आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Thursday, December 2, 2010

महाभारतातील भीष्मचित्रण - भाग ६

पांडवांना वारणावतास पाठवण्याच्या दुर्योधनाच्या बेतामागील कारस्थान भीष्माला उमगले नाहीं. विदुराला उमगले व आपल्यापरीने त्याने पांडवांना वांचवण्यासाठी साह्य केलें (वाड्यातून पळून जाण्यासाठी भुयार खणण्यासाठी आपला विश्वासू माणूस युधिष्ठिराकडे पाठवला), मात्र नवल म्हणजे त्याने आपला संशय भीष्माच्या कानावर मुळीच घातला नाहीं वा वारणावतास पांडवांना पाठवूं नये असें त्याने भीष्माला मुळीच विनवले नाहीं! असें कां झालें? भीष्म कांहीहि करणार नाहीं असें विदुराला वाटलें काय? महाभारत याबद्दल गप्प आहे! शेवटी वारणावतास जे व्हायचे ते झाले. वाड्याला लागलेल्या आगीतून पांडव व कुंती कसेबसे वांचले व परागंदा झाले. तीं वांचल्याची कुणकूण विदुराला लागलीच असणार पण त्याने तेहि भीष्माला कळूं दिले नाही. कौरवांनी पांडव व कुंती यांचे और्ध्वदैहिकहि केले असे महाभारत म्हणते. सत्य परिस्थितीबाबत भीष्म पूर्ण अंधारात राहिला.
द्रौपदीच्या स्वयंवराच्या मंडपांत वारणावतांतून वांचून परागंदा झालेले पांच पांडव ब्राह्मणवेषांत प्रगट झाले होते. अनेक वर्षांचा सहवास असूनहि, कौरवांपैकीं कोणीहि, भीष्मानेदेखील, त्यांना अजिबात ओळखले नाहीं. अर्जुनाने दुष्कर पण जिंकला तरीहि ’हा अर्जुन तर नव्हे’ अशी शंका कोणालाहि आली नाहीं. नंतर ’पण अखेर एका ब्राह्मणाने जिंकला’ म्हणून रागावलेल्या क्षत्रिय राजांबरोबर अर्जुन व भीम यांचे जोरदार युद्ध झाले त्यांत भीमाचे अफाट बळहि प्रगट झाले तरीहि युद्ध संपल्यावर इतरांप्रमाणे कौरव तसेंच भीष्महि पांडवांना अखेरपर्यंत न ओळखतां हस्तिनापुरास निघून गेले. पांडवद्रौपदी विवाहालाहि कौरवांकडून कोणी आलें नाहीं. काही काळ गेल्यावर पांडव-द्रौपदी–कुंती हस्तिनापुराला परत आल्यावर मग अखेर भीष्माने राज्याचा वांटा पांडवांना द्यावा असा सल्ला दिला. यावेळीं त्याने म्हटलें कीं ’वारणावत प्रकरणीं लोक मलाच दोष देतात’ ! खरे तर युधिष्ठिराला पूर्वीच यौवराज्याभिषेक केलेला होता तर मग आतां तो जिवंत परत आल्यावर धृतराष्ट्राचे जागीं त्यालाच हस्तिनापुरचे राज्य मिळावयास हवे होते. भीष्माने तसे केले नाहीच. राज्याचा वाटाहि खरे तर दिला नाही. ’खांडवप्रस्थास जाऊन तुम्ही राज्य करा’ असे पांडवांना म्हटले. तेथे खांडववन जाळून, नवीन प्रदेश वस्तीखाली आणून, नवीन इंद्रप्रस्थ राजधानी बनवून, नवेच राज्य पांडवांना मिळवावे लागले. या सर्व घटनांमध्ये भीष्माची न्यायबुद्धि दिसत नाही. आपला निर्णय धृतराष्ट्रावर वा दुर्योधनावर लादण्याची त्याची इच्छा वा तयारी नव्हती असे म्हणावे लागते. येथून पुढे त्याने दुर्योधनाच्या कुटिल बेताना कधीच प्रखर प्रतिकार केलेला नाही. दुर्योधनाचा सर्वाधिकार त्याने जणू मान्यच केलेला दिसतो.

3 comments:

कृष्यणकुमार प्रधान said...

युधीष्टीराला पूर्वीच युवराज्याभिषेक झाला होता असे आपण म्हणता.तसे असेल तर तो केव्हां झाला होता,
पंडु जिवंत असताना का?
कृष्ण.-प्रधान

Sagar said...

नेहमीप्रमाणेच उत्तम.

धृतराष्ट्र हा तेव्हा राजा होता व भीष्म कुरुकुळाचा प्रमुख पण राजा नसल्यामुळे तो निर्णायक हस्तक्षेप करु शकला नसेल काय? तसेच भावाभावांत होता होईतो कलह टाळणे पर्यायाने रक्तपात टाळणे हाही त्याचा हेतू असावा. तसेच कुठेतरी भीष्माच्या मनात पांडव हे अस्सल पांडूपुत्र नाहीत, कुंती आणि माद्रीला ही नियोगपद्धतीने झालेली (कदाचित उत्तरकुरुंपासून) संतती असावी हेही असावे. कारण दुर्योधनाने एकदा म्हटलेच आहे की "हे पंडूपुत्र कोण, यांचे कूळ कुठले आहे हे कोणास माहीत आहे." त्यामुळेही पांडवांपेक्षा त्याचा ओढा धृतराष्ट्राकडे जास्त असावा

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

कुंती व पांडव हस्तिनापुराला येण्याआधीच पांडूचा मृत्यु झाला होता.
कौरव-पांडवांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर युधिष्ठिराला यौवराज्य मिळाल्याचा उल्लेख महाभारतात आहे.
धृतराष्ट्र राजा असला तरी कारभार विदुर व भीष्मच पहात होते. राज्याची वाटणी करण्याचे भीष्माने ठरवले असते तर विदुराने नक्कीच मान्य केले असते व धृतराष्ट्रालाहि मान्य करावेच लागले असते.
पुढे द्रौपदीशी विवाह झाल्यावर, नावाला कां होईना, पांडवांना राज्याचा वाटा भीष्माच्या सांगण्यावरूनच मिळाला. पांडवांबद्दल भीष्माला नेहेमीच जास्त आपुलकी वाटत होती. नियोगातून जन्मामुळे दुजाभाव खासच नव्हता. अखेर खुद्द धृतराष्ट्रहि शंतनूचा प्रत्यक्ष वंशज नव्हताच!