आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Friday, November 19, 2010

महाभारतातील भीष्मचित्रण - भाग ५

पदरीं पडलें तें पवित्र मानून, इच्छा असो वा नसो, हे दोन्ही पुत्र मोठे होईपर्यंत भीष्माला राज्य संभाळावे लागले! धृतराष्ट्र आंधळा त्यामुळे राजा होण्यास लायक नव्हताच त्यामुळे पांडु पुरेसा मोठा झाल्यावर त्याला राज्यावर बसवून भीष्म मोकळा झाला. पांडूमध्ये कोणता जन्मदोष होता हे स्पष्ट नाही. तर्क करावयाचा तर बहुधा त्याच्या हृदयाला छिद्र वगैरे असावे त्यामुळे लहानपणी तो पांढराफटक असावा. बाल व तरुण वयात तो दोष काहीसा झाकला गेला असावा म्हणून त्याचा युद्धकलेचा अभ्यास झाला व तो वीरपुरुष बनला. पुढे वय वाढल्यावर तो दोष पुन्हा पुढे आला असावा व कोणताही ताण, राज्यकारभाराचा वा संसारसुखाचा, झेपणे त्याला शक्य राहिले नाही. त्यामुळे त्याला राज्यनिवृत्ति स्वीकारून वनवास व पुत्रासाठी कुरुकुळात पुन्हा एकदां नियोग स्वीकारावा लागला. पांडु वनात भार्यांसह गेला त्याला भीष्माने रोखले नाही. राजधानीतच राहून नियोगाने अपत्यप्राप्ति करून घे असे सत्यवतीने वा भीष्माने त्याला म्हटले नाहीं. आधीच्या पिढीचा अनुभव लक्षात घेऊन ’तूं हिमालयाकडे जाऊन कुरुसमुदायांतील तिकडील एखाद्या योग्य पुरुषामार्फत नियोगमार्ग पत्कर’ असें भीष्मानेच त्याला सुचवले असा माझा तर्क आहे. (पांडवांचा जन्म देवांपासून हे एक रूपकच म्हटले पाहिजे. तें शब्दश: घेणे योग्य नाहीं )
पांडु राज्य सोडून वनांत गेल्यामुळे नाइलाजाने धृतराष्ट्राला राज्यावर बसवून कारभार भीष्म व विदुर यांना पहावा लागला. विवाह पांडूबरोबरच होऊनहि अद्याप धृतराष्ट्रालाहि अपत्यें झालीं नव्हतीं. कुंतीला वनात युधिष्ठिर पुत्र झाल्याचें गांधारीला कळले तेव्हां तीहि गरोदर होती असें महाभारत म्हणतें पण हे बरोबर वाटत नाहीं. तिचा ज्येष्ठ पुत्र दुर्योधन युधिष्ठिरापेक्षा लहान, भीमाच्याच वयाचा होता! कुंतीपुत्र आधीं जन्मल्यामुळे आपल्या पुत्राला पुढे राज्य मिळण्याची खात्री तिला व धृतराष्ट्राला राहिली नाहीं. कौरव-पांडव वैराची ही सुरवातच होती! कालांतराने पांडू व माद्री यांचा वनात मृत्यु झाला व कुंती पांच पुत्रांसह हस्तिनापुरास परत आली. कौरव पांडव दोघेंहि लहान असल्यामुळे राज्याची व्यवस्था कायम राहिली. मात्र दुर्योधनाला युधिष्ठिर हा आपला प्रतिस्पर्धी आहे हें लहानपणापासूनच स्पष्ट दिसूं लागलें.
कौरव-पांडवांच्या शिक्षणाची व्यवस्था भीष्माने नीट लावली. आधी कृप व मग द्रोण यांचेपाशी ते युद्धकला उत्तम शिकले. सर्व राजपुत्र मोठे झाल्यावर अस्त्रदर्शनाचा प्रसंग घडला. त्यावेळी अचानक उपस्थित होऊन कर्णाने अर्जुनाची बरोबरी करून मग त्यांच्या द्वंद्वापर्यंत पाळी आली. ते थांबवण्याचे श्रेय कृप व भीमाला दिले पाहिजे. भीष्माने कुरुप्रमुख या नात्याने वेळीच हस्तक्षेप केला नाही. दुर्योधनाने आततायीपणे कर्णाला अंगराज्य देऊन टाकले व राज्याभिषेकहि केला. त्याला भीष्माने थांबवले नाही. कुलप्रमुख या नात्याने त्याच्या संमतीशिवाय हे कसे होऊ शकले? दुर्योधनाचा अधिकार येथून पुढे जणूं भीष्माने मान्यच केला! मात्र पुढे नवीनच पेंच उभा राहिला. राज्यावर धृतराष्ट्र पण यौवराज्य युधिष्ठिराला दिले. हा अर्थातच भीष्माचा निर्णय होता. यातून तिढाच निर्माण झाला. कौरव-पांडवांतील वाढता वैरभाव व दुर्योधनाला मिळालेली कर्णाची साथ हे दिसत असूनहि भीष्माने वेळीच राज्य वाटून देण्याचा उपाय योजला नाही. दुर्योधन सुखासुखी युधिष्ठिराला राज्य मिळू देणार नाही हे उघड होते व धृतराष्ट्र दुर्योधनाच्या आहारी जातो आहे हेहि दिसत होते तरीहि भीष्माने काही केले नाही. या वेळीं भीष्माचा सल्ला वा निर्णय धृतराष्ट्र वा दुर्योधन झिडकारूं शकले नसते. पण भीष्माने तसे केले नाही. अलिप्तपणा एवढेच कारण?

Friday, November 12, 2010

महाभारतातील भीष्मचित्रण - भाग ४

विचित्रवीर्याने दोन्ही भार्यांसह संसारसुख काही वर्षे उपभोगले. मात्र त्याला अपत्य झाले नाही. त्याच्यात काय दोष होता ते महाभारतात सांगितलेले नाही. विचित्रवीर्य या नावावरून तर्क करावा. ऐन तारुण्यातच तो मरून गेला. शांतनूने ज्या हेतूने सत्यवतीशी विवाह केला तो वंशवृद्धीचा हेतु निष्फळ ठरला. वंश टिकवण्यासाठी सत्यवतीने भीष्माला त्याच्या प्रतिज्ञेतून मुक्त करून ’तूं विवाह कर’ असे सुचवले ते त्याने अर्थातच नाकारले. ’वडील दीर या नात्याने अंबालिका, अंबिका यांना तूं अपत्य मिळवून दे’ असे विनवले तेहि नाकारले. मात्र वंश टिकवण्यासाठी पूर्वीं, परशुरामाने क्षत्रिय घराणीं नामशेष केलीं होतीं तेव्हां, अनेक क्षत्रिय स्त्रियांनी श्रेष्ठ ब्राह्मणांपासून नियोगाने अपत्यप्राप्ति करून घेऊन वंशविस्तार केला, याचा दाखला देऊन, अंबालिका व अंबिका यांनीहि तसेंच करावे असें सुचवलें. तेव्हां सत्यवतीने आपल्याला ऋषि पराशरापासून झालेल्या व्यास या पुत्राचे नाव नियोगासाठी सुचवले ते भीष्मानेहि मान्य केले. यावेळीं कुरुकुळांतीलच दुसर्‍या कोणा पुरुषाचा विचार दोघांनीहि कां केला नाही हे एक कोडेच आहे. ज्या बाल्हीकाचे नाव वरचेवर येते, त्याच्या वंशातला कोणी योग्य पुरुष कसा सुचला नाहीं? (बाल्हीक सोमदत्त व त्याचा पुत्र भूरिश्रवा याचे नाव पुढे कथेत अनेकदां येते. भूरिश्रवा साधारण कौरव-पांडवांचा समवयस्कच दिसतो तेव्हां सोमदत्त वा त्याचा पिता हा नियोगासाठी कदाचित योग्य वयाचा ठरला असता!)
सासूची सूचना दोन्ही सुनांनी अनिच्छेनेच मान्य केली असणार कारण व्यासाचे ओंगळ ऋषिरूप. खुद्द व्यासालाहि त्याची जाणीव होतीच. व्यासाला शुक नावाचा एक पुत्र होता तेव्हां सत्यवतीने विनवले तरीहि या भानगडीत आपण पडूं नये असें व्यासाला कां वाटलें नाहीं? अंबालिका व अंबिका दोघीनाहि जन्मदोष असलेले पुत्र झाले. त्याचें दिलेले कारण (अंबालिकेने डोळे मिटून घेणे व अंबिकेने भीतीने पांढरीफटक पडणे) निव्वळ हास्यास्पद आहे. इच्छेविरुद्ध (उदा. बलात्काराने) मातृत्व लादले गेले तरीदेखील स्त्रीला अनेकदां सुदृढ अपत्य होतें! येथे तर मातृत्व हवेच होते! जणू व्यासावर पुत्रांच्या व्यंगांचा दोष नको म्हणून तो त्या दोघींवर ढकललेला वाटतो! मात्र धृतराष्ट्र आंधळा निपजल्यावर तरी व्यासाचा नाद सोडून देऊन दुसरा कोणी शोधावा असें सत्यवतीला वाटले नाही वा भीष्मालाहि सुचले नाही. यांतहि भीष्माचा अति अलिप्तपणाच जाणवतो. तिसरा प्रयोग अंबालिका-अंबिका यांनी युक्तीने टाळला. आपल्या जागीं दासीलाच पाठवले! व्यासांना कळले होतेच कीं यावेळी आपल्यासमोर दासी आली आहे पण व्यासानी सत्यवती वा भीष्माकडे तक्रार केली नाही वा माघार घेतली नाही! दासीचे पोटीं विदुर जन्माला आला.

Wednesday, November 3, 2010

महाभारतातील भीष्मचित्रण - भाग 3

शांतनूला व सत्यवतीला चित्रांगद व विचित्रवीर्य असे दोन पुत्र झाले. त्यानंतर थोड्या काळानेच शांतनूचा मृत्यु झाला. ठरल्याप्रमाणे चित्रांगद राजा झाला. हा शूर होता. भीष्माला त्याने सत्तेपासून दूर ठेवले असावे. त्याचा विवाह झाल्याचा उल्लेख नाही. त्यामुळे पत्नी वा अपत्याचे नाव नाहीच. त्याचे व चित्रांगद याच नावाच्या गंधर्वाचे कुरुक्षेत्रात युद्ध झाले. तीन वर्षे एवढा दीर्घ काळ चाललेल्या या युद्धात भीष्माने कोणताही भाग घेतला नाही. असें कां झालें असावें? एक तर चित्रांगदाने भीष्माला खड्यासारखे दूर ठेवले असावे किंवा भीष्म कुरुकुळांत राहत असूनहि पूर्ण अलिप्त झाला असावा. महाभारत याबाबत काहीच सांगत नाहीं. युद्धात चित्रांगद मारला गेला एवढेच म्हणतें. त्याला मदत न केल्याबद्दल सत्यवतीनेहि भीष्माला दोष दिलेला नाही! हे प्रकरण जरासे धूसरच आहे!
चित्रांगदानंतर विचित्रवीर्य राजा झाला. (असे ’विचित्र’ नाव त्याला कां दिले असावे?). त्या वेळेला तो वयाने लहान असावा. तो मात्र भीष्माच्या कलाने वागत होता असे दिसते. काही काळानंतर त्याला भार्या मिळवून देण्यासाठी भीष्म काशिराजाच्या तीन मुलींच्या स्वयंवराला गेला. मात्र एकटाच! विचित्रवीर्याला बरोबर नेलेच नाही! ब्रह्मचर्याचा गाजावाजा झालेल्या भीष्माला स्वयंवरमंडपात एकटाच पाहून साहजिकच त्याची बरीच टिंगल झाली. तिन्ही मुलींना पळवून आणावयाचे असाच भीष्माचा बेत होता म्हणूनच बहुधा विचित्रवीर्याचे लोढणे त्याने बरोबर बाळगले नसावे. विचित्रवीर्यामध्ये काहीतरी जन्मदोष असावा व त्यामुळे त्याला सुखासुखी योग्य भार्या मिळण्यात अडचण पडेल असे दिसल्यामुळेच असा आडमार्ग भीष्माला पत्करावा लागला असावा. ठरवलेल्या बेताप्रमाणे भीष्माने केले. सर्व चिडलेल्या राजांशी यशस्वी सामना केला. एकट्या शाल्वाने अंबेला सोडवण्यासाठी निकराचे युद्ध केले पण त्याचाहि निभाव लागला नाही. मात्र भीष्माने त्याला न मारतां जिवंत सोडले. या प्रसंगात भीष्माने शौर्य प्रगट केले. शाल्व हेहि एक कुळ असावे व त्यातील पुरुषांना शाल्व म्हणत असावे कारण पुढे खूप दीर्घ काळानंतर, कृष्ण व शाल्व यांचे वैर व युद्ध झाले. तेव्हा तो शाल्व हा या कथेतील शाल्वाचा वंशज असला पाहिजे. अंबेच्या इच्छेप्रमाणे भीष्माने तिला शाल्वाकडे पाठवले पण त्याने तिला स्वीकारले नाही. ती भीष्माकडे परत आली व ‘तुम्ही माझा हात धरलात म्हणून शाल्व मला स्वीकारीत नाही तेव्हा आता तुम्हीच माझा स्वीकार करा’ असे विनवले पण भीष्मानेहि प्रतिज्ञेमुळे तिला स्वीकारले नाहीच. तिची परवड झाली. अंबेने परशुरामाकडे तक्रार नेली आणि तिच्या वतीने खुद्द परशुरामाने आव्हान दिल्यामुळे त्याच्याशी झालेल्या युद्धात परशुरामालाही भीष्माने दाद दिली नाही. परशुरामाने अंबेला सांगितले कीं ’तुझ्यासाठी मी आणखी काही करूं शकत नाहीं, तुझे तूं पहा!’ या युद्धानंतर भारतीय युद्धापर्यंत एकाही प्रसंगात भीष्माचे शौर्य विशेषत्वाने प्रगट झालेले नाही! कौरव राज्याच्या वतीने त्याने अश्वमेध वगैरे केला नाही वा कोणा राजाचे पारिपत्य करून राज्य विस्तारहि केलेला नाही.