आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Tuesday, March 3, 2009

स्फुट प्रकरणे - भाग ६

रुरु आणि प्रमद्वरा
महाभारताच्या आदिपर्वात सुरवातीला भृगुऋषींच्या कुळातील अनेक व्यक्तींच्या कथा आहेत. त्यांतील एक पुरुष म्हणजे रुरु. भृगूचा पुत्र च्यवन, त्याचा पुत्र प्रमति व त्याला घृताची नावाच्या अप्सरेपासून झालेला पुत्र म्हणजे रुरु. रुरुचा पुत्र शुनक व नातू शौनकऋषि. हा ऋषि व त्याचे सहकारी यांनी एक द्वादशवर्षीय यज्ञसत्र केले. त्या सत्रासाठी जमलेल्या अनेक ऋषिमुनींना, संध्याकाळच्या वेळी, सूत लोमहर्षण याचा पुत्र, सौति नावाचा पुराणिक, मनोरंजनासाठी अनेक कथा सांगत असे. पूर्वी व्यासांनी परीक्षितपुत्र जनमेजयाला त्याच्या पूर्वजांच्या कथा सांगितल्या होत्या. तो मूळ ’जय’ग्रंथ. (परीक्षित हा पांडवांचा नातू अभिमन्यूचा पुत्र. आपला मृत्यु समीप आल्यावर त्याला युधिष्ठिराने हस्तिनापुराच्या राज्यावर स्थापित केले होते.) त्या ’जय’ ग्रंथांतिल कथा सौतीने खूप विस्ताराने सांगितल्या व ’जय’चे महाभारत झाले. असा रुरूचा महाभारताशी दूरचा संबंध आहे.
रुरुला शुनक हा पुत्र प्रमद्वरा या त्याच्या पत्नीपासून झाला. रुरु आणि प्रमद्वरा यांची कथा ही एक प्रेमकहाणीच आहे.
विश्वावसु नावाच्या गंधर्वराजापासून मेनका अप्सरेला प्रमद्वरा ही कन्या झाली. मात्र जन्मत:च मेनकेने तिला स्थूलकेश नावाच्या ऋषीच्या आश्रमाजवळ नदीकाठी ठेवून दिले व ती ’निर्घृण व निर्लज्ज स्त्री’ (महाभारतकारांचे वर्णन) खुशाल चालती झाली. तीच ही मेनका, जिने शकुंतलेला असेच जन्मत:च कण्वमुनींच्या आश्रमापाशी सोडून दिले होते! यावेळींहि तिच्या कन्येला स्थूलकेश ऋषींनी उचलले व तिचा सांभाळ केला व लहानाची मोठी केली. ती रूपवान व गुणवान असल्यामुळे तिचे प्रमद्वरा असे नाव पडले.
रुरु हा एक विद्वान ऋषि होता. एकदा प्रमद्वरा काही कारणाने रुरूच्या नजरेला पडली व त्याचे तिच्यावर प्रेमच जडले. त्याने मित्रांतर्फे ही गोष्ट वडिलांच्या कानावर घातली. त्यांनी स्थूलकेशाकडे प्रमद्वरेसाठी रीतसर मागणी घातली व ती मान्य होऊन रुरु व प्रमद्वरा यांचा विवाह ठरला. मात्र विवाह होण्यापूर्वी काही दिवस आधी, प्रमद्वरा मैत्रिणींसह क्रीडा करत असताना चुकून तिचा पाय एका झोपलेल्या भुजंगावर पडला. त्याने तिला दंश केला व ती कोसळली. अनेक ऋषि व रुरु जमा झाले पण ती गतप्राणच झाली. सर्वजण शोकमग्न झाले. रुरु एकटाच वनात जाऊन आक्रोश करत बसला. तिची आठवण काढून तो स्वत:शी म्हणत राहिला कीं माझ्या हातून जर तपश्चर्या, दान व गुरुसेवा घडली असेल तर माझी प्रिया जिवंत होवो. बराच काळ त्याने असा विलाप केल्यावर एक देवदूत आला व त्याला समजावूं लागला कीं ’हिचे आयुष्यच संपले आहे त्याला काय करणार? तुझे आयुष्य तूं तिला देतोस काय?’ रुरूने म्हटले कीं ’माझ्या उरलेल्या आयुष्यातील अर्धे आयुष्य तिला मिळो व ती जिवंत होवो’ (सर्व आयुष्य देऊन काय उपयोग कारण मग रुरुच मरून जाणार!) मग तो देवदूत व गंधर्वांचा राजा यमधर्माकडे गेले व त्यांनी रुरूसाठी रदबदली केली. यमानेहि ते मान्य केले. रुरूच्या उरलेल्या दीर्घ आयुष्यातील अर्धे प्रमद्वरेला मिळाले व ती जिवंत झाली! मग रुरु आणि प्रमद्वरेचा विवाह झाला.
मात्र रुरूने सर्पांचा दीर्घद्वेष धरला व हातात दंड घेऊन, सापडेल त्या सर्पाला तो मारीत सुटला. एकदां एका निर्विष सर्पालाही तो मारूं पहात असताना त्या सर्पाने त्याला उपदेश केला कीं ’अशा तर्‍हेचे आचरण तुला ब्राह्मणाला शोभत नाही. तूं हे सोड. पूर्वी राजा जनमेजयाने पिता परीक्षित याचा मृत्यु तक्षक नागाच्या दंशामुळे झाला या रागापोटीं सर्पयज्ञ केला व अनेक सर्प यज्ञाग्नीत जळाले. सर्पकुल नष्ट होण्याची वेळ आली होती तेव्हां आस्तीक या ब्राह्मण ऋषीनेच त्याला थांबवले होते व सर्पकुल वांचवले होते. तसे वागणे हेच तुला शोभेल.’ त्याचे म्हणणे मानून रुरूने सर्प मारणे बंद केले. अशी ही रुरु-प्रमद्वरा यांची प्रेमकहाणी.

11 comments:

Anonymous said...

महाभारतातल्या अर्जुन-श्रीकृष्ण या विषयावर खूप काही लिहिलं गेलं.. एक खूप mature तत्त्वद्न्यान त्या कालात सांगितलं गेलं की जेव्हा पृथ्वीवर इतर ठिकाणी लोक कमरेला पानं लावून दगडाने प्राणी मारून खात होते.. महाभारत खरंच घडलं की ती एक महाकादंबरी होती याविषयी माझ्या मनात कायमच शंका राहील..

लोक म्हणतात की स्थळांचे, शहरांचे संदर्भ त्यात सापडतात.. पण ते तर नव्या कादंबर्यान्मधे ही सापडतात..

जसा फास्टर फेणे नावाचा बालवीर (भा.रा. भागवतांचा मानसपुत्र) पुणे या शहरात होता आणि पुण्यातल्या स्थळांच्या बारीकसारीक वर्णनांसहित त्याच्या कथा अजून ३००० वर्षांनी सापडतील ही (एखाद्या प्रलायानंतर)..

ते थोडावेळ बाजूला ठेवू.. मागे तेंडुलकरांनी (बहुधा) एक मुद्दा मांडला होता.. त्यांनी मांडला असो नसो..मला असं वाटतं.. की अर्जुनाचं म्हणणं फार invalid नव्हतं असं म्हणून विचार केला तर.. I mean.. त्याचं म्हणणं युद्धाच्या विरोधात जात होतं.. त्याला समोर ज्येष्ठ लोक दिसत होते.. आता त्याने कच खाल्ली तर सगळा बनाबनाया डाव किंवा सीन उलटणार होता...

तेव्हा केलेला उपदेश आणि मन वळवणं यात तत्त्वद्न्यान जास्त की manipulation आणि brainwash जास्त ??

सोयीचा उपाय ज्याला म्हणतात तो गळी उतरवणं? .. चर्चा करायला वेळ नाही म्हणून.. युद्ध्स्व .. ??!!

माफ़ करा जर काही चुकीचं बोललो असें तर..

माफ़ करा जर काही चुकीचं बोललो असें तर..

Priyabhashini said...

नाग हे एखादे कुळ होते का? प्राचीन काळात सतत या नागांशी वैर धरल्याचे दिसते. कालियामर्दनापासून, खांडववन*, सर्पसत्र अशा अनेक प्रकरणांतून नागांना नेस्तनाबूत केल्याचे दिसते.

* खांडववनाचा संदर्भ आत्ता हाताशी नाही पण त्यातही नाग होते असे वाटते. चू. भू. द्या. घ्या.

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

महाभारत हा पूर्णपणे कल्पनेचा खेळ निश्चितच नाही. त्यात इतिहास किती हा विद्वानांचा विषय आहे.
नाग हा मानवांचाच वेगळा वंश असला पाहिजे. त्यांच्यात व आर्यांच्यांत संवाद होत होते, विचार वादविवाद मैत्री व वैर सर्व प्रकार आढळतात. यापलिकडे हाहि विषय विद्वानांचाच.
माझी ती पातळी नाही.

Unknown said...

अच्छी ब्लॉग हे / मराठी मे टाइपिंग कर ने केलिए आप कौनसी टाइपिंग टूल यूज़ करते हे...? रीसेंट्ली मैने यूज़र फ्रेंड्ली इंडियन लणगौगे टाइपिंग टूल केलिए सर्च कर रहा ता तो मूज़े मिला.. " क्विलपॅड ". आप भी . क्विलपॅड ' www.quillpad.in यूज़ करते हे क्या...?

ओहित म्हणे said...

महाभारत आणि ते सत्य की काल्पनीक ही नेहमीचीच आवडती चर्चा. असो. मजा आली वाचून.

मला गाढ विश्वास आहे की महाभारत, रामायण किंवा तशा ग्रंथामधे बऱ्याच नव्या (आपल्यासाठी नव्या) कल्पना किंवा बरीच उत्तरं आहेत. येणाऱ्या वर्षात शास्त्र आणि नवे शोध काय काय दाखवणार आहेत हा विचार केला की तो मला या ग्रंथापर्यंत आणतो. पण बऱ्याचदा याची सांगता डिबेटस मधे होते.

याही कथेमधे, एक नादखुळा कल्पना आहे. रुरु आपले अर्धे आयुष्य प्रमद्वरेला देतो!! बासच. वेडा झालो वाचून मी. म्हणजे अयुष्य सर्वानी वाटून वगैरे वापरू. काय सही आहे हे!

सध्या आपण रक्तदान वगैरे करतो. तसे उद्या आयुष्यदान करू. थोडेसे.

फडणीस काका, तुमचा ब्लॉग म्हणजे माझ्यासाठी मेजवानी असणार आहे असे दिसतय!

Asha Joglekar said...

खूपच माहिती पूर्ण ब्लॉग. रुरु अन प्रमद्वरे ची ही कथा प्रथमच वाचली. महाभारत हा इतिहासच असावा कारण एखादंच शहर किंवा प्रदेश नाहीतर भारताच्या आजूबाजू चे ही बरेच भागांचा संदर्भ येतो. आपल्याकडे लेखी पुरावे नसल्याने हा वाद नेहेमीच उद्भवत राहाणार पण समुद्रात बुडालेली द्वारका व तिच्यातले आर्टिफेक्टस् सत्यता असल्याचीच शक्यता दर्शवतात.

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

या ब्लॉगवर लेखन बर्‍याच दिवसांपूर्वी बंद केले तरी अजूनहि वाचला जातो आहे आणि वाचणारांना आनंद देतो आहे याचा मला फार आनंद आहे. आता मी अमेरिकेत असल्यामुळे महाभारत हाताशी नाही त्यामुळे नवीन काही पाहून लिहिण्याची सोय नाही. पुढे पाहूं.

Unknown said...

Namaskar Kaka,

Aapna akdhi parat yet aahat, Mala khup kahi janun ghenyachi ichcha ahe.

Thnaks & Regards,

Eknath
9619490771

vaibhav sant said...

परशुरामबद्दल विचारायचे आहे? परशुराम हे रामायण काळातले का महाभारत काळातले ?

vaibhav sant said...

प्रथम post करत आहे . चुकीचा प्रश्न असेल तर माफ करावे . धन्यवाद .

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

परशुराम हा विष्णूचा रामाच्या आधीचा अवतार. त्याचे प्रमुख अवतार कार्य रामाच्या आधीच्या काळातले. रामायणात जेव्हा रामाने शिवधनुष्य तोडले तेव्हां परशुराम प्रथम प्रवेश करतो. शिवधनुष्याच्या जोडीचे विष्णूचे धनुष्य देऊन हे सज्ज करून दाखव असे आव्हान देतो. या प्रसंगाचे वर्णन व माझे विचार माझ्या रामायणावरील ब्लॉगवर वाचावयास मिळतील. महाभारतांत तो भीष्माचा व कर्णाचा गुरु आहे. अंबेच्या वतीने त्याने भीष्माशी युद्ध केले पण त्याला विजय मिळाला नाही. येवढे दीर्घायुष्य त्याला मिळाले आणि तो चिरंजीवहि मानलेला आहे. ब्राह्मणातील क्षात्रवृत्तीचे तो प्रतीक आहे असे मला वाटते. कोकण प्रांत वसवण्याचे श्रेय त्याला दिले जाते व चित्पावन जातीच्या ब्राह्मणांचे तो कुलदैवत व पूजनीय आहे. त्याचे एक देवालय चिपळूण येथे आहे. इतरत्र असल्याचे ऐकिवांत नाही.