आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Monday, July 18, 2011

महाभारताबद्दल काही गैरसमजुती - भाग ५

नरो वा कुंजरो वा।
हे आपण बाळपणापासून ऐकत आलो. असे खोटे वाक्य बोलल्यामुळे चार बोटे अधांतरी चालणारा युधिष्ठिराचा रथ पंक्चर होऊन जमिनीवर टेकला अशीहि हरदासी कथा आपण ऐकत आलो. पण महाभारतात असे वाक्यच नाही!
हा उलगडा मलाहि हल्लीच वाचलेल्या श्री. जातेगांवकर यांच्या एका पुस्तकावरून झाला.
भीष्मपतनानंतर द्रोण सेनापति झाला व चौथ्या दिवशी जयद्रथवध झाल्यावर पांचव्या दिवशी द्रोण फार त्वेषाने युद्ध करू लागला व त्या दिवशी पांडव व पांचाल यांचा विध्वंस त्याने आरंभला. तो कोणालाच, अर्जुनाला देखील आवरेना. कृष्णाने अखेर पांडवांना सावध केले कीं असेच युद्ध चालले तर दिवस अखेर तुम्ही पूर्ण नष्ट व्हाल. तेव्हां काहीहि करून याला युद्धत्याग करण्यास उद्युक्त केले पाहिजे. कृष्ण व भीमाने एक कुटिल बेत ठरवला. भीमाने प्रथम एक अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला आणि द्रोणापाशी जाऊन ’अश्वत्थामा हत:’ असे पुन्हापुन्हा त्याला म्हणाला! आपला पुत्र मारला गेला यावर द्रोणाचा विश्वासच बसेना पण पुन्हापुन्हा ऐकल्यावर खात्री करून घेण्यासाठी तो युधिष्ठिरापाशी आला. असे होईल याची कल्पना असल्यामुळे कृष्ण व भीम यानी युधिष्ठिराला विनवले होते कीं ‘तूं होय म्हण!’ भीमाने त्याला सांगितले कीं मी अश्वत्थामा हत्ती खरोखरीच मारला आहे. असत्य बोलण्यास युधिष्ठिर सहजीं तयार होणेच शक्य नाही याची कृष्ण व भीमाला भीति होती. पण हत्ती कां होईना, अश्वत्थामा मारला गेला आहे या आधारावर युधिष्ठिराने मनाशी तडजोड केली आणि द्रोणाने जेव्हां विचारले कीं ’किं अश्वत्थामा हत:? ’, तेव्हा जबाब दिला ’हत:, कुंजर:’ ! जबाब देताना कुंजर: हा शब्द हळू व तोंड चुकवून उच्चारला जेणेकरून तो द्रोणाला ऐकू जाऊ नये!
द्रोणाला युधिष्ठिराचा ’हत:’ एवढाच शब्द ऐकू गेला व त्याचे मनोधैर्य खचले. काही काळाने त्याने धनुष्य खाली ठेवले आणि मग त्याचा वध झाला. कृष्ण-भीमाचा हेतू साध्य झाला पण खोटे बोलल्याचा डाग युधिष्ठिराला लागला नाहीं! कारण ‘हत:, कुंजर:’ हे सत्यच होते! त्याने ‘नरो वा कुंजरो वा’ म्हटले असते तर ते मात्र असत्य भाषण ठरले असते कारण युधिष्ठिराला नर अश्वत्थामा मारला गेलेला नाहीं हे पक्के ठाऊक होते! कृष्ण आणि भीम खरे हुशार म्हटले पाहिजेत. आपल्याला पाहिजे ते त्यांनी युधिष्ठिराकडून बरोबर वदवून घेतले! आपण मात्र अजूनही ‘नरो वा कुंजरो वा’ म्हणत असतो! पण तो गैरसमजच!

Wednesday, July 13, 2011

महाभारताबद्दल काही गैरसमजुती - भाग ४

धृतराष्ट्राला युद्धदर्शन
कौरव-पांडव युद्ध सुरू होण्यापूर्वी धृतराष्ट्राला, आपल्याला युद्धवार्ता कशा कळतील असे वाटत होते. संजयाला दिव्य दृष्टि देऊन कृष्णाने त्याला धृतराष्ट्राशेजारीच बसून सर्व युद्ध पाहता येईल असे केले व मग संजयाने ’आंखों देखा हाल’ धृतराष्ट्राला रोजच्या रोज सांगितला अशी समजूत असते. कृष्णाने कौरवदरबारात विश्वरूपदर्शन घडवले तेव्हां धृतराष्ट्राला व गांधारीला ते दिसावे म्हणून दिव्य दृष्टि दिली होती (खरेखोटे देव जाणे) त्यामुळे अशी समजूत होते.
प्रत्यक्षात दिव्यदृष्टि व्यासानी दिली होती आणि धृतराष्ट्राला नव्हे तर संजयाला दिली होती असे महाभारतात म्हटले आहे. मात्र १८ दिवसांच्या युद्धवर्णनांत काही वेळा संजय स्वत: युद्धभूमीवर होता असा स्पष्ट उल्लेख आहे. युद्धवर्णनहि १८ दिवसांचे अलगअलग नसून चार सरळ भागात आहे. पहिला भाग भीष्मपतनापर्यंतच्या दहा दिवसांचा, मग दुसरा भाग द्रोणवधापर्यंतच्या पांच दिवसांचा, तिसरा भाग कर्णवधापर्यंतच्या दोन दिवसांचा व अखेरचा भाग शेवटच्या दिवशी शल्यवध व दुर्योधन-भीम गदायुद्ध झाले तोपर्यंतचा असे चार भागात युद्धवर्णन संजयाने धृत्रराष्ट्राला ऐकवलेले आहे.
संजयाचे वर्णन तो स्वत: सर्व घटना पाहत असल्याप्रमाणे आहे. दिव्यदृष्टि वगैरे अद्भुत कल्पना सोडून दिल्या तर असे मानावे लागते कीं हल्ली युद्धात जसे वार्ताहराना वा टी. व्ही. ला वा रेड-क्रॉसला संरक्षण असते तसे संजयाला असावे व त्यामुळे त्याला युद्धभूमीवर सर्वत्र फिरतां येत होते व घटना पाहतां येत होत्या. त्यामुळे त्याचे वर्णन प्रत्यक्षदर्शी झाले आहे. चार महत्वाच्या टप्प्यांवर युद्धभूमि सोडून धृतराष्ट्रापाशी परतून त्याने झालेल्या घटना वर्णिल्या आहेत. तेव्हा दिव्यदृष्टि ही एक गैरसमजूतच!

Wednesday, July 6, 2011

महाभारताबद्दल काही गैरसमजुती - भाग 3

भारतीय युद्धाचे वेळीं अभिमन्यु काय वयाचा होता?
हा प्रश्न विचारला असतां महाभारताशी कमीजास्त परिचय असलेल्या बहुतेकांचे उत्तर १७-१८ वर्षांचा नवतरुण होता असें येईल. पण हें बरोबर आहे का?
थोडासा विचार केला तर लक्षात येईल कीं हें शक्य नाहीं. पहा बरें! अभिमन्यूच्या जन्मानंतरच द्रौपदीच्या पांच पुत्रांचा जन्म झाला असें महाभारतच म्हणते. अर्थातच द्रौपदीचा सर्वात लहान पुत्र (सहदेवाचा) अभिमन्यूपेक्षा ७-८ वर्षांनी तरी नक्कीच लहान होता. राजसूय यज्ञाचे वेळी द्रौपदी अगदीच लेकुरवाळी होती असें महाभारत म्हणत नाही, म्हणजे हा पुत्र २-३ वर्षांचा तरी झाला होता असे मानणे भाग आहे म्हणजे अभिमन्यु निदान १० वर्षांचा झालेला होता! राजसूय यज्ञानंतर काही महिन्यांचा काळ दुर्योधनाचे व शकुनीचे कुटिल बेत ठरून व धृतराष्ट्राची त्याला मान्यता मिळण्यात गेला. मग द्यूत झाले आणि त्यानंतर १२ वर्षे वनवास व १ वर्ष अज्ञातवासात गेले. अर्जुन प्रगट झाला तेव्हा ग्रीष्म ऋतु चालू होता असे भीष्माने स्पष्ट म्हटलेले आहे. त्यानंतर कार्तिक अमावास्येपर्यंतचा काळ - सहा महिने - कृष्णशिष्टाईपर्यंत व युद्धाला सुरवात होईपर्यंत गेला. तेव्हा युद्धाचे वेळी अभिमन्यु कमीतकमी २४ वर्षांचा नक्कीच झाला होता. द्रौपदीचे सर्व पुत्र युद्धात लढले होते व शेवटच्या दिवशी अश्वत्थाम्याकडून मारले गेले. त्या सर्वाना भीष्माने रथी ठरवले होते. द्रौपदीचा सर्वात लहान पुत्र युद्धात सक्रीय भाग घेत होता तेव्हां तो १७-१८ वर्षांचा तरी असला पाहिजे हेहि अभिमन्यूच्या वयाशी व दोघांच्या वयातील फरकाशी जुळते. अज्ञातवासात विराटाची कन्या अर्जुनापाशी नृत्य शिकत होती व ती लहान होती असा उल्लेख असल्यामुळे (तिने आपला भाऊ उत्तर याला कौरवांची उची वस्त्रे मला बाहुल्या करण्यासाठी घेऊन ये असे म्हटले होते व अर्जुनाने कौरववीरांचा पराभव केल्यावर उत्तराकडून तसे करून घेतले)आणि तिचा अभिमन्युशी अज्ञातवास संपल्यावर लगेचच विवाह झाला तेव्हा तोही नवतरुण - १८ वर्षांचा - होता असा गैरसमज आपण करून घेतो! पण तो गैरसमजच! प्रत्यक्षात द्रौपदीचा सर्वात लहान पुत्र १७-१८ वर्षांचा व अभिमन्यु २४-२५ वर्षांचा होता हे खरे!

Sunday, July 3, 2011

महाभारताबद्दल काही गैरसमजुती - भाग २

‘दैवायत्तं कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम्’
कर्णाच्या तोंडचे हे वाक्य फार प्रसिद्ध आहे. उत्तम कुलात जन्म न लाभलेल्या पण असाधारण कर्तबगारी अंगी असलेल्या अनेक व्यक्तीना या वाक्याने स्फूर्ती दिली असेल. ही उक्ती महाभारतात असणार अशी आपली ठाम समजूत असते. मात्र महाभारतात शोधू गेले असता हे वाक्य सापडत नाहीं!
हे महाभारतातील वचन नाहीच मग सापडणार कसे? ‘वेणीसंहार’ नावाच्या संस्कृत नाटकात कर्ण आणि अश्वत्थामा यांच्या कलहाचा एक जोरदार प्रवेश आहे. त्यात अश्व्त्थाम्याने कर्णाला सूतपुत्र म्हणून हिणवल्यावर कर्णाने त्याला हे प्रत्युत्तर दिले आहे. पूर्ण श्लोक असा आहे –
सूतोSवा सूतपुत्रोSवा यो वा को वा भवाम्यहम् |
दैवायत्तम् कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम् ||