आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Wednesday, January 23, 2013

द्रोणाचार्याचे वय.

द्रोणाचार्याचा उल्लेख नेहेमी भीष्माचे जोडीने, भीष्म-द्रोण असा होत असल्यामुळे ते वयाने वरोबरीचे असावे असा चटकन समज होतो. मात्र तसे नव्हते. भीष्म हे कौरवपांडवांचे नात्याने आजोबा, पण प्रत्यक्षात पणजोबा शोभतील एवढे मोठे होते. कारण सत्यवतीने शंतनूशी विवाह केला तेव्हा देवव्रत, म्हणजे भीष्म, स्वतःच तरुण वयाचा होता. त्यामुळे कोरवपांडवांचा आजोबा, विचित्रवीर्य हा भीष्माचा, नात्याने भाऊ खरा,पण वयाने मुलगा शोभला असता. द्रोणाचार्य हे कौरवपांडवांचे गुरु. त्यांचा पुत्र अश्वत्थामा हा कोरवपांडवांच्याच वयाचा होता व त्यांच्याबरोबरच पित्यापाशी धनुर्वेद शिकला. तेव्हां द्रोणाचार्य हे कौरवपांडवांचे वडील शोभतील अशाच वयाचे होते. धृतराष्ट्र, विदुर, द्रोण, कृप (अश्वत्थाम्याचा मामा) व द्रुपद – हा तर द्रोणाचा सहाध्यायी - हे साधारण एकाच वयाचे म्हणतां येतील. त्यामुळे भीष्म या सर्वांच्या दोन पिढ्या आधीचा व म्हणून त्यांचेपेक्षा ४५-५० वर्षानी मोठा असला पाहिजे. भारतीय युद्धाचे वेळी दुर्योधन, दुःशासन, युधिष्ठिर, भीम, अर्जुन, कृष्ण, अश्वत्थामा हे साधारण ५० ते ५५ वयाचे, कर्ण त्यांचेपेक्षा ७-८ वर्षांनी मोठा, द्रोण, द्रुपद कृप हे ७० ते ८० वयाचे तर भीष्म १२५ वर्षांचा असावा असा तर्क करतां येतो. भीष्म-द्रोण असा जोडीने उल्लेख नेहेमी होत असल्यामुळे ते समकालीन असल्याचा उगीचच गैरसमज होतो. पण ते खरे नाही!

Wednesday, January 16, 2013

सुईच्या अग्रावर - आणखी एक गैरसमजूत - छोटीसी!

पांडवानी अज्ञातवास संपल्यावर आपल्या राज्याची मागणी केली ती दुर्योधनाने धुडकावून लावली. मग दूतांची देवघेव, आरोप प्रत्यारोप होऊन तोडगा निघेना तेव्हा खुद्द कृष्ण पांडवांतर्फे कौरव दरबारात आला व त्याने पांडवांतर्फे राज्याची मागणी केली. अनेकांनी समजावूनहि दुर्योधनाने कृष्णाने केलेले सर्व आरोप नाकारून पांडवानी अज्ञातवास पुरा केलेला नसल्यामुळे राज्य मागण्यापूर्वी त्यानी अटीप्रमाणे पुन्हा बारा वर्षे वनवास भोगावा असे म्हटले. युधिष्ठिराने युद्ध टाळण्यासाठी अखेरचा प्रयत्न म्हणून कृष्णाबरोबर कमीतकमी पांच गावे तरी द्यावी असा निरोप पाठवला होता. ती मागणीहि दुर्योधनाने नाकारली व त्यावेळी त्याने ‘मी जिवंत आहे तोवर सुईच्या अग्रावर राहील एवढीहि भूमि देणार नाही’ असे म्हटले. हे त्याने प्रथमच स्पष्टपणे म्हटले अशी समजूत असते. मात्र तसे नाही! धृतराष्ट्रातर्फे संजयाला चर्चेच्या पहिल्याच फेरीत पांडवांकडे त्यांच्या मागणीला उत्तर देण्यासाठी पाठवले गेले होते. त्याने धृतराष्ट्राचा शहाजोग निरोप युधिष्ठिराला दिला कीं ‘सामोपचाराने दुर्योधनाने राज्य दिले तर घ्या पण नाही दिले तरी युद्ध करूं नका कारण युद्धामुळे कुलक्षय होईल व त्याला तुम्ही जबाबदार व्हाल!’तो पांडवांकडील एकूण युद्धतयारी पाहून आल्यावर धृतराष्ट्राने त्याचेजवळ सर्व माहिती बारकाईने विचारून घेतली. पांडवानी व त्यांच्या सर्व साथीदारानी संजयातर्फे जोरदार प्रत्युत्तर धाडले होते कीं मुकाट्याने अर्धे राज्य द्या नाहीतर घोर परिणामाना सज्ज व्हा. धृतराष्ट्राची घाबरगुंडी उडून त्याने दुर्योधनाला पुन्हापुन्हा समजावले कीं आपल्याकडील भीष्मद्रोणादि कोणीहि प्रमुख वीर युद्धोत्सुक नाही. तेव्हां शम करणेच बरे. तेव्हां दुर्योधनाने पित्याला दोन गोष्टी स्पष्ट केल्या. एक म्हणजे ‘माझा खरा भरवसा मी स्वतः, दुःशासन व कर्ण या तिघांवरच आहे.’ व दुसरे, ‘काही झाले तरी सुईच्या अग्रावर राहील एवढी भूमिही मी जिवंत असेपर्यंत मी पांडवाना देणार नाही.’ तेव्हा दुर्योधनाची भूमिका प्रथमपासूनच स्पष्ट व ठाम होती आणि कृष्णशिष्टाईचे वेळी त्याने तिचा पुनरुच्चार केला इतकेच. पांडवानी पांच गावांवर समाधान मानण्याचा उपयोग कधीच होणार नव्हता व शिष्टाई विफलच व्हायची होती.

Saturday, January 12, 2013

महाभारताबाबत काही गैरसमजुती - भाग ७ -कर्ण व शल्य

नवीन लिखाणाला सुरवात, जेथे थांबलो होतो तेथूनच करतो आहे. कर्ण-शल्य परस्पर संबंधाबद्दल काही गैरसमज आहे तो तपासून पाहूं. शल्य हा महारथी, मोठ्या मान्यवर घराण्याचा राजा व त्याचा एक वेगळाच लौकिक म्हणजे तो सारथ्यकर्मामध्ये अतिशय कुशल होता व त्याचा त्याला फार अभिमान होता. सारथ्य हे सूतांचे काम पण अनेक क्षत्रिय राजे त्यात तरबेज होते. नलराजा, ऋतुपर्ण, ही नावे पूर्वीच्या काळची पण खुद्द श्रीकृष्ण व अर्जुन हेहि प्रख्यात होते. दुर्योधन जेव्हा शल्याला युद्धापूर्वी भेटला व त्याला आपल्या पक्षाला वळवून घेतले तेव्हा शल्याने त्याला विचारले कीं तुझी काय अपेक्षा आहे. नवल म्हणजे दुर्योधनाने त्याला म्हटले कीं 'तूं माझा सेनापति हो!’ आपल्या पक्षात भीष्म, द्रोण, कर्ण असताना त्याना बाजूला सारून शल्याला तो सेनापति कसा करणार होता? कदाचित भीष्मद्रोण युद्धनिवृत्त तर राहणार नाहीत ना अशी त्याला शंका असावी. तसे झालेच तर सेनापतिपदाचा भार शल्यावर ठेवून कर्णाला अर्जुनाशी टक्कर देण्यासाठी मोकळे ठेवावे असा त्याचा विचार असेल! पांडवानी, धृष्टद्युम्नाला सेनापति केले आणि भीम-सात्यकी-अर्जुनाला मोकळे ठेवले होते. प्रत्यक्षात भीष्म व द्रोण यानी १५ दिवस सेनापतिपद सांभाळले. १६ व्या दिवशी शल्याने सेनापतिपदाचा आग्रह न धरता, उदार मनाने ‘कर्णाला सेनापति कर, तोच आपली ढासळती बाजू सावरू शकेल’ असा सल्ला दुर्योधनाला दिला. कर्णाने एक अवघड पेच दुर्योधनापुढे टाकला. ‘अर्जुनाचे सारथ्य खुद्द कृष्ण करतो आहे, तेवढ्या लायकीचा सारथी मला नसल्यामुले माझी बाजू लंगडी पडते तेव्हा कृष्णाच्या बरोबरीचा सारथी आपल्या पक्षात एकच आहे तो म्हणजे शल्य. त्याला तू गळ घाल!’ खरे तर शल्य हा स्वतः महारथी होता त्याला सारथ्य करावयास सांगण्याने एक महारथी प्रत्यक्ष युद्धातून बाजूला पडणार होता. कौरव पक्षाचे अनेक जण मारले गेल्यामुळे हे योग्य नव्हते. तरीहि कर्णावर विसंबून, दुर्योधनाने शल्याला विनंति केली! शल्याच्या वाट्याला सेनापतिपदाऐवजी सारथ्य आले! तरीहि ‘कर्णा, तूं मला कृष्णाच्या बरोबरीचा सारथ्यकुशल मानतोस हा माझा मोठाच सन्मान आहे’ असे म्हणून त्याने संमति दिली! मात्र मी क्षत्रिय राजा व कर्ण हा अखेर सूतपुत्रच तेव्हां सारथ्य करताना मी काहीहि बोललो तरी कर्णाने ते मुकाट्याने ऐकले पाहिजे एवढीच अट घातली व नाइलाजाने दुर्योधन-कर्णाने ती मानली! १६व्या युद्धदिवशी सारथ्याला सुरवात करताना शल्य-कर्णामध्ये बरीच अश्लाघ्य वादावादी झाली. ती प्रक्षिप्त आहे असेहि मानले जाते. उलट शल्याने कर्णाची उदार मनाने भरपूर स्तुति करून ‘दुर्योधनाचे मनोरथ तूंच पूर्ण करू शकतोस तर तें तूं कर’असे म्हटले. दोन दिवस उत्तम सारथ्य करून कर्णाला अपेक्षित असलेले कौशल्य दाखवले. दुसर्‍या दिवशी सायंकाळी अर्जुन-कर्ण आमनेसामने येऊन जोरदार युद्ध सुरू असताना. कर्णाच्या रथाचे चाक भूमीत रुतले. गैरसमज असा आहे कीं कर्णाने शल्याला म्हटले कीं ‘तूं खालीं उतरून खटपट करून ते सोडव.’ मात्र 'मी मूर्धाभिषिक्त राजा आहे तेव्हां मी हे करणार नाहीं, तूंच खालीं उतर.’ असे शल्याने त्याला झिडकारले. त्यामुळे कर्णाला धनुष्य टाकून खालीं उतरावे लागले. मात्र प्रत्यक्षात, कर्णाने शल्याला असे म्हटल्याचा व शल्याने नाकारल्याचा उल्लेख महाभारतात मुळीच नाही. हा एक गैरसमजच आहे. मात्र कर्ण शल्याला विनवण्याच्या वा नकार ऐकण्याच्या भानगडीत पडलाच नाही. चाक बाहेर काढण्याची खटपट कर्णाला स्वतःच खाली उतरून करावी लागली. कृष्णाने अर्जुनाला स्पष्टपणे म्हटले कीं 'प्रबळ शत्रु अडचणीत आलेला असताना त्याला सवलत देण्याचा अडाणीपणा करूं नको! शहाणे लोक असे करीत नाहीत.' अर्जुनाने ते ऐकले व जमेल तसा प्रतिकार अखेरपर्यंत करतच असलेल्या कर्णाचा वध केला.

Friday, January 11, 2013

पुन्हा सुरवात.

सर्व वाचक मित्राना नम्र अभिवादन करून या ब्लॉगवर पुन्हा काही लिहिण्यास सुरवात करीत आहे. एक वर्ष अमेरिकेत होतो व महाभारत येथे कपाटबंद होते. लिहिण्यासारखे बहुतेक सर्व लिहून झाले होते. त्यामुळे नवीन लिखाण बंद झाले होते. मात्र तरीहि वाचकांच्या ब्लॉगला भेटी होतच आहेत असे दिसून येई. कधीमधी पसंतीच्या इमेलहि मिळत होत्या. काही कॉमेंट्सही लिहिल्या जात होत्या. अमेरिकेतहि हा ब्लॉग वाचणारे अनपेक्षितपणे भेटत. हल्लीच काही थोड्या काळापुरता पुन्हा मुंबईस आलो आहे. कपाटातील महाभारत खुणावत आहे. (त्याला आणखीहि एक कारण झाले आहे. तो एक स्वतंत्र विषय आहे.) तेव्हां या ब्लॉगवर पुन्हा काही नवीन लिहिण्याचा विचार आहे. वाचक पूर्वीप्रमाणेच लाभतील अशी आशा आहे.