृद्ध पिता, माझे बंधुबांधव, माझे पुत्र व अभिमन्यु हेच लढतील व अपमानांचा बदला घेतील!’ कृष्णाने तिचे सांत्वन केले व तुला हवे तेच घडेल असे म्हटले. युधिष्ठिराचे मत विचारात घेऊन कॄष्णाने सर्व शस्त्रास्त्रे, सैन्य, सात्यकी व कृतवर्मा यांना बरोबर घेतले. अखेर निघतेवेळी अर्जुनाने पुन्हा स्पष्ट सांगितले कीं अर्धे राज्य किंवा युद्ध! अर्जुनाचा ठाम निर्धार ऐकून भीमाला फार हर्ष जाला.

इकडे कौरवांकडे, कृष्ण येतो आहे हे कळल्यावर, धृतराष्ट्राने त्याच्या स्वागताची जंगी तयारी केली. त्याच्यावर देणग्यांचा वर्षाव करण्याचा बेत केला. विदुराने त्याला खडसावले की तुझी सख्य करण्याची खरी इच्छा नाही पण तू कृष्णाला वश करून घेण्याची आशा करतो आहेस पण ती फोल आहे. तुझ्या स्वागताकडे तो ढुंकूनही पाहणार नाही. दुर्योधनाने याला दुजोरा दिला पण आपल्या स्वभावाप्रमाणे म्हटले की फार मोठा सत्कार केला तर तो भीतीपोटी आहे असे कृष्ण समजेल! उलट माझा तर त्यालाच पकडण्य़ाचा बेत आहे! यावर, हा दुर्योधन पापमार्गाने जात आहे व धृतराष्ट्रा तूंहि त्याचे अनुकरण करू इच्छितोस! मला हे ऐकवत नाही असे म्हणून विदुर सभेतून उठून गेला.

दुसरे दिवशी कृष्ण हस्तिनापुराला आला. भीष्मद्रोणानी त्याचे वाटेतच स्वागत केले. धृतराष्ट्राच्या वाड्यांत सर्वांचे क्षेम कुशल विचारून तो विदुराकडे गेला. तेथे कुंतीची भेट झाली. कुंतीने पांडवाना भोगाव्या लागलेल्या विपत्तींबद्दल शोक केला. पांडवाना, तुमचा पुरुषार्थ दाखवा असा स्पष्ट निरोप दिला. कृष्णाने सांत्वन केल्यावर मात्र, धर्माचा लोप न करतां व कपट न करतां पांडवांच्या हिताचे असे सर्व तू कर असे त्याला सांगितले. त्यानंतर कृष्ण दुर्योधनाला भेटला. त्याने स्वागत करून भोजनाचे आमंत्रण दिले ते मात्र कृष्णाने नाकारले. ’असें कां? तुझे-माझे काही भांडण नाही’ असे दुर्योधनाने म्हटल्यावर, ’पांडवांचा द्वेष तूं करतॊ आहेस व मी त्यांचा दूत म्हणून आलो आहे त्यामुळे तुझ्याकडे अन्नग्रहन मला उचित नाही, मी फक्त विदुराकडेच जेवेन’ असे म्हणून कृष्ण परत आला.

विदुराकडे भोजन होऊन रात्री विश्रांति घेताना विदुराने मत दिले की ’तुझे येणे योग्य नाही. दुर्यॊधन स्वत:च्या, कर्णाच्या व भीष्म-द्रोणांच्या बळावर विसंबून शम करण्यास मुळीच तयार नाही. तुझे प्रयत्न व्यर्थ जाणार आहेत. त्या दुष्टांच्या मेळाव्यात तू जाऊच नकॊ.’ कृष्णाने उत्तर दिले की ’मी कौरवांचाहि आप्त व मित्र आहे. शक्य असूनहि मी युद्ध टाळण्य़ाचा प्रयत्न केला नाही असे कोणी म्हणू नये म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करून मला लोकनिंदा टाळावयाची आहे.’

या सर्व मतप्रदर्शनावरून असे दिसते की, सहदेव, सात्यकी, द्रौपदी व कुंती याना युद्धच हवे होते. भीम व मुख्यत्वे अर्जुन याना कुलक्षय नको होता. पण युद्धाची त्यांची तयारी होती. युधिष्ठिरालाहि कुलक्षय नको होता पण पांच गावे कां होईना, पण दुर्योधनाने दिलींच पाहिजेत म्हणजे द्यूताचा पण पुरा न केल्याचा ठपका येणार नाही असे वाटत होते. युद्ध झालेच तर त्याचा निर्णय काय लागेल याबद्दलहि तो साशंक असावा. अपमानांच्या बदल्य़ासाठी युद्ध त्याला आवश्यक वाटत नव्हते. खरे तर युद्ध अटळच आहे हेहि सर्वांना दिसत होते.

दुसर्‍या दिवशी कौरवदरबारात काय झाले ते पुढील भागात वाचा.

Thursday, July 24, 2008

कृष्णशिष्टाई - भाग ४

संजय पांडवाना बनवण्य़ात अपेशी होऊन परत गेला व त्याने प्रथम धृतराष्ट्राची भेट घेतली. होणार्‍या युद्धाला कौरवच जबाबदार राहतील असे आपले स्पष्ट मत सांगून, पांडवांचा संदेश उद्यां दरबारात सांगेन असे म्हणून तो घरी गेला. अस्वस्थ होऊन धृतराष्ट्राने विदुराला बोलावून त्याच्याशी मसलत केली. त्याने अनेक सद्विचार सांगितले पण धृतराष्ट्र अखेर म्हणाला की मला सर्व पटते पण दुर्योधन समोर आला की माझी बुद्धि फिरते!
दुसरे दिवशी दरबारात धृतराष्ट्राने प्रथम, अर्जुन काय म्हणाला, असे संजयाला विचारले. संजयाने सांगितले कीं अर्जुनाने अनेक प्रकारे आपला निर्धार व्यक्त करून कळविले आहे कीं युद्धांत मी तुम्हा सर्वांचा खास नाश करीन तेव्हा भीष्म, द्रोण, कृप, विदुर यांचा सल्ला ऎका. भीष्म, द्रोणानी कबुली दिली कीं आपण अर्जुनापुढे टिकणार नाही. कर्णाने नेहेमीप्रमाणे, मी एकटाच सर्व पांडवाना मारीन, अशी प्रौढी मिरवली. भीष्माने धृतराष्ट्राला समजावले कीं यात काही अर्थ नाही. हा अनेक वेळा पांडवांकडून हरला आहे हे विसरू नका. द्रोणानेहि भीष्माला दुजोरा दिला. धृतराष्ट्राने नेहेमीप्रमाणे त्यांचेकडे दुर्लक्ष केले! त्याने संजयाला विचारले कीं कोणाच्या भरवशावर पांडव युद्धाला तयार झाले आहेत? आमचे बळ त्याना माहीत नाही काय? त्यावर संजयाने पांडवांकडील सर्व वीरांचे सविस्तर वर्णन केले. पुन्हा पलटी घेऊन, भीमार्जुनांची आपणाला वाटणारी धास्ती सांगून, कौरवांनी युद्ध न करणेच चांगले असे मला वाटते असे धृतराष्ट्र म्हणाला. त्याची धरसोड वृत्ति यातून दिसते.
यावर दुर्योधनाने म्हटले कीं द्यूतांनंतर लगेच सर्व यादव, पांचाल व इतर मित्र पांडवांकडे जमून आमचे पारिपत्य करण्यास तयार झाले होते तेव्हा मदतीला कोणी नसल्यामुळे मला भय होते तेव्हा भीष्म-द्रोणानी मला धीर दिला. आता तर त्यांच्याशिवाय इतरही अनेक वीर व प्रचंड सैन्य माझेपाशी जमले आहे. माझे बळ जाणूनच युधिष्ठिर फक्त पाच गावे मागतो आहे. मला पराभवाची मुळीच भीति वाटत नाही.
अशीच चर्चा पुन्हापुन्हा होऊन अखेर धृतराष्ट्राने दुर्योधनाला दाखवून दिले की भीष्म-द्रोण युद्धाला मुळीच उत्सुक नाहीत. यावर दुर्योधनाने स्पष्ट केले कीं माझा भरवसा मी स्वत:, दु:शासन व कर्ण यांच्यावरच आहे. आम्ही जिंकूं वा मरूं पण सुईच्या अग्रावर राहील एवढीहि भूमि मी जिवंत असेपर्यंत पांडवाना मिळणार नाही! कर्णाने पुन्हा बढाया मारल्या व भीष्माने त्याची निंदा केली. यावर कर्णाने ’भीष्मा तू चिरशांत झाल्यावरच माझा प्रताप सर्वजण पाहतील’ असे म्हणून सभात्याग केला. कौरवपक्षात ही एक मोठी फूट पडली! यानंतर संजयाने सर्वांना सांगितले की अखेरचा प्रयत्न म्हणून कृष्ण स्वत:च पांडवांतर्फे शिष्टाई करण्यासाठी येणार आहे.
यापुढील घटना पुढील भागात वाचा.

Monday, July 21, 2008

कृष्णशिष्टाई - भाग ३

धृतराष्ट्राने संजयाला पांडवांकडे जाण्यापूर्वी स्वत;चे विचार ऐकवले. त्यामध्ये त्याने सर्व प्रमुख पांडववीरांची त्याला वाटणारी भीति व धाक व्यक्त केला. कृष्णाने पांडवांच्या हितासाठीच पूर्वी शिशुपालाचा वध केला असे म्हटले. खरे तर तो काही पांडवांचा वैरी नव्हता, कृष्णाचा वैरी. तो जिवंत असता तर कौरवांना मिळाला असता असा धृतराष्ट्राचा अभिप्राय दिसतो. युद्धापूर्वीच पांडवांचे राज्य त्याना द्यावे हेच मला योग्य वाटते. तेव्हा संजया तू पांडवांना व कृष्णाला भेट व धृतराष्ट्र पांडवांशी सख्य करू इच्छितो असेच त्याना सांग, जे पांडवांचा क्रोध वाढवणार नाही वा युद्धाला कारण होणार नाही असेच समयोचित भाषण सभेत तू कर, असे धृतराष्ट्राने त्याला सांगितले. पण हे सर्व खोटे व वरवरचे होते. त्याला स्पष्ट दिसत होते कीं दुर्योधन, दु:शासन, कर्ण व शकुनि पांडवांचे राज्य परत देण्यास मुळीच तयार नाहीत व युद्धाच्या भीतीने तर नक्कीच नाहीत. मग संजयाला पाठवण्य़ात व मवाळपणे बोल असे त्याला सांगण्यात त्याचा खरा हेतु काय होता? पांडवसभेतील संजयाच्या भाषणात तो उघड झाला!
पांडवानी आपला मुक्काम विराटाच्या राज्यातील उपप्लव्य गावी ठेवला होता व अनेक राजे सैन्यासह तेथे जमले होते. संजय पांडवाना भेटला. युधिष्ठिराने हस्तिनापुरातील सर्वांचे बारकाईने कुशल विचारले. त्यात अश्वत्थामा, कृप, द्रोण आमच्यावर दोषारोप तर करीत नाहीत ना असेहि विचारले. संजयाने सुरवातीलाच सर्वांच्या हितासाठी तूच सलोखा कर असे युधिष्ठिराला विनवले. दरबारात सर्वाना उद्देशून बोलताना धृतराष्ट्र सलोखा करू इच्छितो असेच पुन्हा म्हटले. मात्र खुलासेवार बोलताना, तुम्ही सर्व शत्रूना मारून जिवंत राहिलात तरी ज्ञातिवधाचे दु:ख भोगत रहाल पण खरे तर भीष्म, द्रोण, कृप, अश्वत्थामा, कर्ण, शल्य व इतर अनेक राजे यांचेविरुद्ध तुम्ही कसे जिंकाल असेहि म्हटले. युधिष्ठिराने जबाब दिला की युद्धाशिवाय आमचा हेतु साध्य झाला तर युद्ध कोणाला हवे आहे? पूर्वीचे सर्व विसरून मी सलोखा करीन पण इंद्रप्रस्थात माझे राज्य असूदे हस्तिनापुरात दुर्योधनाचे! यावर बोलताना संजयाचा पर्यायाने धृतराष्ट्राच्या मनातील खरा हेतु बाहेर पडला. संजय युधिष्ठिराला म्हणाला की युद्धाशिवाय जर दुर्योधन तुला राज्य देत नसेल तर तुम्ही वृष्णींच्या वा विराटाच्या राज्यात भीक मागून रहा पण राज्यासाठी युद्ध करू नका! जर तुम्ही राज्यासाठी ज्ञातिवधाला तयार होणार असाल तर दुर्योधनाने तुम्हाला वनात पाठवले हा धर्मच झाला म्हटले पाहिजे! तुम्हाला युद्धच पाहिजे होते तर द्यूत झाले तेव्हाच करणे योग्य होते. आता युद्ध केलेत तर भीष्मासह सर्वांच्या वधाचे पातक लागेल म्हणून युद्ध करू नको! युद्ध झाले तर त्याचा सर्व दोष पांडवाच्या माथी मारण्याचा धृतराष्ट्राचा कुटिल डाव स्पष्ट झाला!
युधिष्ठिराने व कृष्णानेहि जबाबात स्पष्ट सांगितले की राज्य देत असाल तरच युद्ध टळेल. अखेर कृष्णाने सामोपचाराचा अखेरचा प्रयत्न म्हणून स्वत: कौरवांकडे शिष्टाईसाठी जाण्याची तयारी दर्शवली. युधिष्टिराने संजयाला निरोप दिला, सर्वांचे कुशल पुन्हा विचारले व खुद्द दुर्योधनाला अखेरचा निरोप दिला की पांडव युद्धालाहि तयार आहेत व शांतीलाहि. व शांती रहावी यासाठी राज्याचा एक तुकडा, फक्त पांच गावे, आम्हाला दे व येथेच युद्धाचा शेवट होऊदे! मात्र तू जाणतोसच की मी शांतीला तयार असलो तरी युद्धालाहि समर्थ आहें! युधिष्ठिराचा सर्व सद्भाव, वडिलांचा मान राखण्याची वृत्ति त्याचबरोअर ठाम निश्चय हीं या निरोपातून स्पष्ट दिसून येतात. पांच गावांवर समाधान मानण्य़ाची तयारी दाखवून धृतराष्ट्राचा कुटिल डाव त्याने बरोबर उलटवला व युद्ध झाले तर कौरवच जबाबदार राहतील हे स्पष्ट केले. संजय परत गेल्यावर काय झाले ते पुढील भागात वाचा.

Thursday, July 17, 2008

कृष्णशिष्टाई -भाग २

दृपदाचा पुरोहित कौरवांकडे गेला न गेला तोंच सैन्य जमा करण्याचा उद्योग दोन्ही पक्षांकडे सुरू झाला. आमच्याकडे शेवटी या असे कृष्णाने स्पष्ट सांगितले असूनहि, सुरवातीलाच, अर्जुन व दुर्योधन दोघेही एकाच वेळी कृष्णाकडे गेले असे महाभारत म्हणते. कृष्ण स्वत: दुर्योधनाला मिळणे शक्यच नव्हते. मात्र बलरामाशी वितुष्ट टाळण्यासाठी काहीतरी तडजोड करणे भागच होते. त्यामुळे साहजिकच, सैन्यची मदत दुर्योधनाला व स्वत: फक्त नि:शस्त्र सहायक म्हणून अर्जुनाकडे, अशी वाटणी अनिवार्य होती. प्रचंड सैन्य स्वत:ला मिळाले व कृष्ण स्वत: युद्धात उतरणार नाही असा दिलासा मिळाला म्हणून दुर्योधन खूष झाला. अर्जुनाला कृष्णाच्या सारथ्याची व सल्ल्याची किंमत ठाऊक होती. त्याला हवे ते मिळाले. कृष्णाच्या निर्णयाचा मुख्य फायदा म्हणजे बलरामाने युद्धापासून पूर्णपणे दूर राहाण्याचे ठरवले. कृष्ण-बलराम वितुष्ट टळले. इतर अनेक यादववीरहि स्वस्थ बसले. सात्यकी व कृतवर्मा यानी आपल्या आवडीप्रमाणे पांडव व कौरवांचा पक्ष एकेक अक्षौहिणी सैन्यासह घेतला. अर्जुन व दुर्योधन एकाच वेळी कृष्णाकडे आले तेव्हा तो झोपला होता, दुर्योधन डोक्याशी व अर्जुन पायांशी बसला वगैरे प्रसंग मात्र अगदीच हरदासी आहे! जे निर्णय कृष्णाने घेतले ते अनिवार्यच होते!
इतर कित्येक राजे आपापल्या विचारांप्रमाणे एकेका पक्षाला मिळाले. त्यांत नकुलसहदेवांचा मामा शल्य कौरवपक्षाला मिळाला हे एक नवलच. त्याचा खुलासा अज्ञातवासावरील माझ्या लेखात केला आहे. पांडवानी त्याचे सहाय्य गृहीत धरले असावे. त्याला आपल्या बाजूला वळवण्यात दुर्योधनाचा मुत्सद्दीपणा दिसून आला. कौरव सैन्याचा सेनापति भीष्म होणार हे उघड होते. त्याखालोखाल द्रोण, कर्ण, कृप, अश्वत्थामा होते. या सार्‍यांना डावलून शल्य कौरवांचा सेनापति होणे शक्यच नव्हते. तरीहि दुर्योधनाने शल्याला तूं सेनापति हो अशी विनंति केली. भीष्म-द्रोण युद्धविन्मुख राहिले तर? अशी कदाचित त्याला शंका असावी! या सन्मानाचा शल्याला मोह पडला असे दिसते.
द्रुपदाचा पुरोहित कौरवदरबारात पोचला. त्याने मुद्दे मांडले कीं धृतराष्ट्राने मुळात कौरवांच्या राज्याचा हिस्सा पांडवाना दिलाच नव्हता! इंद्रप्रस्थाचे नवे राज्य पांडवानी स्वपराक्रमाने मिळवले. द्यूतामुळे ते कौरवांच्या ताब्यात गेले. आता पांडवानी द्यूताची अट पुरी केली आहे तेव्हा ते त्याना परत मिळाले पाहिजे. त्यानी मोठे सैन्य जमा केले आहे व ते स्वत:ही फार प्रबळ आहेत तेव्हा युद्ध झालेच तर त्यांचा विजय ठरलेलाच आहे! तेव्हा आपल्या वचनाप्रमाणे विनाविलंब त्यांचे राज्य त्याना परत द्या!
उत्तरादाखल भीष्म काही बोलत असतानाच त्याला अडवून कर्णाने मुख्य मुद्दा मांडला की अज्ञातवास पुरा होण्यापूर्वीच पांडव ओळखले गेले तेव्हा राज्य मागण्यापूर्वी त्यानी पुन्हा बारा वर्षे वनवास भोगावा. पांडवांच्या युद्धाच्या धमकीला आम्ही मुळीच घाबरत नाही. भीष्माला कर्णाच्या आगाऊपणाचा राग आलेला पाहून, धृतराष्ट्राने त्याला चुचकारून, दूताला सांगितले की आम्ही तुझ्या म्हणण्याचा विचार करून मग संजयाला युधिष्ठिराकडे आमचा दूत म्हणून पाठवतो. हा निरोप घेऊन द्रुपदाचा पुरोहित परत गेला. द्रुपदाच्या अपेक्षेप्रमाणे कौरवपक्षात फूट पडू लागली! संजयाला धृतराष्ट्राने काय पढवून पाठवले हे पुढील भागात पहा.

Monday, July 14, 2008

कृष्णशिष्टाई - भाग १

महाभारताच्या मुख्य कथेशी बहुसंख्य भारतीय परिचित असतात. पांडव व कौरवांमध्ये द्यूत व अनुद्यूत होऊन पांडव दोन्हीत हरले व आपले राज्य कौरवांच्या हवाली करून त्याना बारा वर्षे वनवास अ एक वर्ष अज्ञातवास सोसावा लागला. त्यानंतर कौरवानी त्यांचे राज्य परत देण्याचे नाकारले त्यामुळे अखेर दोन्हीमध्ये भीषण युद्ध झाले व कुळाचा संहार झाला. हे युद्ध टाळण्यासाठी पांडव अज्ञातवासातून प्रगट झाल्यापासून पुढील काही महिने समेटाचे अनेक प्रयत्न झाले. कृष्णाने कौरव दरबारात पांडवांचे बाजूने शिष्टाई केली ती त्यातील अखेरची घटना. त्या प्रयत्नांची ही कथा आहे.
अर्जुन गायी लुटण्यासाठी आलेल्या कौरवांच्या प्रतिकारासाठी युद्धाला उभा राहिला व ओळखला गेला तेव्हाच अज्ञातवास संपला. पांडव त्यानंतर तीन दिवसानी विराटासमोर स्वरूपात उभे राहिले. विराटाने आपली कन्या अर्जुनाला देऊ केली पण अर्जुनाने तिचा सून म्हणून स्वीकार केला. अर्थातच ती अभिमन्यूलाच वयाने जुळणारी होती. त्या विवाहाच्या निमित्ताने पांडवपक्षाचे अभिमानी व समर्थक असे सारे यादव व पांचाल वीर एकत्र जमले होते. विवाह आटोपल्यावर आता पांडवाना त्यांचे राज्य कसे परत मिळवून द्यावयाचे याचा विचार सुरू झाला. त्यानिमित्ताने झालेल्या चर्चा, विचारविनिमय, दूतांची देवेघेव, राजकारणाचे डावपेच यात काही महिन्यांचा काळ गेला. तो दोन्ही पक्षानी सैन्याची जमवाजमव व इतरांचे सहाय्य मिळवण्यासाठी वापरला. या दीर्घ राजकीय घडामोडींमध्ये बुद्धिकौशल्य, डावपेच, राजकारण याचे अनेक चित्तवेधक नमुने पहावयास मिळतात. यांचा आता तपशीलवार परामर्ष घ्यावयाचा आहे.
विराटाच्या दरबारातील चर्चेने या घडामोडीना सुरवात झाली. पांडवांचे वतीने प्रथम भाषण करून कृष्णाने त्यानी भोगलेल्या हाल अपेष्टांचे वर्णन केले व त्यानी स्वपराक्रमाने कौरवांच्या राज्यात जी इंद्रप्रस्थाची भर घातली ते राज्य परत मिळवण्यासाठी एखादा धर्मशील, कुलीन, दक्ष असा दूत कौरवांकडे पाठवावा असा प्रस्ताव मांडला. यावेळी कृष्णाने असा स्पष्ट दावा केला कीं पांडवानी वनवास व अज्ञातवासाची अट पुरी केली आहे. यावर, प्रचलित चांद्रवर्ष गणनेप्रमाणे तेरावे वर्ष पांडवानी पुरे केलेले नाही असे कोणी म्हटले नाही. बलरामाने मात्र दूत पाठवण्यास अनुमोदन दिले पण कौरवानी अन्याय केल्याचा आरोप धुडकावून लावला. द्यूताचे वेळी पांडवाच्या झालेल्या अपमानाना त्याने युधिष्ठिरालाच जबाबदार धरले कारण शकुनीसारख्या कुटिल द्यूतप्रवीणाशी तो स्वत:हून बेफामपणे द्यूत खेळला होता. यादववीर व अर्जुनाचा मित्र व शिष्य असलेल्या सात्यकीने प्रत्युत्तरात, अज्ञातवास पुरा झाल्याचे कौरवाना मान्य नाही याची दखल घेतली व अखेर युद्ध करावे लागेलच असे म्हटले. द्रुपदाने सात्यकीला अनुमोदन दिले व दुर्योधनाशी मृदु भाषणाचा उपयोग नाही तेव्हा सरळ सैन्य जमवण्यास सुरवात करावी व राजेलोकांकडे दूत पाठवून सहाय्य मागावे असा युद्धबेत सुचवला. मात्र उपचार पाळण्यासाठी स्वत:चा पुरोहित दूत म्हणून पाठवावा असे सुचवले. कृष्णाने दूताला काय कार्य सांगावयाचे ते द्रुपद व विराट यानी ठरवावे, सख्य न झाल्यास मग राजांकडे दूत पाठवावे, आम्हा यादवांचा दोन्ही पक्षांशी नातेसंबंध असल्यामुळे ( बलरामाची कन्या दुर्योधनाची सून होती) आमच्याकडे शेवटी यावे असा उपसंहार केला. आपण व बलराम यांच्यात मतभेद होऊन वितुष्ट येण्याची भीति एव्हाना कृष्णाला स्पष्ट दिसूं लागली होती व ते कृष्णाला टाळणे भाग होते त्यामुळे त्याने सुरवातीला थोडे दूर राहण्याचे ठरवले असे दिसते!
सख्य प्रयत्नातील पहिली पायरी म्हणून द्रुपदाने आपल्या पुरोहिताला कौरवांकडे पाठवले. त्याला त्याचे काम काय हे द्रुपदाने समजाविले. त्याने त्याला स्पष्टच सांगितले की कौरव पांडवांचे राज्य परत देण्याची मुळीच शक्यता नाही. तुझ्या बोलणी करण्यामुळे निदान काही कौरव योदध्यांचे मन आपल्या बाजूला वळवणे, भीष्म, द्रोण, कृप, अश्वत्थामा व दुर्योधन यांच्यात काही मतभेद निर्माण होणे, कौरवांच्या सैन्यसंघटनास बिलंब घडवणे हे तुझ्या जाण्याचे खरे हेतु आहेत! द्रुपदाची राजकीय परिपक्वता यात स्पष्ट दिसते. यापुढील घटना पुढील भागात पाहूंया.

Wednesday, July 9, 2008

देवयानीची कथा - भाग २

देवयानीच्या कथेचा उत्तरार्ध म्हणजे देवयानी, ययाति व शर्मिष्ठा यांची त्रिकोणी प्रेमकथा. ययाति कादम्बरी व ययाति-देवयानी हे नाटक यामुळे ही कथाही मराठी वाचकांना सुपरिचित आहे. देवयानीचा हट्टी, आग्रही व पोरकट स्वभाव या कथेत स्पष्ट दिसतो. शर्मिष्ठेने केलेल्या आपल्या व आपल्या वडिलांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तिला स्वत:ची दासी व्हावयास लावले तरी ती देवयानीची मैत्रीणच राहिली. तिच्यावरचा राग फार टिकला नाही. तिला देवयानीने प्रत्यक्षात दासी म्हणून वागवले नाही. देवयानीचा ययातीशी विवाह झाल्यावर शर्मिष्ठा तिच्याबरोबरच गेली. काही काळाने शर्मिष्ठेने स्वत:च ययातीला वश करून घेतले हे खरे पण असा काही प्रकार होऊ घातला आहे याची देवयानीला कल्पनाच नव्हती. ती बेसावधच होती. शर्मिष्ठेला तीन पुत्र झाले तरी देवयानीला पत्ताच नव्हता! शर्मिष्ठेला पहिला पुत्र झाला तेव्हा ऋषीपासून मला पुत्र झाला असे तिने सांगितले व देवयानीने ते खरे मानले. ती स्वत:च्या सुखोपभोगात दंग होती व निष्काळजी राहिली किंवा तिने कळूनसवरून काणाडोळा केला! शर्मिष्टेचा विवाह होणार नव्हता पण पतिसुखापासून तिला पूर्णपणे वंचित ठेवण्याएवढा तिचा अपराध घोर नव्हता याची जाणीव असल्यामुळे कदाचित दुर्ल्क्ष केले असावे. सत्य सामोरे आल्यावर तिने शुक्राचार्याकडे धाव घेतली पन तक्रार काय केली तर शर्मिष्ठेला तीन पुत्र आणि मला मात्र दोनच! शुक्राचार्याने ययातीला शिक्षा केली पण शर्मिष्ठेला वा तिच्या पुत्रांना शिक्षा केली नाही. ययातीचे शुक्राचार्याच्या शापामुळे आलेले वार्धक्य शर्मिष्ठेच्याच पुत्राने पत्करले व ययातीनंतर तो पुत्र पुरु हाच राजा होऊन त्याचा वंश पौरव या नावावे प्रख्यात झाला. दुष्यंत व भरत हे पौरव वंशाचे. शुक्राचार्याच्या शापामुळे आलेले वार्धक्य पुत्राला घेण्यास सांगताना माझी कामसुखाची आसक्ति अद्याप संपलेली नाही असे म्हणताना ययातीने देवयानीबरोबरच शर्मिष्ठेचाही उल्लेख केला. देवयानी वा शुक्राचार्य यांनी त्याला आक्षेप घेतला नाही हे नवलच. सर्वांनी जणू शर्मिष्ठेचे पत्नीपद मान्यच केले! यापुढील ययातीची कथा एक उत्कृष्ठ बोधकथा आहे व ययाति कादंबरी व महाभारत दोन्हीकडे सारखीच आहे.
शकुंतला व देवयानी यांच्या कथा स्वभावचित्रण, काव्यमयता व तत्वविचार या तिन्ही अंगानी परिपूर्ण व रमणीय आहेत व अनेक साहित्यकृतीना जन्म देण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आहे. कवि वा नाटककार थोडेफार कल्पनास्वातंत्र्य घेणारच. मात्र मूळ महाभारतातील कथाही खूपच वेधक आहेत त्या वेधकतेचा परिचय करून देण्याचा प्रयत्न मी केला आहे.

Tuesday, July 1, 2008

देवयानीची कथा भाग - १

आतां महाभारतांतील दुसरे उपकथानक पाहूया. हे कथानक कच, देवयानी, ययाति व शर्मिष्ठा यांचे आहे. या कथानकाने खाडिलकरांचे विद्याहरण व शिरवाडकरांचे ययाति-देवयानी हीं दोन नाटके व वि. स, खांडेकरांची गाजलेली ययाति कादंबरी या तीन प्रमुख व सुपरिचित साहित्य कृतीना जन्म दिला आहे. या लेखकानी महाभारतातील मूळ कथेमध्ये मोठे फेरफार केलेले दिसून येत नाहीत. या साहित्यकृतींमुळे ही कथा सुपरिचित आहे. त्यामुळे मूळ कथेची तपशीलवार उजळणी न करतां मला जाणवलेल्या काही खास गोष्टींचाच उल्लेख करणार आहे.
देवगुरु बृहस्पति व दैत्यगुरु शुक्राचार्य यांचेतील स्पर्धा कच-देवयानीच्या प्रेमाच्या आड आली असे विद्याहरण नाटकावरून वाटते. ब्रह्नदेवाचे अंगिरस व भृगु हे दोन पुत्र. बृहस्पती हा अंगिरसपुत्र व कवि हा भृगुपुत्र. शुक्राचार्य हा भृगुपुत्र व कच हा बृहस्पतिपुत्र म्हणजे कच व शुक्र हे एकाच कुळातील व नात्याने भाऊ. त्यामुळे, कच व देवयानी यांचे काका-पुतणीचे नाते होते. हे नाते त्यांच्या विवाहाच्या आड आले काय? देवयानीची विवाहाची याचना नाकारताना मात्र कचाने हे कारण सांगितलेले नाही. कचाने देवयानीची अभिलाषा धरू नये असे शुक्राचार्याने कधीच म्हटले नाही. कच व देवयानी समवयस्क होतीं व देवयानीचे प्रेम कचालाही हवे होते. देवांनी कचाला शुक्राचार्याकडे पाठवले तेव्हा त्यांचाहि तोच हेतु होता की कचाला देवयानी व संजीवनी विद्या दोन्ही मिळवतां येतील! देवयानीचे कचावर खरेखुरे प्रेम होते. त्यापोटी पित्याला गळ घालून तिने कचाला वारंवार जिवंत करविले. अखेर दैत्यांच्या अविचारामुळे कचाची राख शुक्राचार्याच्या पोटात गेल्यामुळे त्याला जिवंत केले तर शुक्र मरणार असा पेच पडल्यावरहि तिने अगतिकपणे, मला तुम्हीहि हवेत व कचहि हवा असा हट्ट धरला. नाइलाजाने, इच्छेविरुद्ध, शुक्राचार्याला कचाला संजीवनी विद्या द्यावी लागली. जिवंत झालेल्या कचाने शुक्राचार्याला जिवंत केले. विद्याहरण नाटकात दाखवल्याप्रमाणे तो लगेचच देवलोकाला गेला नाही तर दीर्घकाळ शुक्रापाशी राहून तपाचरण केले असे महाभारत म्हणते. त्यानंतर तो देवलोकी जाण्यास निघाला तेव्हा देवयानीने, आपल्याला वरावे अशी त्याला विनंति केली ती त्याने नाकारली. तपाचरणाच्या काळात त्याने देवयानीबद्दलचे आकर्षण मनातून काढून टाकले असावे. संसार हा आपला मार्ग नाही व आपण देवयानीला सुखी करू शकणार नाही हे त्याने ओळखले होते. तिचा उतावळा व रागीट स्वभावहि त्याने जाणला असणार. शुक्राचार्याने मला पुनर्जन्म दिल्याने आपले भावाबहिणीचे नाते झाले आहे हे त्याने पुढे केलेले कारण खरे नव्हते. त्यांचे खरे नाते काका-पुतणीचे होते. कचाने नाकारल्यावर रागीट देवयानीने ’संजीवनी विद्या तुझ्या कामास येणार नाही’ असा त्याला शाप दिला. त्यामुळे त्याचे काहीच अडणार नव्हते. आवश्यक तर त्याने ती विद्या देवलोकी इतर कोणाला दिली असती! त्यानेहि तिला उलट शाप दिला की कोणीहि ब्राह्मण तुला वरणार नाही. पुढे ययाति हा क्षत्रिय पतिच तिला लाभला.
कचाची कथा हे एक रूपक असावे असे मला वाटते. गुरु-शुक्र हे ग्रह, कच हा गुरूचा उपग्रह, त्याचे मृत्यु व पुनर्जन्म म्हणजे त्याची ग्रहणे, एक ग्रहण खुद्द शुक्राच्या मागे (शुक्राच्या उदरात) गेल्यामुळे झालेले, तो शुक्राच्या पाठीमागून बाहेर पडताना प्रथम शुक्र तेजोहीन (मृत) व नंतर पुन्हा तेजस्वी (जिवंत) होणे असा काही खगोलशास्त्रीय प्रकार या कथेमध्ये रूपक रूपाने सांगितलेला असावा अशी माझी कल्पना आहे. याला आधार काहीहि नाही! गुरु,शुक्र हे ग्रह आहेत, देवयानी, शर्मिष्ठा, ययाति,वृषपर्वा हे सर्व तारे-तारका आहेत. कचाचा तारा नाही. यावरून दुसरा तर्क म्हणजे कच हा गुरूचा उपग्रह नसून एखादा धूमकेतू असावा! तो प्रथम गुरूजवळ (म्हणून गुरुपुत्र), मग शुक्राजवळ, दिसणे, नंतर शुक्रामागे जाऊन न दिसणे, मग पुन्हा दिसू लागणे व दीर्घकाळ शुक्राच्या जवळपास दिसून मग दिसेनासा होणे असा काही घटनाक्रम या कथेने सुचवला आहे काय अशी कल्पना मला सुचते! याहि कल्पनेला आधार नाहीच!
देवयानीच्या कथेचा उत्तरार्ध पुढील भागात पाहू.