आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Thursday, May 19, 2011

अभिमन्युवध - भाग ८

दिवस मावळला. सैन्ये शिबिरात परतलीं. त्यानंतर संशप्तकांकडून कॄष्ण व अर्जुन परत आले असे महाभारत म्हणते. पांडव शिबिरात सामसूम व शोक पाहून काय झाले ते अर्जुनाने विचारले व मग नाइलाजाने युधिष्ठिराने अभिमन्यु मारला गेल्याचे अर्जुनाला सांगितले. त्याने अर्जुनाला सांगितलेली हकिगत व आधीच्या लेखात दिलेली हकीगत यात किरकोळ विसंगति दिसते. युद्धाच्या सुरवातीला पांडववीरानी संयुक्तपणे द्रोणावर हल्ला केल्याचे व तो द्रोणाने परतवून लावल्याचे युधिष्ठिर सांगत नाही. तो म्हणाला, ’मला पकडण्याचा द्रोणाने शर्थीचा प्रयत्न केला आणि त्याचाच प्रतिकार आम्हाला जड पडत होता मग सैन्याचा मुख्य चक्रव्यूह कोण तोडणार हा प्रष्न होता. नाइलाजाने ते काम अभिमन्यूवर सोपवावे लागले कारण त्यालाच ते माहीत होते. त्याने व्यूह तोडल्यावर त्याच वाटेने त्याच्या पाठोपाठ जाऊन त्याचे रक्षण करण्याचे आमचे सर्व प्रयत्न जयद्रथामुळे विफल झाले आणि अभिमन्यु एकटाच व्यूहात सापडला. मग द्रोण, कृप, अश्व्त्थामा, कर्ण, बृहत्बल व कृतवर्मा यांनी त्याला घेरले आणि अखेर दु:शासनपुत्राकडून तो मारला गेला.’
अर्जुन संशप्तकांकडे अडकलेला असो वा माझ्या शंकेप्रमाणे शिबिरातच असो, पण एक दिवस तो नसताना त्याचा पुत्र मारला गेला. अर्जुनाने, जणू, जयद्रथाला या अनर्थाला जबाबदार धरून, ’उद्या सूर्यास्तापूर्वी मी जयद्रथाचा वध करीन, नाहीतर अग्निकाष्टे भक्षण करीन’ अशी घोर प्रतिज्ञा अचानक केली. प्रत्यक्षात अभिमन्यूला घेरणार्‍या सहाही वीरांना सोडून (त्यातील बृहत्बलाला अभिमन्यूनेच मारले होते.) जयद्रथाला मारण्याची प्रतिज्ञा अर्जुनाने कां केली हे एक जरासे कूट आहे. आपले हरदास-पुराणिक म्हणत कीं अर्जुन आणि कृष्ण रणात अभिमन्युचा शोध घेत फिरत होते व मरणासन्न अभिमन्यूने त्याना सर्व हकीगत स्वत:च सांगितली. रणात पडलेल्या अभिमन्यूला जयद्रथाने लाथ मारली हे अभिमन्यूकडून ऐकून चिडून अर्जुनाने त्याच्या वधाची प्रतिज्ञा केली. महाभारतात असें काही मुळीच नाही. थोडा विचार केल्यावर अर्जुनाच्या प्रतिज्ञेचा मला असा खुलासा सुचतो कीं कौरववीरांनी अनेकांनी मिळून एकट्या पडलेल्या अभिमन्युचा वध केला तर आतां त्या सर्वांना अर्जुनाचे हे एक निर्वाणीचे आव्हान होते कीं ‘मी जयद्रथाच्या वधाची प्रतिज्ञा केली आहे, ती माझ्या एकट्याच्या बळावरच विसंबून. अभिमन्यु एकटाच होता त्याला तुम्ही सर्वानी मिळून मारलेत, आता तुमच्यात बळ असेल तर सर्वांनी मिळून जयद्रथाला एकट्या माझ्यापासून वांचवा!’ पुत्राच्या मृत्यूमुळे त्याला अनिवार शोक झाला असणारच तेव्हा आता एक तर कौरववीरांचा नक्षा उतरवणे किंवा स्वत: मरून जाणेच श्रेयस्कर असे त्याला वाटणे स्वाभाविक म्हटले पाहिजे. दुसर्‍या दिवशी काय घडले याचा विस्तृत परामर्ष मी पूर्वीच जयद्रथवध प्रकरणात घेतला आहे. तो वाचकानी अवश्य पुन्हा नजरेखालून घालावा. अनेकांनी मिळून केलेला अभिमन्यूचा वध कौरवपक्षाला फार महाग पडला व दिवस अखेर पांडवपक्षाची अंतिम विजयाकडे वाटचाल सुरू झाली एवढेच म्हणून हा विषय पुरा करतों.

Monday, May 16, 2011

अभिमन्युवध - भाग ७

जयद्रथाला मिळालेल्या वराची हकीगत पांडव पक्षाच्या वीराना व्यूहात शिरण्यात आलेल्या अपयशावर पांघरूण घालण्यासाठी रचली असावी असा संशय येतो! जयद्रथाला स्वप्नात शंकराने वर दिला असें म्हटले आहे त्यामुळे असें वाटते. काही असो, अभिमन्यु चक्रव्यूहात एकटा अडकला. त्याने दिवसभर कोरवांच्या पक्षाच्या एकाही महावीराला दाद दिली नाही. अनेकजण मिळून चालून आले तरीहि त्याने त्याना पळवले. त्याने कोणाकोणाला मारले याची मोठी यादी होईल. अखेर द्रोणाचा सल्ला मानून कर्णाने पुन्हा अभिमन्यूवर चाल केली आणि अखेर त्याचे धनुष्य तोडले. महाभारतातील युद्धवर्णनात अनेक वीरांचीं धनुष्ये अनेकवार तोडली गेल्याचे उल्लेख येतात. त्याला अपवाद फक्त अर्जुनाचा! त्याचे गांडीव धनुष्य मात्र कधीहि तोडले गेल्याचा उल्लेख मिळत नाही. कर्णाजवळ गांडीवधनुष्याच्या तोडीचे धनुष्य होते असे म्हटलेले आहे मात्र त्याचे धनुष्य जयद्रथवधाचे दिवशी भीमाने मोजून सतरा वेळां तोडले असे वर्णन आहे. सात्यकी, अभिमन्यु आणि इतर अनेकांनीहि ते तोडले. धनुष्य तोडणे याचा अर्थ प्रत्यंचा तोडणे असाहि कदाचित असेल!
अभिमन्यूचे धनुष्य तुटले, सारथी मेला, घोडे मेले. मग हाताशी मिळेल त्या आयुधाने त्याने युद्ध चालूच ठेवले. अखेर सर्व संपल्यावर दु:शासनाचा पुत्र व अभिमन्यु यांचे गदायुद्ध झाले, दोघे मूर्छित पडले मात्र दु:शासनपुत्र आधी शुद्धीवर आला व त्याने गदेच्या प्रहाराने अभिमन्यूची अखेर केली. दिवस संपत आलेला होता. त्यामुळे युद्ध संपवून दोन्ही सैन्ये माघारीं फिरलीं.

Wednesday, May 11, 2011

अभिमन्युवध - भाग ६

कौरवपक्षाचे अनेक महावीर अभिमन्यूवर चालून आले. कर्णासह सर्वांना अभिमन्यूने अनेकवार चकमकींत हरवून पळवून लावले. शल्याला हरवल्यावर त्याचे सैन्य पळून जाऊ लागले तेव्हां त्याच्या भावाने ते सावरून धरले. मात्र अभिमन्यूने त्याच्यावर हल्ला चढवून त्यालाच मारले. अभिमन्यूचा पराक्रम पाहून द्रोण त्याचे कौतुक करू लागला तेव्हा दुर्योधनाला राग येऊन तो द्रोणाला म्हणाला कीं ’त्याचे कौतुक कसले करता? तो कोणालाच आवरत नाहीं. त्याच्या वधाचा उपाय सांगा.’ तेव्हा द्रोणाने म्हटले कीं ’त्याच्या हातातले धनुष्य चालू आहे तोंवर आपल्या कोणाही वीराला तो दाद देणार नाही. एकजुटीने हल्ला करूनहि तुमचा निभाव लागत नाही. तेव्हा प्रयत्नपूर्वक त्याचे धनुष्य तोडा!’ अभिमन्युपुढे कोणीच उभा राहूं शकत नव्हता. कर्णालाहि त्याने पुन्हापुन्हा पळवून लावले. त्याच्या भावाला अभिमन्यूने मारले. एक उल्लेख आहे कीं ’एक जयद्रथ सोडला तर इतर कोणाचेच काही चालत नव्हते’ मात्र प्रत्यक्षात जयद्रथ व अभिमन्यूचे युद्ध झालेले अजिबात वर्णिलेले नाही!
अभिमन्यु चक्रव्यूहात एकटाच शिरला अशी समजूत आहे. एके ठिकाणी मात्र असाही उल्लेख संजयाच्या वर्णनात आहे कीं ’युधिष्ठिर, भीम, शिखंडी, सात्यकी, धृष्टद्युम्न व इतर अनेक अभिमन्यूच्या मार्गाने गेले व त्याच्या भोवती संरक्षक कडे करून त्यानी कौरवांचा पाठलाग केला, मात्र मग त्या सर्वांना जयद्रथाने अडवले'एके ठिकाणी असाहि उल्लेख आहे कीं ’अभिमन्यूच्या सारथ्याने व्यूहात पडलेल्या भगदाडातून कौशल्याने त्याचा रथ बाहेर काढला व पांडवानी त्याचा जयजयकार केला.’ मात्र हे क्षणिक उल्लेख सोडले तर अभिमन्यु एकटाच चक्रव्यूहात शिरला आणि त्याने उघडून दिलेल्या वाटेने इतर पांडववीर व्यूहात शिरण्याचा प्रयत्न करीत असताना एकट्या जयद्रथाने त्यान यशस्वीपणाने अडवून धरले असेच महाभारत म्हणते. त्याला वर मिळाला होता कीं ’युद्धात कोणत्यातरी एका दिवशी अर्जुन सोडून इतर सर्व पांडवाना तूं अजिंक्य ठरशील.’ हा वर त्याने जेव्हा पांडव वनात असताना द्रौपदीला एकटी असताना पळवण्याचा प्रयत्न केला होता व मग पांडव परत आल्यावर भीमार्जुनानी तिला सोडवून मग त्याची भयानक अप्रतिष्टा केली होती तेव्हा चिडून जाऊन तप:चर्या करून मिळवला होता असे महाभारत म्हणते. यात गोम अशी आहे कीं या वरामध्ये सात्यकी किंवा धृष्टद्युम्न किंवा पांडवाकडील इतर रथी-महारथी यांचा समावेश कुठे होता? मग त्यांचेहि जयद्रथापुढे कां चालले नाही? महाभारत याचा खुलासा करत नाही! अर्थ इतकाच घ्यावयाचा कीं Every dog has his day या उक्तीप्रमाणे हा जयद्रथाचा दिवस होता! त्यामुळे अभिमन्यूच्या मदतीला कोणीहि व्यूहात शिरू शकले नाही.

Sunday, May 1, 2011

अभिमन्युवध भाग ५

संजयाने सर्व १८ दिवसांच्या युद्धाचे वर्णन धृतराष्ट्राला ऐकविले हे सर्व ज्ञात आहे. त्याचेसाठी कृष्णाने त्याला दिव्यदृष्टि दिली होती, तो सर्ववेळ धृतराष्ट्रापाशी बसून युद्धाचा ’आंखों देखा हाल’ त्याला ऐकवत होता, अशी एक भोळसट हरदासी समजूत आहे. प्रत्यक्षात तसे काही नाही. संजय प्रत्यक्ष युद्धभूमीवरच उपस्थित होता असे अनेक उल्लेख युद्धवर्णनात आहेत. शेवटच्या दिवशी तर त्याने स्वत: युद्धातहि भाग घेतला! मात्र त्याचे आधी, त्याला युद्धभूमीवर कोठेहि फिरण्यास आडकाठी करू नये असे दोन्ही पक्षानी मान्य केले असावे. आजहि वृत्तपत्रे वा रेडिओ-टीव्ही याना असे स्वातंत्र्य असते. त्याने, भीष्म पडल्यावर, द्रोण मारला गेल्यावर, कर्णाचा मृत्यु झाल्यावर व अखेरच्या दिवशी, अशा चार टप्प्यात युद्धाचे वर्णन धृतराष्ट्राला प्रथम संक्षिप्त व पुन्हा खुलासेवार असे ऐकवले असे महाभारतच म्हणते! पण कृष्णाला देवाचा अवतार बनवणाराना कोण आवरणार?
या दिवसाचे युद्धवर्णनहि व्यासानी संजयाच्या तोंडून धृतराष्ट्राला ऐकवले आहे. युद्धाला तोंड लागले तेव्हां चक्रव्यूहाच्या पुढे द्रोण स्वत:, जयद्रथ, अश्वत्थामा, शकुनि, शल्य व भूरिश्रवा हे पांडवांना सन्मुख सज्ज होते. द्रोणाने युधिष्ठिरावर आक्रमण करण्यापूर्वीच पांडवांच्या प्रमुख वीरांनी द्रोणावरच हल्ला केला. मदतनिसांच्या सहाय्याने द्रोणाने त्याना यशस्वीपणे तोंड दिले. आता आपल्या वीरांची परवा न करतां द्रोण आपल्यावरच कोसळेल असे दिसल्यामुळे (अर्जुन अर्थातच जवळ नव्हताच), नाइलाजाने युधिष्ठिराने अभिमन्यूला द्रोणावर आक्रमण करण्यास सोडले. हा वेळ पर्यंत चक्रव्यूह मागे तसाच होता. तो तोडण्यासाठी कोण पुढे येतो हे द्रोण पहात होता. तोंच द्रोणावर आक्रमण करून अभिमन्यूने अचानक, द्रोणाचीहि पर्वा न करतां, मुख्य चक्रव्यूहावरच आक्रमण केले. चक्रव्यूह तोडून आत घुसून त्याने अनन्वित संहार आरंभला. त्याचा प्रतिकार करण्यासाठी दुर्योधन स्वत; पुढे झाला. अभिमन्यु हा महारथी असल्यामुळे दुर्योधनाचा पाड लागणार नाही हे जाणून द्रोणाने त्याच्या मदतीला दु:सह, दु:शासन, कृप, विविंशति, यांचे बरोबरच, स्वत:जवळ असलेल्या अश्वत्थामा, भूरिश्रवा, शल्य, शकुनि यानाहि पाठवले व मग काही वेळाने तो स्वत:हि तिकडेच धावला. यामुळे युधिष्ठिरावर हल्ला करण्याचा बेत बाजूलाच पडला. युधिष्ठिराचा हेतु त्या वेळेपुरता सफळ झाला पण त्याची फार भयानक किंमत पांडवांना मोजावी लागली.