आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Saturday, September 25, 2010

नलदमयंतीकथा भाग ९

वडिलाच्या पदरीं असलेल्या काहीं ब्राह्मणांना तिने नलाचा शोध घेण्यासाठीं सर्व दिशांना पाठवलें. कोणा एका पतीने वनात पत्नीला एकटीला सोडून दिल्याचे व तिच्या झालेल्या हाल अपेष्टांचे वर्णन करणारे एक कवन त्याना शिकवून ’ते अनेकांना ऐकवा व कोणाचा काही प्रतिसाद मिळाला तर येऊन मला सांगा’ असे त्याना सांगितले. सर्व जण हात हलवीत परत आले पण पर्णाद नावाच्या एका ब्राह्मणाने मात्र म्हटले कीं मी राजा ऋतुपर्णाच्या राजधानीला गेलो होतो व तुमचे काव्य ऐकवले असतां राजाचा बाहुक नावाचा एक सारथी व्याकुळ होऊन त्याने उद्गार काढले कीं ’उच्चकुळांतील स्त्रिया संकटे कोसळलीं म्हणून धीर सोडत नाहीत वा पतीला दोष देत नाहीत. पत्नीला ज्याने एकटे सोडले त्या पतीला तसेच काही कारण झाले असेल. त्या पत्नीने पतीवर राग धरूं नये’ हे ऐकून दमयंतीला तो नल तर नव्हे अशी शंका आली पण त्या सारथ्याचे रूपगुण नलासारखे मुळीच नव्हते असे त्या ब्राह्मणाच्या वर्णनावरून दिसत होते. फक्त तो रथचालनात प्रवीण आहे व पाककलेतहि तज्ञ आहे एवढे वर्णन नलाशीं जुळते होते. तेव्हां खरें काय हे कळण्यासाठी आईशी विचारविनिमय करून पण वडिलांशी न बोलतां तिने एक नवीनच धाडसी युक्ति केली. सुदेव नावाच्या दुसर्‍या ब्राह्मणाला ऋतुपर्णाकडे निरोप देऊन पाठवलें कीं ’नलाचा शोध अजिबात लागत नसल्यने दमयंतीने पुन्हा स्वयंवर ठरवले आहे मात्र ते उद्यांच आहे तेव्हां वेळेत आमच्या राजधानीला पोचता येते का पहा.’ हा निरोप इतर कोणा राजाकडे अर्थातच पाठवलेला नव्हता. बाहुक हाच नल असेल तर त्याच्या रथचालनाच्या अद्वितीय कौशल्याने ऋतुपर्ण येऊन पोंचेल व बाहुकाला प्रत्यक्ष पाहतां येईल असा तिचा विचार होता.
सुदेव त्याप्रमाने ऋतुपर्णाच्या राजधानीला जाऊन त्याला भेटला व निरोप सांगितला. ऋतुपर्णाने बाहुकाला म्हटले कीं ’इतक्या थोड्या वेळांत इतके दूर कसें पोंचतां येईल?’ बाहुकाला दमयंतीचा पुन्हा स्वयंवराचा बेत ऐकून फार दु:ख झाले पण स्वत:च्या रथसंचालनाच्या अभिमानापोटीं त्याने ऋतुपर्णाला म्हटलें की तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला नेऊन पोंचवीन! ऋतुपर्ण बाहुक व वार्ष्णेय तिघेही निघाले. नलाने अश्वशाळेतील स्वत: पारख केलेले दिसायला हाडकुळे पण तेजस्वी घोडे रथाला जोडले. घोडे पाहून ऋतुपर्णाला शंका वाटली. नलाने म्हटलें कीं माझी निवड तुम्हाला पटत नसली तर तुमच्या पसंतीचे घोडे जोडा आणि वार्ष्णेयाला घ्या, तोहि उत्तम सारथ्य जाणतो. ऋतुपर्ण मुकाट बसला.
राजा ऋतुपर्ण हा द्यूतविद्येत व गणनाशास्त्रात प्रवीण होता. नल रथसंचालनात व अश्वपरीक्षेत तज्ञ होता. नलाचे द्यूतातील अज्ञान दूर झाल्याखेरीज त्याला आपले राज्य व वैभव पुष्कराकडून परत मिळवता येणार नव्हते. नलाच्या वेष पालटून ऋतुपर्णाच्या पदरीं नोकरी करण्यामागे त्याचेकडून अक्षविद्या प्राप्त करून घ्यावी हा हेतु असावा. कदाचित कर्कोटकानेच त्याला ही कल्पना सुचवली असावी असा तर्क सयुक्तिक वाटतो. प्रवासात वाटेतच हे विद्येचे आदानप्रदान झाले असे वर्णन महाभारतात आहे. कदाचित नलाच्या ऋतुपर्णाच्या सेवेत असण्याच्या काळात ते वेळोवेळी झाले असेल.

Tuesday, September 21, 2010

नलदमयंतीकथा भाग ८

नल व दमयंती वेगळ्या मार्गाला लागलीं. नल आपल्याला एकटी सोडून गेला हे कळल्यावर, हिंम्मत न सोडतां, अरण्यांतून अनेकानेक संकटांना तोंड देत प्रवास करून दमयंती अखेर आपल्या पित्याच्या घरीं पोंचली. या सर्व संकट परंपरेचे मी वर्णन करीत नाहीं. मात्र हे सर्व होऊनहि दमयंतीचे नलावरचे प्रेम कणभरहि कमी झाले नाहीं! त्याचे काय झाले असेल व तो आपल्याला पुन्हा कसा भेटेल याचीच चिंता तिला लागून राहिली. इकडे नलाचीहि पाठ संकटांनी सोडली नाहीं. अर्ध्या वस्त्राने वनात फिरताना त्याला कर्कोटक नाग डसला व त्याचे सुंदर रूपच क्षणात नष्ट झाले. मात्र कर्कोटकाने त्याला म्हटलें ’ मी मुद्दामच असे केले कारण काही काळ तरी तुला विजनवासात काढावा लागणार आहे तर निदान तुझी ओळख कुणाला पटूं नये. योग्य वेळीं माझ्या कृपेने तुला तुझे मूळ रूप प्राप्त होईल.’ कर्कोटक नागाचा दंश हेहि माझ्या मते एक रूपकच आहे. खुद्द नलालाच आपण काळ अनुकूल येईपर्यंत अज्ञात रहाणे आवश्यक आहे हे लक्षात येऊन त्याने रूप व वेष पालटला असावा. (वनातील कर्कोटक नावाच्या नागकुळातील पुरुषाने त्याला साह्य केले.) तसे करून नलहि वनातून भटकत अखेर त्याच ऋतुपर्ण राजापर्यंत पोचला. त्याच्या दीर्घकाळच्या सारथ्याने, वार्ष्णेयाने, त्याला ओळखले नाही. स्वत: नलहि रथसंचालनाच्या कामात महान तज्ञ होता. त्याने ऋतुपर्णापाशीं सारथ्याची नोकरी धरली व तो व वार्ष्णेय दोघेहि जोडीने ते काम करत राहिले. नल अज्ञातवासात दु:खाने कालक्रमणा करीत होता व दमयंतीचे काय झाले असेल याची चिंता करत होता पण त्याला आशा वाटत होती कीं दमयंतीने हर प्रयत्नाने माहेर गाठले असेल. तसे झाले असेल तर ती आपल्या काळजीने चूर झाली असेल असेच त्याला वाटत होते. इकडे दमयंती पित्याच्या घरीं तुलनेने सुखात होती दोन्ही मुलेंहि तिच्या पाशीं सुखरूप होतीं पण नलाचे काय झालें असेल व पुन्हा त्याची भेट कशी होणार हा विचार तिला स्वस्थ बसूं देत नव्हता. तिने आपल्या परीने नलाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू केले.

Thursday, September 16, 2010

नलदमयंतीकथा भाग ७

पुष्कर व नल यांचे द्यूत अनेक दिवस चालले. कौरव-पांडवांच्या द्यूताप्रमाणे तें अर्ध्या दिवसांत संपले नाही. मात्र युधिष्ठिराप्रमाणेच नलही कायम हरतच होता पण द्यूत संपवीत नव्हता. राज्याच्या मंत्र्यांना भेटावयासहि त्याला सवड नव्हती. दमयंतीला काय करावे हे काहीच सुचत नव्हते. तिने नलाला निरोप पाठवले कीं ’इतकें धन गेलें व इतकेच शिल्लक आहे.’ परिणाम शून्य! शेवटीं तिने वार्ष्णेय नावाच्या विश्वासू सारथ्याला बोलावून घेऊन त्याच्या बरोबर आपल्या दोन्ही मुलांना माहेरीं पाठवून दिलें. वार्ष्णेयाला सांगितले ’मुलांना पोंचवून व रथ तेथेच सोडून तूं निघून जा कारण राजाला आतां तुझा उपयोग होईल असे दिवस राहिलेले नाहीत.’ वार्ष्णेयाने त्याप्रमाणे केलें. तो दुसर्‍या ऋतुपर्ण नावाच्या राजाचे पदरीं नोकरीला राहिला. इकडे दमयंतीने येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याची मनाची तयारी केली. सर्व धन संपत्ति हरून नल निष्कांचन झाला. पुष्कराने, नलाला (शकुनिप्रमाणेच)) ’दमयंतीला पणाला लाव’ असें सुचवलें. मात्र नलाने ती मर्यादा ओलांडली नाहीं. सर्वस्व हरल्यामुळे नल व दमयंती नेसत्या वस्त्रानिशी नगराबाहेर पडलीं. पाठोपाठ आलेल्या नगरजनाना परत पाठवून दोघें वनांत शिरलीं. नलाची दुर्दशा होऊनहि ’कली’चे समाधान झालेले नव्हते असे महाभारत म्हणते.
रात्रीं उपाशींपोटीं वनात भटकत असताना दमयंतीला ग्लानि येऊन झोपली असताना नलाला तीन सोनेरी पक्षी जमिनीवर दाणे टिपताना दिसले. त्यांना पकडावे म्हणून नलाने नेसते वस्त्र सोडून त्यांच्यावर टाकले पण ते वस्त्रच घेऊन ते पक्षी उडून गेले. दमयंतीच्याच वस्त्राचा थोडा भाग फाडून घेउन नलाने तो कमरेला गुंडाळला. त्याने आधी दमयंतीला ’तूं माहेरीं या अमुक रस्त्याने जा’ असें दाखवले होतें पण अशा आपत्काळीं त्याला सोडून जायचे तिने साफ नाकारले होते. आतां अर्ध्या वस्त्रावर पाळी आली तेव्हां नलाने विचार केला कीं आपण हिला झोपेत असताना सोडून गेलो तर ही नाइलाजाने माहेरीं जाईल, आता दुसरा इलाजच नाहीं. म्हणून अतिशय दु:खी अंत:करणाने दमयंतीला तशीच एकटी, अर्ध्या वस्त्रांत व निद्रित अवस्थेत सोडून नल वेगळ्या रस्त्याने निघून गेला. ’कली’ने नलाला म्हटलें ’तुम्ही दोघें वस्त्रांत होतांत तेंहि मला पाहवलें नाहीं म्हणून द्यूताचे तीन फासेच मी पक्षीरूपाने तुझ्याकडे पाठवले होते, आतां माझे कार्य झाले तुझी पुरती दुर्दशा झाली.’ याचा अर्थ असा विचार नलाच्या मनात आला एवढाच घ्यावयाचा असे मला वाटते.

Friday, September 3, 2010

नलदमयंतीकथा भाग ६

विवाहानंतर सर्व राजे आणि देवहि परत निघाले. देवांना वाटेत ’कलि आणि द्वापर’ असे दोघे भेटले. हे देव वा मानव कोणीच नव्हते. या कोणी दैवी शक्ति होत्या. मात्र देवांना टाकून दमयंतीने मानव नलाला वरिलें याचे कलीला वैषम्य वाटलें व त्याने जाहीर केले कीं मी नलाला धडा शिकवीन. पुढे नल-दमयंतीवर जी अनर्थपरंपरा कोसळली त्याचे कारण खरेतर नलाचे आत्यंतिक द्यूतप्रेम होते पण त्या जबाबदारीतून त्याला मुक्त करण्यासाठी ’तो सर्व कलीचा प्रभाव होता’ असे त्याचे कारण दर्शविले गेले आहे. ’कलीचा प्रभाव’ म्हणजे काही काळपर्यंत स्वत:ची विवेकबुद्धि हरवून बसणे एवढेच म्हणावयाचे.
नलदमयंतीचा संसार सुखाने चालला होता. त्याना दोन मुले झालीं. बराच काळ पर्यंत ’कली’ला आपला बेत साध्य करतां आला नाही. पण अखेर काळ नलाला प्रतिकूल झाला अन मग कलीने दावा साधला. नलाचा एक भाऊ होता. त्याचे नाव पुष्कर. तो नलाच्या राज्यात राहत होता असे म्हटलेले नाही. त्याचा व नलाचा काही झगडा झाला होता वा नलाने त्याचा अपमान करून त्याला राज्यातून हाकलून दिले होते असे म्हटलेले नाही आणि पुष्कराचे वेगळे राज्य होते असेहि म्हटलेले नाही. मग या पुष्कराने नलाशी वैर कां धरावें? ’कलीचा प्रभाव!’ एक दिवस अचानक हा पुष्कर नलाकडे आला आणि त्याने नलाला द्यूताचे आव्हान दिले. ते नलाने राजेलोकांच्या स्वभावाप्रमाणे स्वीकारले आणि मग ’कलीच्या प्रभावामुळे’ नलाची विवेकबुद्धि त्याला सोडून गेली. तो बेभानपणे द्यूताच्या संपूर्ण आहारीं गेला अन मग अनर्थपरंपरा सुरू झाली.