आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Thursday, October 28, 2010

महाभारतातील भीष्मचित्रण - भाग २

देवव्रत (भीष्माचे खरे नाव)तरुण झाला, पित्याने त्याला यौवराज्याभिषेकहि केला अन मग, चार वर्षे गेल्यावर, उतारवयाच्या पित्याची सत्यवतीशीं विवाह करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी, त्याने सर्वस्वाचाच त्याग केला. आपण विवाह व संसाराच्या बंधनात अडकून पडावयाचे नाही असे त्याचे आधीच ठरले असावे अशी मला शंका येते कारण त्याच्या विवाहाचा विचारहि शांतनूने अद्याप केला नव्हता. त्याच्या या विचारांची शांतनूला बहुधा कल्पना आली असावी आणि त्यामुळे याचेकडून आपला वंश चालू राहण्याची त्याला उमेद राहिली नसावी. सत्यवतीशीं उतार वय असूनहि विवाह करावा असें आपल्याला कां वाटते याचे त्याने पुत्राशी केलेले स्पष्टीकरण वाचले म्हणजे ही शंका बळावते. सर्वच क्षत्रिय राजांना शिकारीचा नाद असताना ’तुला शिकारीचा फार नाद आहे आणि तूं नेहमीं शस्त्र घेऊन फिरत असतोस त्यामुळे तुझ्या जीवनाची शाश्वति नाही’ असे तो देवव्रताला म्हणतो हे नवलाचे नव्हे काय? आपल्याकडून वंश टिकण्याची पित्याला उमेद नाही तेव्हां त्याला पुन्हा विवाह करून वंशवृद्धि करावयाची आहे तर ते होऊ द्यावे, आपण त्याआड येऊ नये उलट सत्यवतीला व तिच्या पित्याला हवे असलेले आश्वासन द्यावे असे देवव्रताला वाटले काय? महाभारतात वर्णन केलेल्या घटनांचे असेहि एक स्पष्टीकरण असूं शकतें! मला तें जास्त नैसर्गिक वाटते.
सत्यवती ही उपरिचर या क्षत्रिय राजाची धीवर स्त्रीपासून झालेली कन्या होती. (महाभारतातील वर्णन, उपरिचराच्या वीर्यापासून एका मत्स्यीला झालेली कन्या, असें आहे तें अर्थातच रूपकात्मक आहे.) मात्र राजकुळात न वाढता ती धीवर कुळात वाढली होती. ऋषि पराशराने तिची अभिलाषा धरून तिच्या पदरांत एक पुत्र टाकून मग तिला सोडून तपश्चर्येचा मार्ग धरला होता. पुत्र व्यास याला सत्यवतीने धीवरकुळांतच वाढवले. व्यास ’मोठा झाल्यावर’ मातेची अनुज्ञा घेऊन आपल्या मार्गाने गेला असा उल्लेख आहे. शांतनू सत्यवतीच्या प्रेमात पडला तोवर तीहि लहान राहिलेली नव्हती असे त्यामुळे म्हणावे लागते. तिचा विवाह कोणातरी थोर क्षत्रियाशींच व्हावा असा तिच्या धीवर पालक पित्याचा हेतु होता. म्हणून त्याने एका थोर ऋषीला नकारहि दिला होता. राजा उपरिचर व सत्यवतीचा धीवर पालक यांची भेट होत असे असें महाभारत म्हणतें व शांतनूशीं सत्यवतीचा विवाह व्हावा अशी उपरिचराचीहि इच्छा होती. प्रष्न फक्त तिच्या पुत्राला राज्य कसें मिळणार हा होता! तो देवव्रताने पूर्णपणे सोडवला व भीष्म ही पदवी वा नाम मिळवले. धीवराला हवे असलेले, राज्यावर हक्क न सांगण्याचे आणि स्वत: ब्रह्मचर्यहि पाळण्याचे आश्वासनहि भीष्माने दिले व अखेरपर्यंत पाळले. जन्मभर कुरुकुळातच राहण्याचे व कुळाचे हित जपण्याचे वचन काही सत्यवतीच्या पित्याने मागितलेले नव्हते व भीष्माने दिलेले नव्हते. मात्र तो हस्तिनापुर सोडून कोठेच गेला नाही. स्वत: संसारात न पडूनहि सर्व सांसारिक सुखे व अनेक दु:खेहि त्याला भोगावी लागलीच!

Monday, October 25, 2010

महाभारतातील भीष्मचित्रण - भाग १

आज नव्या विषयाला आरंभ करीत आहे.
महाभारतात आरंभापासून अखेरपर्यंत वावरलेले एक प्रमुख पात्र म्हणजे भीष्म. आपल्या मनात भीष्माबद्दल फार आदरभाव असतो. तो अयोग्य वा अकारण आहे असे मुळीच म्हणतां येणार नाही. मात्र सर्व कथेमध्ये ज्या ज्या प्रसंगांत त्याची उपस्थिति आहे त्या अनेक प्रसंगांतील त्याचे वर्तन काही वेळा अनाकलनीय वाटते, त्याची संगति लागत नाही. अर्थात कल्पनारम्य वर्णने वा अद्भुतरस बाजूला ठेवून या विविध प्रसंगांकडे मानवी पातळीवरून पाहिले म्हणजे काही प्रष्नचिन्हे उभी रहातात. या दृष्टिकोनातून भीष्मकथेचा विस्ताराने आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे.
भीष्माची जन्मकथा महाभारतात खूप विस्ताराने सांगितलेली आहे. ती शब्दश: घेतली तर काही प्रश्न नाही पण अद्भुतरस बाजूला ठेवला व तर्क वापरावयाचे म्हटले म्हणजे काही प्रश्न पडतातच. भीष्माचा पिता शांतनु, प्रतीप या त्याच्या पित्यानंतर राजा झाला. त्याचा जन्म त्याचा पिता प्रतीप खूप वृद्ध झाल्यावर झाला होता. प्रतीपाला देवापि व बाल्हीक असे दुसरे दोन पुत्र होते असेहि म्हटलेले आहे. देवापि राज्याचा लोभ सोडून तपश्चर्येला गेला होता. बाल्हीक व शांतनु दोघेहि राजे झाले असेहि एके ठिकाणी म्हटले आहे. मात्र बाल्हीक हस्तिनापुराचा राजा झाला नाही. त्याचे राज्य कोठे होते हे स्पष्ट नाहीं. बाल्हीक या नावाचा महाभारतात अनेक ठिकाणी, अनेक प्रसंगी उल्लेख आहे. कुरूंच्या दरबारात त्याचे अस्तित्व वेळोवेळी जाणवते ते थेट भारतीय युद्धापर्यंत. खुद्द भीष्मच युद्धापर्यंत खूप वृद्ध झाला होता मग त्याचा काका युद्धात होता? बहुधा त्याच्या वंशातील सर्वच पुरुषांचा ’बाल्हीक’ असाच उल्लेख होत असावा. (बाल्हीक म्हणजे अफगाणिस्तानातील ’बल्ख’ शहर असे एक मत वाचलेले आहे.)
शांतनूने राजा झाल्यावर छत्तीस वर्षे स्त्रीसुखाचा अनुभव घेतला पण त्याला तेव्हां अपत्य झाल्याचा उल्लेख नाही. त्याची पत्नी मृत झाली असे मात्र म्हटलेले नाही. त्यानंतर गंगा ही नदी मानव शांतनूची पत्नी झाली. ती ’नदी’ हे शब्दश: घेतले नाही तर ती गंगाकिनारच्या एखाद्या कुळातील मानव स्त्री मानावी लागते. गंगेने स्वत:चे व शांतनूचे सात पुत्र जन्मत:च मारून टाकले. कां? तिचे कुळ मातृसत्ताक असल्याने अपत्य पुरुष असेल तर नष्ट करणे हा तिच्या कुळाचा रिवाज होता कीं काय? श्री. विश्वास दांडेकर यांनी ’धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे’ मध्ये असाच तर्क केला आहे व मला तो सयुक्तिक वाटतो. तिने शांतनूला वरताना अटच घातली होती कीं ’मी करीन त्या कोणत्याही कृत्याला विरोध करावयाचा नाही, तसे केल्यास मी तुला सोडून जाईन’ त्यामागे हेच कारण असावे. गंगेला, राजा महाभिषाला (शांतनु हा त्याचा अवतार) व अष्टवसूंना स्वर्गांत मिळालेल्या शापांची कथा हे एक रूपकच आहे. ही कथा या अपत्यनाशांचे (लंगडे) समर्थन करण्यासाठी उघडच रचलेली दिसते. पूर्वीचे अपत्य नसूनहि सात पुत्रांचा मृत्यु शांतनूने सहन केला हे नवलच. आठव्या पुत्राच्या जन्माच्या वेळी मात्र, गंगा आपल्याला सोडून जाईल याची पर्वा न करतां, शांतनूने तिला ’एक पुत्र तरी राहूंदे’ असे विनवले म्हणून गंगेने त्याला न मारतां आपल्याबरोबर नेले पण ती शांतनूला सोडून गेलीच. कुमार वयाचा झाल्यावर तिने हा पुत्र देवव्रत पुन्हा शांतनूच्या स्वाधीन केला. त्याने वेदाभ्यास केला आहे व तो ज्ञानी आणि शूर आहे असे गंगा म्हणाली. मात्र परशुरामापाशी त्याने धनुर्विद्या शिकल्याचा येथे उल्लेख नाही. पण तो परशुरामशिष्य म्हणून मानला जातो. मग तो केव्हां परशुरामापाशी शिकला याचा उलगडा होत नाहीं. शांतनूकडे आल्यावर शिकला असावा. गंगेच्या मातृसत्ताक कुटुंबियांत तो वाढला याचा त्याच्या मनोवृत्तीवर काही परिणाम झाला काय? त्याने आमरण ब्रह्मचर्य पत्करले त्या मागे त्याच्या बालवयातील काही संस्कार कारण होते काय? प्रत्यक्ष मातेने केलेले पुत्रघात त्याला कळले असणारच शिवाय आईच्या जनसमुदायांत असे इतरहि प्रसंग घडले असतील ते पाहून आपल्याला गृहस्थाश्रम नकोच अशी त्याची मनोभूमिका झाली होती कीं काय अशी शंका येते.

Monday, October 11, 2010

नलदमयंतीकथा भाग ११

तिने आपल्या दासींना सांगितले कीं बाहुकाला पाणी वा विस्तव देऊं नका व तो स्वत:साठी अन्न कसे शिजवतो तें नीट पाहून मला सांगा. त्याने मांस शिजवले तर जमल्यास त्याचा नमुना माझ्यासाठी आणा. नलराजाला अग्नि व वरुण यांनी वर दिलेले असल्यामुळे जर बाहुक हाच नल असेल तर त्याचे पाणी वा अग्नि यावांचून अडणार नाहीं तसेंच नल पाकक्रियेत खास प्रवीण असल्यामुळे बाहुकाने मांस शिजवले तर त्याला नलाच्या हातची चव असेल अशा तिच्या अपेक्षा होत्या. त्याप्रमाणेच झाले. दासींनी येऊन सांगितले कीं त्याच्या चुलीत अग्नि आपोआप प्रगट झाला व कलशामध्ये जळहि आपोआप भरले! याचा तारतम्याने इतकाच अर्थ घ्यावयाचा कीं स्वयंपाकघरांतील सर्व क्रियांमध्ये नल प्रवीण होता व ही गोष्ट सर्वसामान्य पुरुषांना (त्याकाळींहि) सहजसाध्य नसल्याने बाहुकाचे नलाशीं साम्य दिसून आले. अजूनहि खात्री करण्य़ासाठी दमयंतीने आपल्या दोन्ही लहान मुलांना बाहुकाकडे पाठवलें व दासींना लक्ष ठेवण्यास सांगितले. मुलें दृष्टीस पडल्यावर बाहुकाला म्हणजे नलाला मन आवरतां आलें नाहीं व तो त्यांना कवटाळून रडूं लागला. हे ऐकून दमयंतीची जवळपास खात्री झाली पण रूप मुळीच जुळत नव्हते. नलाचे वेषांतर उत्तम जमले होते. अखेर दमयंतीने आईला विश्वासात घेऊन म्हटले कीं बाहुक हाच नल असला पाहिजे तेव्हां खात्री करण्यासाठी मला त्याची एकांतात भेट घेऊंदे. पित्याला काही न सांगतां आपल्या जबाबदारीवर तिने हे धाडस केले. प्रत्यक्ष भेटीत दमयंतीने स्पष्टच विचारल्यावर नलाचा नाइलाज झाला व त्याने मीच नल असें मान्य केलें. ’वनात तुला एकटीला टाकून गेलो कारण नाहींतर तूं मला सोडून माहेरीं गेली नसतीस व तूं हरप्रयत्नाने माहेरीं पोंचशीलच असा मला भरवसा होता’ असा खुलासा केला. मग वेषांतर टाकून स्वरूप धारण केले. ’तूं पुन्हा स्वयंवर करणार आहेस हे ऐकून मला काही सुचेना’ असे नल म्हणाला तेव्हां अर्थातच दमयंतीने खुलासा केला कीं ’हा सर्व, पित्यालाही न कळवतां, माझाच बेत होता आणि त्याचा हेतु फक्त एकच होता कीं तुम्हीच बाहुकरूपाने ऋतुपर्णापाशीं असाल तर फक्त तुम्हीच एक दिवसात येथे येऊन पोंचाल दुसर्‍या कोणासही हे शक्य होणार नाही हें मी खात्रीने जाणत होतें’ पतिपत्नींतील परस्पर विश्वासाचे हे एक उत्तम उदाहरण म्हटले पाहिजे.
नलाने व दमयंतीने एकेकट्याने सोसलेल्या संकटांची हकीगत एकमेकांना सर्व सांगितली. दुसर्‍या दिवशीं नलदमयंतीने वडील माणसांस व ऋतुपर्णासहि सर्व हकिगत सांगितली. स्वयंवराबाबत फसवणूक झाल्याबद्दल बिलकुल राग न धरतां ऋतुपर्णाने दोघांचे अभिनंदन केले व ’नला मी तुला न ओळखून नोकराप्रमाणे वागवले याचे वाईट वाटते’ असे म्हटले. नलाकडून रथसंचालनात प्रावीण्य मिळवून ऋतुपर्ण परत गेला. दमयंतीच्या पित्यानेहि कन्या व जावई पुन्हा एकत्र आल्याबद्दल आनंद व्यक्त केला व नलाचा आदरसत्कार केला.
यथावकाश, द्यूतविद्येत नव्याने प्रावीण्य मिळवलेल्या नलाने आपल्या राजधानीला परत जाऊन पुष्कराला आव्हान दिले व द्यूतामध्ये विजय मिळवून सर्व गतवैभव जिंकून घेतले. मात्र पुष्कराला शासन न करतां क्षमा करुन राज्याबाहेर घालवले.
येथे नलदमयंती कथा संपली. संकटपरंपरा कोसळली तरी कुलीन व गुणवंत व्यक्ति धैर्य न सोडतां योग्य कालाची वाट पाहून दीर्घ प्रयत्नाने पुन्हा गतवैभव प्राप्त करून घेऊं शकतात हा मथितार्थ युधिष्ठिराला पटवण्यासाठी बृहदश्वाने ही कथा त्याला सांगितली. त्या पासून योग्य तो बोधहि युधिष्ठिराने घेतला असे म्हणतां येईल.

Monday, October 4, 2010

नलदमयंतीकथा भाग १०

प्रवासामध्ये ऋतुपर्णाच्या आणखी एका विषयांतील प्रावीण्याचे प्रदर्शन झाले. तो गणनशास्त्रातहि प्रवीण होता. रथ भरवेगाने चालला असतां ऋतुपर्णाचे एक उपवस्त्र वार्‍याने उडाले तेव्हां तो बाहुकाला रथ थांबव असें म्हणाला. बाहुकाने म्हटलें कीं रथाच्या वेगामुळे ते आता फार मागे पडले आहे व पुन्हा मागे वळून जाण्यात फार वेळ जाईल. ऋतुपर्णाला गप्प बसणे भाग झाले. मग पुढे एक भलामोठा वृक्ष दिसल्यावर ऋतुपर्णाने ’या वृक्षावर अमुक इतकीं पानें आहेत’ असें म्हटलें. विश्वास न बसून, नलाने म्हणजे बाहुकाने रथ थांबवला व ’मी पानें मोजून पाहणार’ असें म्हणाला. ’यांत वेळ घालवला तर पोंचणार कसें’ असें ऋतुपर्णाने म्हटल्यावर एका फांदीची पाने मोजून पहावी असे ठरले. तीं ऋतुपर्णाच्या अंदाजाप्रमाणे बरोबर निघालीं! नल चाट झाला. हे वर्णन मजेशीर आहे. ही Sampling ची विद्या असावी, म्हणजे एका फांदीच्या पानांचा काळजीपूर्वक अंदाज घेऊन व एकूण वृक्षाचा विस्तार विचारात घेऊन सर्व पानांचा अंदाज घेणे असा कांहीतरी प्रकार असावा. एकमेकांना एकमेकांच्या विद्या देऊन रथ दमयंतीच्या गावी संध्याकाळपर्यंत पोंचला. तेथे स्वयंवर असल्याचा काही मागमूस दिसत नव्हता त्यामुळे ऋतुपर्ण चक्रावून गेला. दमयंतीव्या पित्याशी भेट झाल्यावर त्यालाही कळेना कीं राजा ऋतुपर्ण अचानक कशासाठीं आला आहे! त्याने ऋतुपर्णाला विचारल्यावर काय उत्तर द्यावे हा त्यालाही पेच पडला. ’मी निव्वळ आपणाला भेटण्यासाठी आलो आहे’ असे उत्तर देऊन त्याने वेळ मारून नेली. काय प्रकार आहे तें कळेलच असा विचार करून दमयंतीच्या पित्याने त्याला ’आज तुमचा प्रवास फार झाला आहे तेव्हां आराम करा, मग उद्यां बोलूं’ असे म्हटले. राजाची सोय लागली व वार्ष्णेय-बाहुक या जोडीचीहि रथशालेत व्यवस्था लागली.
अपेक्षेप्रमाणे ऋतुपर्ण तातडीने येऊन पोंचला त्यामुळे दमयंतीची आशा बळावली. वार्ष्णेय तिला माहीतच होता पण बाहुक हाच नलराजा काय याची शहानिशा करणे आवश्यक होते. त्याचे बाह्यरूप तर नलासारखे मुळीच नव्हते. दमयंतीने त्यासाठी अनेक युक्त्या केल्या.