आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!

Last Seven Days

माझी थोडी ओळख

My photo
San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen

Sunday, August 31, 2008

जयद्रथवध - भाग ६

सर्व संरक्षकाना वारंवार हरवून व सैन्यसंहार करून अखेर अर्जुनाने जयद्रथाला गाठलेच. त्याने जयद्रथाचा सारथी मारला व ध्वज तोडला. तोंवर पुन्हा संरक्षकानी त्याला मध्ये घेऊन अर्जुनाला अडवले. अर्जुनाने कृप, कर्ण, शल्य, दुर्योधन या सर्वांवर बाणवृष्टि करून व जखमी करून पुन्हा जयद्रथाला गाठले. अखेर सर्व संरक्षकाना दाद न देतां त्याने जयद्रथाला ठार केले. हा वेळ पर्यंत संध्याकाळ झाली होती व सूर्य आहे कीं अस्ताला गेला हे कळत नव्हते. मात्र कृष्णाने अर्जुनाला बजावून सांगितले होते की तूं सूर्याकडे न पाहातां जयद्रथ तावडीत सापडला कीं त्याला मार. त्याप्रमाणे अर्जुनाने जयद्रथवध केल्यावर नंतर पुन्हा सूर्य स्पष्ट दिसूं लागला. त्यामुळे अर्जुनाने आपली प्रतिज्ञा पूर्ण केली याबद्दल शंकेला जागाच उरली नाही. त्यानंतरही प्रत्यक्ष सूर्यास्त होईपर्यंत अर्जुन विरुद्ध कृप/अश्व्त्थामा व सात्यकी विरुद्ध कर्ण अशी युद्धे काही काळ चालूच राहिलीं.
सूर्य काही काळ स्पष्ट न दिसणे व नंतर पुन्हा दिसू लागणे या नैसर्गिक घटना आहेत व त्याचे कर्तृत्व कृष्णाला देण्याचे काहीच कारण नाही. कृष्णाने योगमायेने सूर्य काही काळ अदृश्य केला अशी समजूत आहे त्याला काहीहि आधार नाही. महाभारतात तसे म्हटले आहे हे खरे पण तो मजकूर, कृष्णाला देवाचा अवतार मानू लागल्यानंतर, त्याचे महत्व वाढविण्यासाठी, मागाहून घुसडलेला स्प्ष्ट दिसून येतो. ते विशिष्ट श्लोक गाळले तर कोठेहि तुट्कपणा जाणवत नाही. सूर्य दिसत नव्हता असे अर्जुनाने वा कौरवपक्षाच्या कोणीहि म्हटलेले नाही. खुद्द जयद्रथही अखेरपर्यंत शर्थीने लढतच होता पण त्याचा अर्जुनापुढे टिकाव लागला नाही. ’हा सूर्य व हा जयद्रथ’ असे कृष्णाने म्हटले व मग अर्जुनाने समोर असलेल्या बेसावध जयद्रथाला मारले हे मुळीच खरे नाही. ती हरदासी कथाच! सूर्यास्ताला अजून काही काळ बाकी आहे याचा हिशेब कृष्णाने मनाशी बरोबर ठेवला होता व अर्जुनाचे चित्त त्याने विचलित होऊं दिले नाही हे खरे. ’सूर्य अस्ताला जाण्याची वेळ आली आहे तेव्हा आता वेळ न घालवता जयद्रथाला मार’ असे त्याने अखेरच्या क्षणी अर्जुनाला म्हटले व अर्जुनाने लगेच जयद्रथवध केला.
सूर्यास्त झाला व अर्जुनाची प्रतिज्ञा फोल झाली अशा समजुतीने कौरवांकडून जयद्रथाच्या रक्षणाच्या प्रयत्नात शिथिलता आली असे बिलकुल झाले नाही वा तसा दावा वा कांगावाही कौरवांकडील कोणी केला नाही. अखेरपर्यंत अर्जुनाला जोराचा प्रतिकार होतच होता व तो मोडूनच त्याला यश मिळाले. दिवसभर शर्थीचे प्रयत्न करूनहि सगळे संरक्षक अर्जुनापुढे टिकले नाहीत हेंच खरे. अर्जुनाचा स्वबळावरचा विश्वास सार्थ ठरला व कृष्णावर स्वत:ची प्रतिज्ञा मोडून युद्धात उतरण्याची वेळ आली नाही. अर्जुनाने दिवसभर केलेल्या शर्थीच्या प्रयत्नाचे यश कृष्णाच्या पदरात घालण्याचे काहीच कारण नाही. त्याने दिवसभर उत्तम सारथ्य करून अर्जुनाला जयद्रथापर्यंत नेले हे त्याचे कार्य थोडे नव्हे! कृष्णाची खरी थोरवी, त्याने डोळसपणे जो, वेळ आली तर, युद्धात स्वत: उतरण्याचा निर्णय घेतला होता व सारथी दारुकाला दिवसभर आपल्या मागे रहावयास सांगितले होते, त्यात आहे. रथ तयारच होता व अखेरच्या पर्वात त्याचा उपयोग रथहीन झालेल्या सात्यकीला झाला.
जयद्रथवधामुळे दुर्योधन फार नाउमेद झाला. या एका दिवसात, अर्जुन, सात्यकी व भीम यानी सात अक्षौहिणी सैन्य मारले. (अ. १५०, श्लोक १४-१६) यातील अतिशयोक्ति सोडली तरी कौरवांचे सैन्यबळ हटले हे खरे. दुर्योधनाची खात्री पटली कीं आपल्या पक्षातील कोणीहि वीर अर्जुनाच्या तोडीचा नाही. दिवसभरात भीमाने व सात्यकीनेहि वारंवार कर्णाला हारविले त्यामुळे दुर्योधनाचा त्याच्यावरील विश्वासहि डळमळू लागला. यापुढील युद्धात द्रोण व कर्ण यानीहि पांडवसैन्य मोठ्या प्रमाणावर मारले पण सुरवातील ११ विरुद्ध ७ असे असलेले विषम प्रमाण या दिवशी जे उलट झाले व ते पुढे कायमच कौरवाना प्रतिकूल राहिले.
युधिष्ठिराने जिवाची पर्वा न करतां सात्यकी व भीम यांना अर्जुनाच्या मदतीला पाठवले तेहि निर्णायक क्षण होते. द्रोणानेहि कबुली दिली कीं दिवसभर अर्जुन आणि बराच काळ सात्यकी व भीम नसूनहि त्याला धृष्टद्युम्न व इतर पांचालांचा निर्णायक पराभव करता आला नाही व युधिष्ठिराला पकडता आले नाही. ’आता आपली धृष्टद्युम्नापासून सुटका नाही’ असे द्रोणाने म्हटले. (अ. १५१ श्लोक २४-२६). जयद्रथाला वाचवणे व युधिष्ठिराला पकडणे हे या दिवसाचे दोनही युद्धहेतु विफल झाले.
अशा प्रकारे कौरवांनी केलेला अभिमन्यूचा वध त्याना फार महागात पडला. एक दिवस अर्जुनाला अडवून धरले व जयद्रथाला वाचवले तर विजय आपलाच आहे अशी त्याना वाटलेली आशा फोल ठरली व येथून पुढे हे युद्ध पूर्णपणे त्यांचेविरुद्ध गेले.
एक काल्पनिक प्रश्न असा की दुर्दैवाने सूर्य अस्ताला जाईपर्यंत जयद्रथवध झाला नसता तर काय झाले असते? माझ्या मते, कृष्णाने अर्जुनाला ताबडतोब अग्निकाष्ठे भक्षण करू दिली नसतीं. ’तुझे युद्ध तू पूर्ण कर, सर्व कौरवांचा संहार तूं व भीम पुरा करा व मग पाहूं’ असा निर्वाणीचा सल्ला दिला असता व अर्जुनाने ऐकलेच नसते तर मात्र त्याची जागा स्वत: नक्कीच घेतली असती पण कौरवांना विजयी होऊ दिले नसते! त्याच्या प्रतिमेशी हे सुसंगत आहे.
हा विषय आता संपला. नवीन विषय पुढील लेखापासून सुरू होईल. वाचत रहा. धन्यवाद.

Thursday, August 28, 2008

जयद्रथवध - भाग ५

अर्जुनाचे व दुर्योधनाचे युद्ध सुरू झाले. अर्जुनाचे बाण लागूनहि दुर्योधनाला इजा होत नाही हे पाहून कृष्ण चकित झाला. तुझ्या हातातील बळ संपले की काय असे त्याने अर्जुनाला खिजविले! द्रोणाने दुर्योधनाला बांधलेले मंत्रकवच ओळखून अर्जुन कृष्णाला म्हणाला की ही विद्या द्रोणाने मला एकट्यालाच शिकवली आहे व कवचाचा भंग करणेहि शिकवले आहे! त्याप्रमाणे कवचभंगासाठी त्याने केलेला अस्त्रप्रयोग मात्र अश्वत्थाम्याने दुरूनच दुसरे अस्त्र सोडून निष्फळ केला. आतां त्याच अस्त्राचा पुन्हा प्रयोगहि करता येणार नव्हता! त्यामुळे निर्भय झालेल्या दुर्योधनाने जोरदार शरवृष्टि सुरू केली तेव्हा राग येऊन अर्जुनाने त्याचा रथ, सारथी, घोडे यांचा नाश केला व त्याच्या तळहातांवर व नखांवर बाण मारले. हे भाग कवचाने संरक्षित नसल्याने भयंकर इजा होऊन दुर्योधनाने पळ काढला! आकस्मिक आलेल्या अडचणीला अर्जुनाने कौशल्याने तोंड दिले. यानंतर अर्जुनाचीं सहा संरक्षक वीरांशी वारंवार युद्धे झाली.
द्रोणाशी सामना करताना युधिष्ठिराला कृष्णाच्या पांचजन्याचा सारखा आवाज येत होता पण अर्जुनाच्या गांडीव धनुष्याचा येईना त्यामुळे अर्जुनाच्या सुरक्षिततेची चिंता वाटून त्याने अखेर सात्यकीला ’माझे रक्षण मी कसेही करीन पण तू जा’ असे निक्षून सांगून त्याला अर्जुनाच्या मदतीला पाठवले. युधिष्ठिराच्या रक्षणाची जबाबदारी भीमावर सोपवून सात्यकी निघाला. द्रोण व कृतवर्मा यांचा जोरदार विरोध मोडून काढून सात्यकी सैन्यात घुसला. अनेक वीरांचा व सैन्याचा पुन्हापुन्हा संहार करून शेवटी तो अर्जुनाजवळ पोचला. सात्यकी जाऊनहि बराच वेळ झाला तरीहि अर्जुनाची खुशाली कळेना तेव्हा मोठा धोका पत्करून युधिष्ठिराने भीमालाहि अर्जुनाच्या मदतीला पाठवले. नाइलाजाने, युधिष्ठिराच्या संरक्षणाचा भार धृष्टद्युम्नावर सोपवून भीम निघाला. त्यालाहि द्रोणाशी जोरदार सामना करावा लागला. द्रोणाची पर्वा न करता, अनेक वीरांचा व सैन्याचा संहार करीत तोहि अर्जुनापर्यंत पोचला व त्याला खुशाल पाहून भीमाने मोठमोठ्याने गर्जना केल्या. त्या ऐकून अर्जुन व कृष्ण यांनीहि केल्या. त्या ऐकून युधिष्ठिराची खात्री पटली की अर्जुन, सात्यकी व भीम एकत्र व सुखरूप आहेत. ’सात्यकी व भीम सैन्यात घुसले कसे व आता जयद्रथाचे काय होणार’ अशी तक्रार घेऊन दुर्योधन पुन्हा द्रोणापाशी गेला. तेव्हा, ’सात्यकी व भीम आता येथे नाहीत तेव्हा मी आता युधिष्ठिराला पकडण्याचा निकराचा प्रयत्न करतो, तुम्ही सर्वानी अर्जुनाचा प्रतिकार करा’ असे सांगून द्रोणाने त्याला परत पाठवले. आता पुन्हा सैन्यात शिरलेल्या युधामन्यु व उत्तमौजा यांची दुर्योधनाशी गाठ पडली. दुर्योधनाने त्याना हारवले पण त्यानीहि दुर्योधनाला रथहीन केले. भीम व कर्ण यांच्या वारंवार चकमकी झाल्या. भीमाने दरवेळी कर्णाला मार देऊन पळवून लावले. सतरा वेळा त्याचे धनुष्य तोडले. त्याच्या व दुर्योधनाच्या देखतच, त्याच्यावर चालून येणार्‍या अनेक कौरवांचा वध केला. अनेक चकमकींनंतर अखेर कर्णाने भीमाचा पराभव केला व त्याला दुरुत्तरे केली. अखेरपर्यंत भीमाने हार मानली नाहीच वा पळूनहि गेला नाही. त्याने कर्णाला द्वंद्वयुद्धाचे आव्हान दिले. कर्णाचेहि धनुष्य तुटले होतेच. अर्जुन भीमाच्या मदतीला आल्यावर अखेर कर्ण व भीम इतरांच्या रथांवर बसून दूर झाले. अर्जुनाने यावेळी कर्णावर सोडलेला घातक बाण मात्र अश्वत्थाम्याने दुरूनच तोडून टाकला व आपण पळून गेला! कर्ण वांचला. इकडे सात्यकी व भूरिश्रवा यांचे तुंबळ युद्ध होऊन भूरिश्रवा सात्यकीचे केस पकडून त्याचे डोके उडवण्याच्या प्रयत्नात आहे असे कृष्णाने अर्जुनाच्या नजरेला आणले तेव्हा अर्जुनाने दुरूनच बाण सोडून भूरिश्रव्याचा हातच तोडला! नंतर सात्यकीने भूरिश्रव्याला मारले. जयद्रथाच्या रक्षणासाठी नेमलेल्या सहा वीरांपैकी भूरिश्रवा मेला व भीमाने कर्णाला वारंवार हरवून जखमी व नामोहरम केले त्यामुळे अर्जुनाला फार मदत झाली. कर्णाने दुर्योधनाशी कबुली दिली कीं ’भीमाकडून मी आज एवढा मार खाल्ला आहे की युद्धात उभे राहिलेच पाहिजे म्हणून मी नाइलाजाने उभा आहें.’ यानंतर जयद्रथाच्या प्रत्यक्ष वधाचे वर्णन पुढील भागात वाचा.

Sunday, August 24, 2008

जयद्रथवध - भाग ४

युद्ध सुरू झाल्यावर दोन स्पष्ट भाग पडले. कित्येक वीर व प्रचंड सैन्य अर्जुनाचा प्रतिकार करत होते तर दुसरीकडे द्रोणाचा प्रतिकार युधिष्ठिर, सात्यकी, धृष्टद्युम्न व इतर पांचाल वीर करत होते. अर्जुनाने सबंध दिवसभर कित्येक प्रमुख वीरांशी, काहींशी पुन्हापुन्हा, सामना करत व प्रचंड सैन्यसंहार करत जयद्रथाच्या दिशेने प्रगति चालू ठेवली. युधामन्यु व उत्तमौजा या दोन पांचाल राजपुत्रांकडे अर्जुनाचा रथ रक्षण्याचे काम होते. मात्र सुरवातीलाच, कृतवर्म्याने त्यांना अडवून धरले. अर्जुन पुढे निघून गेला. त्यानंतर दिवसभर त्याना अर्जुनाला गाठता आले नाही. सगळ्या कौरवसैन्याला वळसा घालून दिवस अखेरीला ते पाठीकडून अर्जुनापाशी पोचले.
द्रोणाला बाणांनीच वंदन करून व कृतवर्म्याला हारवून अर्जुन एकटाच सैन्यात घुसल्यावर, दिवसभर अनेकानी त्याला अडवले. अनेकाना त्याने मारले. सर्वांची यादी देत बसण्यात अर्थ नाही. दुर्योधन द्रोणापाशी जाऊन तक्रार करू लागला की तुम्हाला ओलांडून अर्जुन पुढे कसा गेला? तुम्ही वचन दिले नसते तर मी जयद्र्थाला परत जाऊं दिले असते. आता त्याचे रक्षण कसे करावे याची सर्वाना चिंता वाटते आहे. द्रोणाने उत्तर दिले की कृष्णाने रथ एवढ्या वेगाने नेला की माझे बाण त्याच्यापर्यंत पोचेनात. आता तो गेलाच आहे व समोर युधिष्ठिर आहे तर त्याला पकडण्याचा मी यत्न करतो. तुला मी मंत्र कवच बांधतो. म्हणजे तुला अर्जुनाचे बाण लागणार नाहीत. तूंहि शूरवीर आहेस तेव्हा तू अर्जुनाशी सामना कर. कवच बांधून दुर्योधन अर्जुनाला गाठण्यासाठी गेला. इकडे दिवसभर, अर्जुनाशी सामना करण्यासाठी मोकळे ठेवलेले सहा महावीर सोडून इतर अनेक वीरांनी द्रोणाला युधिष्ठिराला पकडण्यासाठी साह्य केले. युधिष्ठिर, सात्यकी, भीम, धृष्टद्युम्न व इतर पांडव व पांचालवीर यांनी या हल्ल्यांचा भार वाहिला.
अर्जुन हळूहळू जयद्रथाच्या दिशेने प्रगति करीत होता. अवंतीचे महारथी राजे विंद व अनुविंद यानी त्याला अडवले. त्याना अर्जुनाने मारले व त्यांचे सैन्य उधळून लावले. यानंतरची एक अद्भुत घटना म्हणजे, आपल्या घोड्याना विश्रांति व सेवा हवी आहे असे पाहून अर्जुन रथातून खाली उतरून फक्त एका धनुष्याने सैन्याचा प्रतिकार करत राहिला व कृष्णाने शांतपणे घोडे सोडून व त्याना खरारा करून, अंगात घुसलेले बाण काढून टाकून व हलकेच फिरवून त्याना परत हुशार केले व पुन्हा रथाला जोडले. अर्जुन व कृष्ण पुन्हा रथावर चढलेले पाहून कौरव योद्धे उदासीन झाले व जयद्रथ आता वाचत नाही असें म्हणू लागले. यावेळी मंत्रकवच बांधलेला दुर्योधन स्वत: अर्जुनाला भिडला. तो वृत्तांत पुढील भागात वाचा.

Wednesday, August 20, 2008

जयद्रथवध भाग - ३

अर्जुनापासून जयद्रथाला एक दिवसभर वांचवण्यासाठी द्रोणाने सर्व कौशल्य पणाला लावून व्यूहरचना केली. सर्व सैन्याच्या व्यूहाच्या मागे दूरवर जयद्रथाला ठेवून त्याच्या रक्षणासाठी खुद्द जयद्रथाचेच मोठे सैन्य ठेवले. शिवाय कर्ण, अश्वत्थामा, शल्य, कृप, भूरिश्रवा, कर्णपुत्र वृषसेन या सहा महावीरांना मोकळे ठेवून त्याना अर्जुनाचा प्रतिकार करण्याचेच काम दिले. मुख्य सैन्याचा चक्रशकट नावाचा व्यूह रचून त्याचे प्रमुखपदी दु:शसन, दुर्मर्ष व विकर्ण याना नेमून व्यूहाच्या अग्रभागी द्रोण स्वत: होता. पाठीमागील कौरव सैन्याचा पद्मव्यूह रचून त्याचे प्रमुखपद कृतवर्म्याकडे दिले होते. हा सर्व व्यूह तोडून व सहा महावीरांचा प्रतिकार मोडून काढल्यावरच अर्जुनाला जयद्रथ दिसणार होता व मग त्याच्याशी अंतिम युद्ध करावयाचे होते! सहा महावीराना मोकळे ठेवण्याचा हेतु त्यानी दिवसभर अर्जुनाला पाळीपाळीने अडवावयाचे असा होता. हा एक Dynamic Defense चा उत्कृष्ट नमुना म्हणता येईल. अर्जुन हा व्यूह तोडण्यात व सहांशी लढण्यात दिवसभर मग्न असताना द्रोणाच्या हाताखालील वीरांचा मुख्य रोख युधिष्ठिरावर राहणार होता. त्याला पकडण्याची या दिवशी चांगली संधि होती. पांडवांनाहि याची जाणीव होती त्यामुळे या दिवशी मात्र व्यूहात शिरण्यापूर्वी अर्जुनाने युधिष्ठिराच्या रक्षणाची जबाबदारी महारथी सात्यकीवर टाकली होती. या दिवशीच्या युद्धाचे फार निर्णायक परिणाम झाले त्याचे वर्णन महाभारतात फार सुंदर व खुलासेवार केले आहे. ते आता पुढील भागात वाचा.

Sunday, August 17, 2008

जयद्रथवध भाग - २

आदल्या दिवशी प्रचंड हानि होऊनहि या दिवशी पुन्हा एकदा त्रिगर्तांनी अर्जुनाला आव्हान दिले व यावेळी मात्र त्याला दिवसभर अडवून ठेवण्यात यशस्वी झाले. सर्व भारतीय युद्धाच्या वर्णनात अर्जुनाच्या अनेक पराक्रमांचे खुलासेवार वर्णन आहे. आदल्या दिवशी त्रिगर्तांचे अर्जुनाने केलेले हाल तसेच खुलासेवार वर्णिले आहेत. या दिवशीचे त्रिगर्त-अर्जुन युद्धवर्णन मात्र अतिशय त्रोटक आहे. हे एक नवल आहे. प्रत्यक्षांत अर्जुन या दिवशी थकव्यामुळे वा जखमांमुळे युद्धापासून दूरच राहिला होता कीं काय अशी मला शंका आहे! दुसरे नवल म्हणजे या दिवशी अर्जुन मुख्य युद्धापासून दूर असूनहि द्रोणाने युधिष्ठिराला पकडण्याचा प्रयत्न केलाच नाही! त्याने सैन्याचा चक्रव्यूह रचला. तो खरेतर बचावात्मक व्यूह होता. आक्रमण करण्यास अत्यंत कठीण असेच त्याचे वर्णन केलेले आहे. तो कसा तोडावा हे अर्जुन सोडून इतर कोणाला माहीत नव्हते. अर्जुनाशिवाय जो कोणी या व्यूहावर आक्रमण करील तो मारला जाईल ही द्रोणाची अपेक्षा असावी. त्यानुसारच त्यांची एकातरी प्रमुख वीराला मारण्याची प्रतिज्ञा होती. मात्र अर्धवट ज्ञानावर अभिमन्यूने प्रयत्न केला व व्यूह तोडल्यावर तो फारच अनावर झाला. एकटा असूनहि दिवसभर त्याने अतुल पराक्रम केला व कौरवसैन्याची अपरिमित हानि झाली. अनेक वीर मारले गेले. दिवस अखेरीला द्रोण, कृप, कर्ण, अश्वत्थामा, बृहत्बल व कृतवर्मा या सर्वांनी एकत्र येऊन त्याला घेरण्यात व त्याचे धनुष्य तोडण्यात यश मिळवले व मग कसाबसा त्याचा वध केला व सुटकेचा निश्वास टाकला! प्रत्यक्ष म्रूत्यु मात्र दु:शासनपुत्राबरोबर गदायुद्ध करताना झाला. व्यूहांत अभिमन्यु एकाकी पडण्याचे कारण असे की त्याने मोकळी करून दिलेल्या वाटेने व्यूहात शिरूं पाहणार्‍या सात्यकी, भीम व इतर पांडव वीरांना जयद्रथाने दिवसभर अडवून ठेवले. महाभारतामध्ये याचा खुलासा, एक दिवस अर्जुन सोडून इतर पांडवांना तू अजिंक्य होशील असा शंकराकडून त्याला वर मिळाला होता असा केला आहे. तेव्हां हा जयद्रथाचा दिवस होता असे म्हणावे लागते. मात्र अभिमन्यूच्या वधात त्याचा प्रत्यक्ष सहभाग मुळीच नव्हता. मृत्युमुखीं पडलेल्या अभिमन्यूला त्याने लाथ मारली अशी एक हरदासी कथा आहे पण त्याला महाभारतात आधार मुळीच नाही. एकूण या दिवसाचे लक्ष्य, युधिष्ठिराला पकडणे असे न राहता अभिमन्यूला मारणे हे ठरले व त्यांत मात्र कौरव यशस्वी झाले. त्याची भयंकर किंमत त्याना दुसरे दिवशी मोजावी लागली!
अभिमन्यूच्या मृत्यूबरोबरच या दिवशीचे युद्ध संपले. अर्जुन परत आल्यावर त्याला झालेला प्रकार समजला. अभिमन्यूला संरक्षण न दिल्याबद्दल त्याने सर्व पांडववीरांना दोष दिला. जयद्र्थाने सर्वांना अडवले असे कळल्यावर झाल्या अनर्थाला जयद्रथच व्यक्तिश: जबाबदार आहे असे ठरवून, उद्यां सूर्यास्तापूर्वी जर मी जयद्रथाला मारले नाही तर मी अग्निकाष्टे भक्षण करीन अशी घोर प्रतिज्ञा अर्जुनाने अचानक केली. पांडवपक्षाला ही प्रतिज्ञा अडचणीत टाकणारी होती. अर्जुनाने कृष्णाशी वा इतर पांडववीरांशी सल्लामसलतही केली नाही. रागाच्या भरात केलेल्या या प्रतिज्ञेचे युद्धावर फार निर्णायक परिणाम झाले. याबद्दल पुढील भागात सविस्तर वाचा!

Thursday, August 14, 2008

जयद्रथवध - भाग १

आजपासून नवीन विषयाला सुरवात करीत आहे. जयद्रथवध हे महाभारत युद्धातील एक अतिशय वेधक असे प्रकरण आहे. सर्व अठरा दिवसांच्या युद्धाचे खुलासेवार वर्णन महाभारतात आहे. त्यातील संख्यात्मक अतिशयोक्ति व अद्भुत असे अस्त्रवापराचे वर्णन सोडून दिले तर युद्धहेतु, डावपेच, असेहि बरेच वाचण्यासारखे आहे. जयद्रथवधाच्या दिवशीचे डावपेच, दोन्ही पक्षांच्या प्रमुख योद्ध्यांनी दाखवलेले अतुलनीय धैर्य व कौशल्य, या दिवसाच्या घोर युद्धाचा दोन्ही पक्षांच्या तौलनिक बळांवर झालेला निर्णायक परिणाम, कृष्ण व अर्जुन दोघानीहि अनेक अडचणींवर दिवसभर धैर्याने व युक्तीने मात करून अखेर मिळवलेले यश या सर्वांमुळे हे एक अतिशय रंगतदार युद्धप्रकरण ठरते.
भीष्माच्या आधिपत्याखाली दहा दिवस युद्ध चालले तोवर दोन्ही पक्षांनी थोडाफार संयम राखला होता व अनुचित प्रकार झाले नाहीत. भीष्मपतनानंतर द्रोण सेनापति झाला, तसेच दहा दिवस युद्धापासून अलिप्त राहिलेला कर्णहि युद्धात उतरला. त्यानंतर डावपेचांचे युद्ध सुरू झाले! दुर्योधनाच्या सूचनेवरून द्रोणाने युद्धहेतु ठरवला कीं रणात युधिष्ठिराला पकडावयाचे व पुन्हा द्यूत खेळावयास लावून व हरवून वनांत पाठवावयाचे! युद्ध संपवण्याचा कौरवांनी ठरवलेला तो मार्ग होता. द्रोणाने या हेतूसाठी अट घातली की अर्जुनाला दूर ठेवू शकलात तरच हे जमेल, त्याच्या उपस्थितीत नाही! हा बेत साधला तर पांडवाना मारण्याची गरज उरणार नाही हे जाणून द्रोणाने तो मान्य केला असावा. पांडवपक्षाला हा बेत कळल्यामुळे द्रोण जिवंत असेपर्यंतच्या पांच दिवसांच्या युद्धात त्यांनी या बेताचा निकराने प्रतिकार केला. इंद्राकडून कर्णाला मिळालेली अमोघ शक्ति नष्ट होईपर्यंत कृष्णालाहि त्याचा व अर्जुनाचा निर्णायक युद्धप्रसंग टाळावयाचा होता. युधिष्ठिराला पकडण्याच्या बेताचा दुर्योधनाने बराच गाजावाजा केला होता, त्यामुळे आपला शब्द पाळण्याचे द्रोणावरहि दडपण होते.
द्रोणाच्या आधिपत्याखाली पहिल्या दिवशी (युद्धाच्या अकराव्या दिवशी) दोन्ही पक्षांच्या वीरांची घनघोर युद्धे झाली. अर्जुन उपस्थित असल्यामुळे द्रोणाचा बेत सफळ झाला नाही. दिवस अखेर पांडवांचीच सरशी राहिली. द्रोणानी पुन्हा म्हटले कीं अर्जुनाला इतरत्र गुंतवलेत तरच मला काही करतां येईल. तेव्हा त्रिगर्त देशाचा राजा सुशर्मा व त्याचे भाऊ यानी हे कार्य पत्करले. त्यानी अर्जुनाला अडवण्याची प्रतिज्ञा केली. त्याप्रमाणे बाराव्या दिवशी सुरवातीलाच त्यानी अर्जुनाला आव्हान दिले. युधिष्ठिराच्या रक्षणाचे काम द्रुपदपुत्र सत्यजित याच्यावर सोपवून अर्जुन त्रिगर्तांकडे वळला. या दिवशी अर्जुनाने अद्भुत पराक्रम करून त्रिगर्त सेनेला धूळ चारली. मात्र इकडे द्रोणापुढे मात्रा न चालून सत्यजित मारला गेला. युधिष्ठिराला धृष्टद्युम्न व इतरानी वाचवले. पाठोपाठ राजा भगदत्ताने पांडवांवर जोराचा हल्ला केला व द्रोण बाजूलाच राहून भगदत्तच पांडवाना भारी पडू लागला तेव्हा त्रिगर्तांचा प्रतिकार मोडून काढून अर्जुन परतला व त्याने भगदत्ताला मारले. दिवसभर निकराचे प्रयत्न करूनहि दुर्योधन-द्रोणांचा बेत सफळ झाला नाही. दुर्योधनाने यासाठी द्रोणाला दोष दिला तेव्हा त्याने पुन्हा तेच म्हटले की अर्जुन असताना काही जमत नाही. त्यामुळे तेराव्या दिवसाचा युद्धबेत पुन्हा तोच ठरला की त्रिगर्तानी अर्जुनाला अडवावयाचे. द्रोणाने आश्वासन दिले की हे जमले तर आज मी पाडवपक्षाच्या एकातरी महान वीराला मारीन. युधिष्ठिराला पकडण्याबद्दल मात्र त्याने काही म्हटले नाही. हा दिवस अभिमन्यूचा व जयद्रथाचा ठरला व अभिमन्यु मारला गेल्यामुळे अर्जुनाने जयद्रथवधाची प्रतिज्ञा केली. त्याबद्दल सविस्तर पुढील भागात वाचा.

Sunday, August 10, 2008

वाचकांस विनंति

माझे महाभारतावरील लेखन बरेच लोक आवडीने वाचतात असे दिसते. आपल्या मराठी न जाणणार्‍या मित्रांसाठी मी एक नवीन ब्लॉग इंग्लिश मध्ये सुरू केला आहे. www.mahabharat-newviews.blogspot.com वर तो पहावयास मिळेल. त्यावर पांडवांच्या अज्ञातवासाबद्दल मी लिहिण्यास सुरवात केली आहे. त्याबद्दल आपण आपल्या अ-मराठी मित्रांना माहिती द्यावी ही विनंति. वाचकांचा प्रतिसाद मिळाला तर दोन्ही ब्लॉग चालू ठेवणार आहे मात्र इग्लिश ब्लॉगला फारशा भेटी दिल्या गेल्या नाहीत तर एक विषय पुरा करून तो ब्लॉग बंद करण्याचा विचार आहे. इंग्लिश ब्लॉगची माहिती इंग्लिश वाचकांपर्यंत कशी पोचवावी याबद्दल काही सूचना असल्यास जरूर कळवा. (मराठी ब्लॉगविश्व व ब्लॉगवाणी यांचा मला फायदा मिळाला.)या मराठी ब्लॉगवर पुढील पोस्टपासून नवीन विषयाला सुरवात होईल. वाचत रहा!
प्र. के. फडणीस.

Tuesday, August 5, 2008

कृष्णशिष्टाई - भाग ८

कौरव दरबारातील सर्व प्रयत्न असफल झाल्यावर पांडवांकडे परत जाण्यापूर्वी कृष्णाने दुसरे दिवशी सकाळी कर्णाची एकांतात भेट घेतली. त्यावेळी त्याने कर्णाला तूं कुंतीपुत्र या नात्याने पांडवांचाच वडील भाऊ आहेस असे सांगितले. त्यांचेविरुद्ध तू दुर्योधनाची बाजू घेणे उचित नाही. पांडव सत्य कळल्यावर तुला वडील भावाचा सर्व सन्मान देतील, तू दुर्योधनाची बाजू सोडलीस तर अजूनहि शम होईल व पांडवाना मिळणार्‍या राज्यभागाचा तूच मालक होशील, द्रौपदी ही सर्व पांडवांची पत्नी या नात्याने तुझीहि पत्नी होईल असे सांगून त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्व जन्म सूतपुत्र म्हणून काढल्यावर आता मला यातून काय मिळणार? दुर्योधनाने मला सर्व सन्मान, वैभव दिले आहे. त्याची बाजू अशी आयत्या वेळी मी सोडली तर ती अर्जुनाला भिऊन, असेच सर्व जग म्हणेल व माझी छीथू होईल. आता वेळ गेली आहे व मला असे करणे मुळीच उचित नाही असे म्हणून कृष्णाच्या सूचनेला त्याने स्पष्ट नकार दिला. तेव्हा कृष्णाने नाइलाज होऊन त्याचेजवळ दुर्योधनाला निरोप दिला की आजपासून सात दिवसानी कार्तिक अमावास्या आहे त्या दिवशी कुरुक्षेत्रावर आपली रणांगणावर गाठ पडू द्या. त्यानंतर कृष्ण रथात बसून सरळ उपप्लव्याला पांडवांकडे गेला.दुसरी महत्वाची घटना म्हणजे कृष्ण परत गेला व अमावास्येला युद्ध सुरू करण्याचे ठरले असे कळल्यावर खुद्द कुंतीने भल्या सकाळी सूर्याला अर्घ्य देत असताना कर्णाला गाठून ’तू माझाच पुत्र आहेस व पांडवांचा वडील भाऊ आहेस तेव्हा त्यांच्या विरुद्ध जाऊ नको असे विनवले. कर्णाने तिलाही स्पष्ट नकारच दिला. फक्त एकच गोष्ट कबूल केली कीं ’मी अर्जुन सोडून इतर चारांशी लढताना त्यांचा वध करणार नाही. माझे व अर्जुनाचे युद्ध मात्र अटळ आहे व आमच्यापैकी कोणीहि एक जगला तरी तुझे पांच पुत्र जिवंत राहतील.’ कुंतीला एवढ्याच आश्वासनावर समाधान मानावे लागले.या दोन घटनांमध्ये कर्णाचे वर्तन धीरोदात्त झाले असे म्हणावे लागते. कृष्ण वा कुंती दोघानीहि कर्णाचा खरा पिता कोण हे सांगितले नाही. सूर्यापासून जन्म याचेवर श्रद्धा असेल तर प्रश्न उरत नाही पण सर्व कथा माणसांची आहे व माणसापासूनच सर्वांचे जन्म आहेत हे मान्य केले तर हा प्रश्न उरतो. कर्णाचा खरा पिता ब्राह्मण वा क्षत्रिय असता तर ते यावेळी सांगावयास प्रत्यवाय नव्हता. त्यामुळे माझ्यामते कर्ण हा (बहुधा) खरोखर सूतपुत्रच असावा! याबद्दल मी कर्णावर लेखन करीन तेव्हा जास्त विस्ताराने लिहिणार आहे. दुसरी नवलाची गोष्ट म्हणजे कर्ण हा कुंतीपुत्र आहे हे कृष्णाला कसे माहीत होते? तो देवाचा अवतार तेव्हा त्याला सर्वच ज्ञात असे मानले तर प्रश्न उरत नाही! पण तो मानवच असे मानणारांसाठी शंका उरते! माझे मते शिष्टाई असफल होऊन कृष्ण विदुराकडे परत आला व कुंतीला भेटून तिला सर्व हकीगत सांगितली तेव्हा पुत्रस्नेहाने कुंतीनेच आपले एवढा दीर्घकाळ जपलेले गुपित स्वत:च कृष्णाला सांगून ’तू हे कर्णाला सांग व त्याला वळवण्याचा अखेरचा प्रयत्न कर’ असे म्हटले असले पाहिजे. तो प्रयत्नहि असफळ झाला व युद्ध होणार हे कळल्यावर मात्र सर्व भीडभाड बाजूला ठेवून तिने स्वत:च कर्णाला भेटून व त्याचे जन्मरहस्य स्वमुखाने सांगून अखेरची विनवणी केली. तीहि असफळ झाली ते एकप्रकारे अटळच होते.अशा प्रकारे सर्व प्रयत्न संपून अखेर कौरव-पांडवाची गाठ नियतीने ठरवल्याप्रमाणे कुरुक्षेत्रावर पडली. कृष्णशिष्टाईची कथा येथे संपली. या प्रकरणामध्ये कॄष्णाचे मानवी पातळीवरील सर्व अलौकिक गुण प्रगट झालेले दिसून येतात. त्याला अवतार मानण्याची मला त्यामुळेच गरज वाटत नाही! तो एक थोर व आदर्श मानव म्हणूनच आपल्याला प्रिय व्हावा हेच योग्य.

Sunday, August 3, 2008

कृष्णशिष्टाई - भाग ७

दुर्योधनाच्या या जबाबानंतर कृष्णाचाहि तोल सुटला व त्याने रागारागाने त्याला त्याच्या सर्व कुटिल कृत्यांची यादी ऐकविली व ’तुझे मातापिता व सर्व हितकर्ते तुला शम करावयास सांगत असून तू शम करूं इच्छित नाहीस तर मग तुला हवी असलेली वीरगति तुला लवकरच मिळेल’ अशी तंबी दिली. दु:शासन त्यावर दुर्योधनाला म्हणाला कीं ’तूं सख्य न करशील तर तूं, मी व कर्ण यांना बांधून भीष्म, द्रोण व धृतराष्ट्र पांडवांचे स्वाधीन करतील असा रंग दिसतो आहे.’ यावर क्रुद्ध होऊन दुर्योधन व त्याचे समर्थक सभा सोडून गेले. भीष्म यावर कृष्णाला म्हणाला कीं हे सर्व लोक कालवश झालेले दिसतात. हें ऐकून, क्रुद्ध होऊन, कृष्ण भीष्मद्रोणांचीहि निंदा करून म्हणाला कीं दुर्योधनाला तुम्ही थोपवत नाही हा तुम्हा कुरुवृद्धांचा अपराध आहे. आम्ही यादवानी जुलमी कंसाला मारून, उग्रसेनाला पुन्हा सत्तेवर आणले, आता आम्ही सर्व यादव सुखात आहोत. कुळाच्या हितासाठी (कु)पुत्राचा त्याग करणेच योग्य होय. यावर धृतराष्ट्राने विदुराकरवी दुर्योधनाला परत बोलावले व गांधारीकडून त्याला उपदेश करविला. तिने सांगितले की ’परस्परांतील भेदाला भिऊनच भीष्म, युझा पिता व बाल्हीक यानी पांडवाना राज्यभाग दिला होता. तुला अर्धे राज्य पुरेसे आहे. मूर्खा, तुला दिसत नाही का की भीष्म, द्रोण व कृप सर्व शक्तीनिशी तुझ्यातर्फे लढणार नाहीत? तुझा व पांडवांचा राज्यावर सारखाच हक्क आहे हे ते जाणतात.’
पालथ्या घड्यावर पाणी पडून, उलट, दुर्योधनाने शकुनीबरोबर कॄष्णालाच पकडण्याची चर्चा चालवली! ते लक्षांत येताच सात्यकी व कृतवर्मा बाहेर गेले व त्यानी सैन्य सज्ज केले. सात्यकीने परत येऊन कृष्णालाहि सावध केले. कृष्णाने धृतराष्ट्राला म्हटले की दुर्योधनाला खुशाल मला पकडण्याचा प्रयत्न करूं दे!. धृतराष्ट्राने पुन्हा दुर्योधनाला बोलावून उपदेश केला कीं हे बरे नाही. कृष्णाने त्याला सरळ दम दिला कीं तूं मला पकडण्य़ाचा प्रयत्न करच व मग माझा प्रताप पहा! कृष्णाने यावेळी विश्वरूप दर्शन दाखवले काय? हा श्रद्धेचा भाग आहे. महाभारत तसे म्हणते. माझ्या मते त्याची आवश्यकताच नव्हती. सात्यकी, कृतवर्मा यांची तयारी व कृष्णाचा आविर्भाव पाहून दुर्योधनाला वेळीच भान आले की आपला बेत तर सफळ होणार नाहीच पण उलट कृष्ण उघडच पांडवांच्या वतीने युद्धाला उभा रहावयास मोकळा होईल. बलरामहि मग त्याला थांबवू शकणार नाही. हे जाणून त्याने आपला बेत सोडून दिला.
धृतराष्ट्राने कृष्णापाशी सरळच कबूल केले कीं माझी दुर्योधनावर सत्ता चालत नाही. यावर बोलण्यासारखे काही न उरल्यामुळे कृष्णाने भीष्म-द्रोणाना म्हटले की धृतराष्ट्र काय म्हणाला ते तुम्ही ऐकले आहे. आता मी तुमचा निरोप घेऊन परत जातो. माझे प्रयत्न हरले. त्यानंतर सात्यकी व कृतवर्मा यांच्यासह बाहेर पडून तो कुंतीकडे गेला.
कृष्णशिष्टाई अशा प्रकारे असफळ झाली. मात्र पांडवांचा व कृष्णाचा आपणावर बोल येऊ नये हा उद्देश सफळ झाला.
यानंतर प्रत्यक्ष युद्धापूर्वी दोन महत्वाच्या घटना घडल्या त्यांबद्दल पुढील भागात.