आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Thursday, July 17, 2008

कृष्णशिष्टाई -भाग २

दृपदाचा पुरोहित कौरवांकडे गेला न गेला तोंच सैन्य जमा करण्याचा उद्योग दोन्ही पक्षांकडे सुरू झाला. आमच्याकडे शेवटी या असे कृष्णाने स्पष्ट सांगितले असूनहि, सुरवातीलाच, अर्जुन व दुर्योधन दोघेही एकाच वेळी कृष्णाकडे गेले असे महाभारत म्हणते. कृष्ण स्वत: दुर्योधनाला मिळणे शक्यच नव्हते. मात्र बलरामाशी वितुष्ट टाळण्यासाठी काहीतरी तडजोड करणे भागच होते. त्यामुळे साहजिकच, सैन्यची मदत दुर्योधनाला व स्वत: फक्त नि:शस्त्र सहायक म्हणून अर्जुनाकडे, अशी वाटणी अनिवार्य होती. प्रचंड सैन्य स्वत:ला मिळाले व कृष्ण स्वत: युद्धात उतरणार नाही असा दिलासा मिळाला म्हणून दुर्योधन खूष झाला. अर्जुनाला कृष्णाच्या सारथ्याची व सल्ल्याची किंमत ठाऊक होती. त्याला हवे ते मिळाले. कृष्णाच्या निर्णयाचा मुख्य फायदा म्हणजे बलरामाने युद्धापासून पूर्णपणे दूर राहाण्याचे ठरवले. कृष्ण-बलराम वितुष्ट टळले. इतर अनेक यादववीरहि स्वस्थ बसले. सात्यकी व कृतवर्मा यानी आपल्या आवडीप्रमाणे पांडव व कौरवांचा पक्ष एकेक अक्षौहिणी सैन्यासह घेतला. अर्जुन व दुर्योधन एकाच वेळी कृष्णाकडे आले तेव्हा तो झोपला होता, दुर्योधन डोक्याशी व अर्जुन पायांशी बसला वगैरे प्रसंग मात्र अगदीच हरदासी आहे! जे निर्णय कृष्णाने घेतले ते अनिवार्यच होते!
इतर कित्येक राजे आपापल्या विचारांप्रमाणे एकेका पक्षाला मिळाले. त्यांत नकुलसहदेवांचा मामा शल्य कौरवपक्षाला मिळाला हे एक नवलच. त्याचा खुलासा अज्ञातवासावरील माझ्या लेखात केला आहे. पांडवानी त्याचे सहाय्य गृहीत धरले असावे. त्याला आपल्या बाजूला वळवण्यात दुर्योधनाचा मुत्सद्दीपणा दिसून आला. कौरव सैन्याचा सेनापति भीष्म होणार हे उघड होते. त्याखालोखाल द्रोण, कर्ण, कृप, अश्वत्थामा होते. या सार्‍यांना डावलून शल्य कौरवांचा सेनापति होणे शक्यच नव्हते. तरीहि दुर्योधनाने शल्याला तूं सेनापति हो अशी विनंति केली. भीष्म-द्रोण युद्धविन्मुख राहिले तर? अशी कदाचित त्याला शंका असावी! या सन्मानाचा शल्याला मोह पडला असे दिसते.
द्रुपदाचा पुरोहित कौरवदरबारात पोचला. त्याने मुद्दे मांडले कीं धृतराष्ट्राने मुळात कौरवांच्या राज्याचा हिस्सा पांडवाना दिलाच नव्हता! इंद्रप्रस्थाचे नवे राज्य पांडवानी स्वपराक्रमाने मिळवले. द्यूतामुळे ते कौरवांच्या ताब्यात गेले. आता पांडवानी द्यूताची अट पुरी केली आहे तेव्हा ते त्याना परत मिळाले पाहिजे. त्यानी मोठे सैन्य जमा केले आहे व ते स्वत:ही फार प्रबळ आहेत तेव्हा युद्ध झालेच तर त्यांचा विजय ठरलेलाच आहे! तेव्हा आपल्या वचनाप्रमाणे विनाविलंब त्यांचे राज्य त्याना परत द्या!
उत्तरादाखल भीष्म काही बोलत असतानाच त्याला अडवून कर्णाने मुख्य मुद्दा मांडला की अज्ञातवास पुरा होण्यापूर्वीच पांडव ओळखले गेले तेव्हा राज्य मागण्यापूर्वी त्यानी पुन्हा बारा वर्षे वनवास भोगावा. पांडवांच्या युद्धाच्या धमकीला आम्ही मुळीच घाबरत नाही. भीष्माला कर्णाच्या आगाऊपणाचा राग आलेला पाहून, धृतराष्ट्राने त्याला चुचकारून, दूताला सांगितले की आम्ही तुझ्या म्हणण्याचा विचार करून मग संजयाला युधिष्ठिराकडे आमचा दूत म्हणून पाठवतो. हा निरोप घेऊन द्रुपदाचा पुरोहित परत गेला. द्रुपदाच्या अपेक्षेप्रमाणे कौरवपक्षात फूट पडू लागली! संजयाला धृतराष्ट्राने काय पढवून पाठवले हे पुढील भागात पहा.

5 comments:

Yawning Dog said...

Mzaya avchanaat hindi mahabharat ale ahem kuthel prakashan te athvat nahee nakki.
Tyay Shalya Kouravankade ka gela haychyavishayee sawistar mahiti dili ahe -

Shalya jeva kurukshetrakade yet hota teva vatetch tayche anee taychya sainyache bhavya swagat karnyaat ale. Shalyane he sarva Yudhishteerane kele ahe samjoon tyacha sweekar kela...tyanatar Duryodhan ala anee tyane shalyala gal ghatlee ke ata tumhi maze meeth khalee ahe anee kshatriyane khallya metthala jagave. Shalyanae nailajane kouravanchya bajune ladhne sweekarle, parantu tyane Yudheeshtheerachee mafee magaitle teva krushnachya sallyanusaar Yudhishtheerane Shalyakadoon vachan ghetle ke...tyane jaroor Kouravanchy6a bajune pranapanae ladhave, parantoo jeva to kuna kourav maharthyache sarathya karel teva tyane tyachee satat nidna anee uphass karava [shalya swataha navajlela sarathee hota]...tyamulech karna anee arjun yudhaat karna arjunala nishprabh karat asoonahee shalyane karnacha sarkha uphaas anee arjunache koutuk kele.
Ekun kay tar Duryodhanchya chaturyamule Shalya kourvankadoon ladhla tar Krushne tyathee namee sandhee sadhun yudhha nipunta dakhavlee !

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

हे सर्व वर्णन मीहि वाचलेले आहे. पण ते मला पटत नाही. शल्य हा नकुल-सहदेवांचा सख्खा मामा होता. आपल्या भाच्याना दुर्योधनामुळे कोणत्या अपमानाना व अपेष्टाना तोंड द्यावे लागले हे तो जाणत होता. तो पांडवाना मिळण्यासाठीच निघाला होता. वाटेत झालेला सत्कार कौरवांकडून झाल्याचे त्याच्या लक्षात आले नसले म्हणून काही बिघडले नव्हते. तो कोणी सामान्य व्यक्ति नव्हता. राजे लोक एकमेकाना भेटतील तेव्हा सत्कार होणारच त्याचा अर्थ मीठ खाणे असा कोणीहि मानणार नाही. त्याचे बंधन शल्यावर खासच नव्हते. दुर्योधनाने त्याची भेट घेऊन त्याला पटविले की द्यूतात हरलेले सर्व काही माझ्या पित्याने पांडवाना परत दिले, पांडवानी अनुद्यूताचा पण स्वखुशीने मान्य केला व हरले, अज्ञातवास त्यानी पुरा केला असे पांडव व कृष्ण सोडून कोणीहि, भीष्मही, म्हणत नाहीत मग मी त्याना राज्य देत नाही यात माझी काय चूक आहे? हे पटल्यामुळे शल्याचे मन द्विधा झाले व मग कौरवांचा सेनापति होण्याचा त्याला मोह पडला. तसेच कर्ण-अर्जुन युद्धासाठी आपल्याला कर्णाचे सारथ्य करून कृष्णाशी बरोबरी करता येईल याचेहि त्याला आकर्षण वाटले. दुर्योधनाचे चातुर्य अर्थातच यात दिसते (मीठ खाऊं घालण्यात नव्हे!). मात्र शल्य कौरवांकडे गेलाच आहे तर त्याने कर्णाला घालून पाडून बोलावे व त्याचे मनोधैर्य खच्ची करावे हा कृष्णाचा सल्ला कृष्णाबद्दल बरेच काही सांगून जातो! (नुकसानीचे फायद्यात रूपांतर!) मात्र कृष्णाने सुचवले नसते तरीहि शल्य काही वेगळा वागला नसता कारण ’मी क्षत्रिय राजा, तूं सूत असूनही दुर्यॊधनासाठी तुझे सारथ्य करत आहे तेव्हा तू आपली पायरी सोडून बोलू नको’ असे कर्णाचा उद्धटपणा न सोसून त्याला त्याने बजावलेच असते. (कर्णाच्या बढाया कोणालाच आवडत नसत.)

Yawning Dog said...

Parantoo, mazya amte apan eka mahtvachya muddyakade doorlaksha karaeet ahat...Sarvanee amnya kele hote ke APndav dyootat harle pan Pandavancha prativaad asa kee...sarv davach pahilyapasoon chidiche khelale gele aslyanae tya dyootala artha nahee[shakuni mamane, jarsandhachya hadache fase vaparoon kelele kapat] - Tase asoonahee pandavanee vanvaas sampvala, hyamoolech baryapaiki sarvana ase vatat hote kee Pandavana rajya milave
Tyamule duryodhanchee baju saglyana patlee anee nyaayane rajya tayche hote he mala nahee patat

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

उत्तरादाखल पुष्कळ लिहिता येईल. मतभिन्नता ही राहीलच!
१. जरासंधाच्या हाडांचे फासे ही एक लोणकढी आहे. महाभारतात असे काही नाही. जरासंधाला पांडवानी फसवले नव्हते. त्याला वीरमरण मिळाले होते. पांडवांचा ’सूड’ त्याला मृत्यूनंतरही घ्यावासा वाटण्याचे कारण नव्हते. त्याच्या राज्यावर त्याच्या मुलालाच पांडव व कृष्णाने स्थापिले होते. तो मुलगा पांडवांच्या बाजूनेच लढला!
२. शकुनीने काय कपट केले याचे काहीहि वर्णन महाभारतात नाही. तो द्यूतात युधिष्ठिरापेक्षा फार वरच्या दर्जाचा होता. युधिष्ठिर त्याच्याशी फार बेफामपणे खेळला म्हणूनच बलरामाने त्यालाच दोष दिला. धॄतराष्ट्राने द्यूतात हरलेले सर्व वैभव पांडवाना परत केले व दुर्योधनाला ते मान्य करावे लागले हेही विसरता येत नाही. अर्थात अपमान परत घेता येणार नव्हते!
३. अनुद्यूताचा पण स्पष्ट होता व तो युधिष्ठिराने मान्य केला होता. वनात असताना एकदा द्रौपदीबरोबर वाद घालताना त्याने म्हटले की ’हा अखेरचा पण तरी आपण जिंकू’ अशी मला आशा होती! मला तुम्ही कोणीहि थांबवले नाही याचीहि त्याने द्रौपदीला व भीमाला जाणीव करून दिली. कोणीहि हरले तरी युद्ध तेरा वर्षे दूर जाणार होते, तेही त्याला हवेच होते.
४. दुर्योधन मोठा न्यायी होता असे मी मुळीच म्हणत नाही! पांडवानी तेरावे वर्ष निरपवाद पुरे केले असते तरीहि त्याने राज्य दिले नसतेच. त्याने तसे स्पष्ट बोलूनच दाखवले होते. सौर-चांद्रमानाच्या वादामुळे त्याला एक जोरदार मुद्दा मिळाला होता इतकेच. केव्हातरी पांडवांशी लढायचेच आहे तर आताच लढावे असे त्याने ठरवले.

Arvind Khanolkar said...

मी अशि गोष्ट वाचलेली आठवते की डुर्योधनाने क्रिष्णाला एकदा विचारले की तु आमच्यात आणि पान्डवात फरक का करतोस? तेन्व्हा त्याला व नन्तर युधिष्ठीराला अनुक्रमे एक सज्जन व्यक्ति सभेतून शोधायला सान्गितले. ही गोष्ट mahabharataat aahe ka?